Category: ठाणे

Thane news

लाडकी बहीणींना योजनेचा अर्ज घ्यावा लागतोय विकत

 दुकानदारांकडे हे अर्ज कसे पोहोचले असा प्रश्न उपस्थित ठाणे : माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी शासनाने १५ ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ दिली होती. परंतू, हे अर्ज केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका स्विकारतील असे सांगण्यात आले होते. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिला अंगणवाडीत जाताच त्यांना शेजारील दुकानांमधून अर्ज विकत घेण्यास सांगितले जात असल्याचा प्रकार जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी केंद्रांवर उघडकीस आला आहे. दुकानदारांकडे सरकारी योजनेचे अर्ज कसे पोहोचले असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध भागातील महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. सुरुवातीला हे अर्ज प्रत्येक प्रभाग समितीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मार्फत भरले जात होते. त्यानंतर, या योजनेचे संकेतस्थळ तसेच ॲप्लिकेशन तयार करण्यात आले. त्यामुळे अनेक महिलांनी घरबसल्या या योजनेचा अर्ज भरला होता. अर्ज ऑफलाईन भरलेला असो किंवा ऑनालईन या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नव्हते. यापैकी ज्या महिलांच्या अर्जाला मंजूरी मिळाली, त्यांच्या खात्यावर ऑगस्ट महिन्यापासून योजनेचा हफ्ता येण्यास सुरुवाती झाली. परंतू, या योजनेसाठी महिलांचा वाढता प्रतिसाद पाहून सरकारने या योजनेचा अर्ज भरंण्यासाठी मुदत वाढ दिली. परंतू, हे अर्ज केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत भरता येतील, असे सांगण्यात आले. सरकारकडून १५ ऑक्टोबर पर्यंत ही मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानुसार, अंगणवाडी केंद्रांवर सकाळी १० वाजल्यापासून महिलांच्या रांगा लागत होत्या. परंतू, ठाणे शहरातील काही केंद्रांवर महिलांना योजनेचा अर्ज शेजारील दुकानांमधून पाच किंवा दहा रुपयास विकत घेण्यास सांगितले जात होते. त्यामुळे महिलांची अंगणवाडी केंद्रावर तसेच दुकानांमध्ये गर्दी होत होती. परंतू, सरकारी योजनेचा हा अर्ज खासगी दुकान चालकांकडे पोहोचला कसा असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सरकारने सुरुवाती या योजनेचा अर्ज भरताना कोणत्याही प्रकारचे शुल्क स्विकारले जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. परंतू, आता याच योजनेचा अर्ज विकत घ्यावा लागला असल्यामुळे महिलांमधून नाराजीचा सुर उमटू लागला आहे. यासंदर्भात, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी संपर्क साधला असता, यांसदर्भात माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

 टोल माफीवरून राजकीय श्रेयवादासाठी चढाओढ

lठाण्यातील टोलनाक्यावर मनसे, शिंदेसेना, भाजपचा जल्लोष ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाने मुंबईतील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांच्या टोल माफीचा निर्णय जाहीर करताच श्रेयवादावरून आता राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. या निमित्ताने ठाण्यातील आनंद नगर टोलनाक्यावर मनसेने जल्लोष करीत पेढे वाटले. तर शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. त्यांच्यामागोमाग भाजप कार्यकर्त्यांनीही टोलनाक्याकडे धाव घेतली. टोलनाक्यावर खोळंबा टोलमाफीचा निर्णय सोमवारी सकाळी जाहीर झाल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यावर वाहन चालकांना लाडू  आणि पेढे वाटले. मनसेचे पदाधिकारी तेथून निघाल्यावर शिंदे सेनेचे पदाधिकारी तेथे पोचले आणि त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. नंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे धाव घेतली.  या श्रेयवादामुळे टोलनाक्यावर सोमवारी वाहनांचा अक्षरश: खोळंबा झाला. १२ वर्षे आमचा टोलमाफीसाठी संघर्ष सुरू होता. आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी अंगावर केसेस घेतल्या. टोलमाफी व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच सर्वप्रथम आवाज उठवला. कोणी आता काही बोलत असेल तरी खरे श्रेय राज ठाकरे यांचेच आहे. – रवी मोरे, शहराध्यक्ष, मनसे, ठाणे हे टोलनाके आघाडी सरकारच्या कार्यकाळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंबई ठाण्यातील लोकांवर लादले. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष होता. २००९ साली मी पहिल्यांदा शिवसेनेचा आमदार झालो. मी आणि शिंदे हे विरोधी पक्षाचे सदस्य असताना आम्ही आनंदनगर टोलनाक्यावर आंदोलन केले होते. पाच वर्षांपूर्वी जे वचन दिले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण करून दाखविले आहे. -प्रताप सरनाईक, आमदार, शिंदेसेना     नऊ वर्षांपूर्वी मी याच आनंदनगर टोलनाक्यावर टोलमाफीसाठी आंदोलन केले होते. सत्ताधारी पक्षात असो वा विरोधी पक्षात असो, सातत्याने टोलमुक्ती करा आणि मुंबई एन्ट्री पॉइंटला टोल लावू नका, अशी वारंवार मागणी केली. आंदोलन आणि उपोषण केले. आज खऱ्या अर्थाने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला. – संजय केळकर, आमदार, भाजप

जिल्ह्यात ९ प्राथमिक आरोग्य केंद्र; आयुष्मान आरोग्य मंदिर

उपकेंद्र स्तरावर १८ संस्थांना  कायाकल्प पुरस्कार –  रोहन घुगे ठाणे :केंद्र व राज्यशासनाच्या वतीने रुग्णांना शासकीय रुग्णालयात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात या हेतूने कायाकल्प पुरस्कार रुग्णालयांना देण्यात येतो. यावर्षी कायाकल्प पुरस्कारांची घोषणा राज्यस्तरावरून करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र  स्तरावर ९ संस्थाना व आयुष्मान आरोग्य मंदिर – उपकेंद्र स्तरावर १८ संस्थांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानिमित्ताने जिल्हा परिषद येथील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र प्रमुख यांचा  सन्मान करण्यात आला. कायाकल्प परितोषिक मिळवण्यामध्ये सर्व संस्थांचे सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ,  प्रशासकीय विभाग व विशेषतः सर्व सफाई कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. सर्वांचे विशेष अभिनंदन आणि ठाणे जिल्ह्यातील इतर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राना विविध पुरस्कार प्राप्त करण्यासाठी प्रेरणास्थान म्हणून पुढील कामकाज करावे असे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील, निवासी वैद्यकिय अधिकारी (बा.स) डॉ. मृणाली राहुड, सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कायाकल्प पुरस्कार सुरू करण्यात आला असून आरोग्य सेवेतील गुणवत्ता व सोयी सुविधा उत्तम करणे हे या योजनेचे उदिष्ट आहे. बाह्य परिसर स्वच्छता व सुशोभिकरण, जैविक घन कचरा व्यवस्थापन, सांड पाणी व्यवस्थापन, आंतरिक स्वच्छता, निर्जंतुकीकरण, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच रुग्णांचे अभिप्राय याबाबींवर मुल्यांकन गुण कायाकल्प अंतर्गत ठरविण्यात येतात. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रा .आ केंद्र खारबाव  यांनी रक्कम रुपये २ लक्ष पारितोषिक व आयुष्मान आरोग्य मंदिर – उपकेंद्र स्तरावर उपकेंद्र लाप  ता .भिवंडी  यांनी रक्कम रुपये १ लक्ष पारितोषिक घेऊन  जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी ,धसई, शेणवा ,कसारा ,दाभाड ,शिरोशी ,खडवली ,बदलापूर यांनाही प्रोत्साहनपर ५० हजार रु.  पारितोषिक प्राप्त झाले आहे. उपकेंद्र स्तरावरील उपकेंद्र सापगाव ता. शहापूर प्रथम उपविजेता ५० हजार रु, उपकेंद्र फळेगाव ता.कल्याण दुसरे उपविजेता  ३५ हजार रु पारितोषिक घेऊन  यशस्वी झाले आहेत.  उपकेंद्र भिसोल, ओजीवले, कान्होर, दापोडे, वडूनवघर, पहारे, नडगाव, मानिवली, साने, खांबाला, बोहोनोली, भिणार, कालवर, उसगाव, आमने या उपकेंद्रांना प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त झाले आहे.

 उपवन घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव

आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारामुळे घाटाला अहिल्यादेवींचे नाव ठाणे : ठाण्यातील उपवन घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्यात आले असून याच लोकार्पण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन तलावालगत घाटाची निर्मिती करण्यात आली होती या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली होती. प्रतिष्ठानने केलेली मागणी मान्य करत आमदार प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवन घाट असे नाव दिले आहे असून या घाटाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. तर जागेवर धनगर समाज बांधवांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार प्रताप सरनाईक धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाचे अध्यक्ष माधवी बारगीर, यशवंत सेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख अभिजीत कोकरे, समाजसेवक अभिजीत चोरामले, शिक्षक सेनेच्या महिला अध्यक्ष शोभा गरांडे,भाजपा भटक्या विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्षा  वर्षा माने, भाजपा वार्ड अध्यक्ष संदीप माने, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड सचिव तुषार धायगुडे, उपाध्यक्ष बाळा विरकर,खजिनदार अनिल जरग, कार्यकारणी सदस्य गणेश बारगीर, सुरेश भांड, संतोष बुधे, दीपक झाडे,उद्धव गावडे, उत्तम यमगर, नामदेव चांगण,अनिकेत पाडसे, मनोज खाटेकर वैभव सामसे,सुनील पळसे, महिला मंडळ सचिव गायत्री गुंड, सुषमा बुधे,सुजाता भांड,सीमा कुरकुंडे, तृप्ती पाडसे,आदिसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नदीवर घाट बांधण्याची मूळ संकल्पना ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आहे. संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी त्यांनी घाट उभारले आहेत. त्यामुळे या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी धनगर प्रतिष्ठानने केली होती अखेर त्यांच्या या मागणीला यश आले असून आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने उपवन घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवन घाट असे नाव देण्यात आले आहे. यामुळे धनगर प्रतिष्ठानने आमदार प्रताप सरनाईक यांचा सत्कार करून त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.तसेच या नावाच्या निर्मितीसाठी परिश्रम घेणारे ठेकेदार सत्या लांडगे यांचे देखील प्रतिष्ठाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

रोटरीचा दिव्यांगांना मदतीचा हाथ 

  ठाणे : रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या वतीने रोटरी दिव्यांग सेंटर कल्याण संचालित ऑटोसच्या सहकार्याने दिव्यांगांना कृत्रिम पाय व कॅलिपरचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. यासाठी दिव्यांग व्यक्तींचे एक शिबिर रविवारी ठाण्यात संपन्न झाले. त्यात दिव्यांगांच्या पायाचे मोजमाप घेण्यात आले. रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण अध्यक्ष बिजू उन्निथन, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ अध्यक्ष मेधा जोशी, सचिव रमेश मोरे, सचिव अमोल नाले, प्रकल्प प्रमुख प्रफुल  क्षिरसागर, प्रकल्प प्रमुख देवयानी वेद यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. रोटरी क्लब सामाजिक भावनेतून गेली अनेक वर्ष हा उपक्रम राबवित आहे. नौपाडा येथील सरस्वती शाळेच्या आवारात हे शिबिर संपन्न झाले. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांतून  52 दिव्यांगांनी नोंदणी केली होती. 40 दिव्यांग या शिबिरास उपस्थित होते. तज्ञ व्यक्तिंनी या दिव्यांगांच्या पायाचे मोजमाप घेतले. सरस्वती विद्यालयात 27 ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमात दिव्यांगांना कृत्रिम पाय व कॅलिपरचे वाटप करण्यात येणार आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी शिबिराला उपस्थिती लावत रोटरीच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

रोटरीचा दिव्यांगांना मदतीचा हाथ 

ठाणे : रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या वतीने रोटरी दिव्यांग सेंटर कल्याण संचालित ऑटोसच्या सहकार्याने दिव्यांगांना कृत्रिम पाय व कॅलिपरचे विनामूल्य वाटप करण्यात येणार…

दिवाकर सिंह समाजवादी पार्टीचे नवीन ठाणे जिल्हाध्यक्ष

ठाणे : समाजवादी पार्टीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयात मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. नवीन संरचनेनुसार दिवाकर सिंह यांची पक्षाच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी नेमणूक केली आहे. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष…

बाबा सिद्दिकींच्या हत्येचे प्रकरण दडपण्यासाठी टोलमाफी, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

ठाणे : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे प्रकरण दडपण्यासाठी मुंबईच्या सीमेवर हलक्या वाहनांना टोल माफीचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. कळवा येथील डॉ.…

पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र देशात नंबर वन – एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाणे खाडी पूल-३ च्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण व कोकणातील सात खाडी पूलांचे भूमीपूजन संपन्न अनिल ठाणेकर ठाणे : राज्याच्या कुठल्याही भागात गेलात तर सध्या सर्वत्र विविध प्रकल्प, विकास कामे सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जवळपास दोन लाख कोटींचे प्रकल्प राबवित आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य देशात क्रमांक एकवर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी वाशी येथे केले. सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. 3 च्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनी मार्गिकेचे उद्घाटन व रेवस ( रायगड ) ते रेडी (सिंधुदूर्ग) या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांच्या कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री ना.श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वाशी येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री ना.श्री. दादाजी भुसे, माजी खासदार राहुल शेवाळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर-पाटणकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.अनिलकुमार गायकवाड , सहव्यवस्थापकीय संचालक श्री.राजेश पाटील, मुख्य अभियंता श्री.राजेश निघोट , मुख्य अभियंता श्री.एस.के. सुरवसे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते .ठाणे खाडी पूल क्र.3 च्या उत्तर वाहिनीच्या लोकार्पणाबरोबर रेवस – रेडी सागरी महामार्गावरील धरमतर , कुंडलिका, आगरदांडा, बाणकोट, केळशी, जयगड आणि कुणकेश्वर या सात खाडी पूलांचे भूमीपूजन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पार पडले. स्थानिक स्तरावर प्रत्येक खाडी पूलाच्या कामाचे प्रत्यक्ष भूमीपूजन स्थानिक मान्यवर लोकप्रतिनिधींच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. या सात खाडी पूलांची एकूण लांबी २६.७० किलोमीटर असून त्यासाठी ७ हजार ८५१ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, रेवस ते रेडी सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांची मागणी राज्याच्या स्थापनेपासून होती.ती मागणी आज पूर्ण होतेय. हा योगायोग आहे . या खाडी पूलांमुळे कोकणाचा विकास होईलच, तसेच पर्यटनाला चालना मिळेल. कोकणवासियांसाठी ही दिवाळीची भेटच आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या माध्यमातून  राज्यात पाच हजार किमी लांबीचे द्रुतगती मार्गाचे ग्रीड नेटवर्क उभारणार आहोत. त्यामुळे राज्याच्या कुठल्याही भागातून कुठेही सहा ते सात पोहोचता येईल. ते म्हणाले, पनवेल ते सिंधुदूर्ग दरम्यानच्या कोकण ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वेचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांने हाती घेतले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते कोकण हे अंतर अवघ्या पाच तासात पार करता येईल .याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री श्री.दादाजी भुसे ठाणे खाडी पूल क्र.३ ची उत्तर वाहिनी या तीन पदरी पूलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास निश्चितच यश येईल, असा विश्वास व्यक्त करून म्हणाले की, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीच्या पूलाचे कामही अत्यंत वेगाने प्रगतीपथावर आहे. आज दुग्धशर्करा योग म्हणजे रेवस-रेडी या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांचे भूमीपूजन एकाच वेळी होत आहे. या परिसरातील  निसर्गाला अनुरूप असे केबल स्टे व इतर प्रकारांच्या पूलांची निर्मिती रस्ते विकास महामंडळ अत्यंत कल्पकतेने करणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या शेवटी ठाणे खाडी पूलाची मुंबईहून पुण्याला जाणारी उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी सोमवार, १४ ऑक्टोबर पासून सुरु होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. चौकट प्रकल्पांची माहिती सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र.3, प्रकल्पामधील कामाचा वाव, प्रत्येकी 3 मार्गिकांचे 2 पूल बांधणे . (मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनीचे काम पूर्ण व पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीचे काम प्रगतीपथावर ) प्रकल्पाची एकूण किंमत : रु. 559 कोटी.पूलाची लांबी : 3180 मी. ( पोहोच रस्त्यासह ) सद्य:स्थितीत उत्तर वाहिनी पूलाचे काम पूर्ण करुन ती वाहतुकीसाठी सोमवार, दि.14 ऑक्टोबर पासून खुली करण्यात येणार आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीचे काम 80 % पूर्ण झाले आहे.रेवस ते रेडी (सिंधुदुर्ग) सागरी महामार्गाची* एकूण लांबी : 498 किमी.पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा महामार्ग, कोकण किनारपट्टीवरील सर्व सागरी किनाऱ्यांना कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर गतिमान महामार्गाने जोडणारा प्रकल्प. 00000

मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटलचे लोकार्पण

अनिल ठाणेकर ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटलचे उदघाटन शुक्रवारी पार पडले. सर्व वैद्यकीय उपचार व मोठ्या सर्जरी सरकारी योजनेतून मोफत केल्या जाव्यात यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून मीरा-भाईंदरच्या धर्तीवर घोडबंदर येथील नळपाडा येथे १५० बेडचे सुपर स्पेशालिटी “मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक” या नावाने कॅशलेस रुग्णालयाची उभारणी करण्यात आलेली आहे. याप्रसंगी खासदार नरेश मस्के, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मा. नगरसेविका परिषा सरनाईक, आशा डोंगरे, विधानसभा सचिव संदीप डोंगरे, विभागप्रमुख भगवान देवकाते, युवासेनेचे सिद्धार्थ पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कॅशलेस रुग्णालयाचा फायदाओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्यनगर, वर्तकनगर, भीमनगर, शिवाई नगर, उपवन, येऊर येथील आदिवासी पाडे, वसंत विहार, घोडबंदर रोड व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना घेता येणार आहे. या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापन एका सेवाभावी संस्थेला देण्यात आले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची ज्यांना माहिती आहे अशा संस्थेला हे हॉस्पिटलचे व्यवस्थापन देण्यात आले असून सर्व स्टाफ व हॉस्पिटलचे व्यवस्थापन ही संस्था सरकारच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सांभाळणार आहे. लाखो रुपये ज्या ऑपरेशन साठी बाहेर लागतात अशा मोठ्या सर्जरी येथे मोफत होण्यास आता सुरुवात होणार आहे. गरजूंना औषधेही मोफत देणार आहेत. २४ तास हॉस्पिटल गरजूना सेवा देणार आहे.  हे कॅशलेस हॉस्पिटल असल्याने पेशंटच्या साध्या तपासणी पासून, विविध टेस्ट करणे आणि डॉक्टरांचे कन्सल्टिंग, पुढे आवश्यक असल्यास ऑपरेशन, त्यानंतर पुन्हा पुढील सर्व उपचार अशा सर्व आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत. या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू न दिल्याने हे हॉस्पिटल आजपासून लोकांच्या सेवेत दाखल होणार असून हे हॉस्पिटल म्हणजे गरीब – गरजू रुग्णांसाठी एक वरदान ठरणार आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. घोडबंदर रोड नळपाडा येथील हॉस्पिटलची इमारत महापालिकेच्या माध्यमातून बनविण्यात आलेली असून या इमारतीत ठाणेकर नागरिकांच्या सेवेसाठी  कॅशलेस हॉस्पिटल सुरू करावे यासाठी आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी प्रयत्न केले. महात्मा ज्योतिबा फुले योजनेमधून होणारी वैद्यकीय मदत दिड लाखापासून पाच लाखापर्यंत नेण्यात आल्यामुळे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्यनगर, वर्तकनगर, भीमनगर, शिवाई नगर, उपवन, येऊर येथील आदिवासी पाडे, वसंत विहार, तसेच घोडबंदर रोड व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी आवाहन केले.ठाणे शहरातील हे हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. ठाणे शहरातील दुसरे तर महाराष्ट्र राज्यातील तिसरे सरकारी कॅशलेस हॉस्पिटल आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत हे कॅशलेस हॉस्पिटल चालणार आहे. राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सर्व उपचार, कार्डिओलॉजी, अँजिओप्लास्टी, बायपास हृदय शस्त्रक्रिया, ब्लॉक बदलणे, पेसमेकर बसविणे अशा मोठ्या शस्त्रक्रिया, कॅन्सरवरील उपचार त्याचप्रमाणे इस्पितळात रक्त तपासणी, हेमेटोलॉजी, बायोकॅमिस्ट्री चाचणी, ईसीजी, सोनोग्राफी, 2डी इको, होल्टर, पीएफटी, एक्स-रे, कॅट्सकॅन, सीटी स्कॅन स्क्रिनिंग, यूरो शस्त्रक्रिया, न्यूरो सर्जरी जसे की कॅनिओटॉमी, हेमॅटोमा इव्हॅक्युएशन, स्पाइन सर्जरी, लॅमिनेक्टॉमी, स्त्रीरोग शस्त्रक्रिया जसे की हिस्टेरेक्टॉमी, डोके आणि मानेचा कर्करोग, स्त्रीरोग कर्करोग, पोटाचा कर्करोग इ. सारख्या ऑन्को शस्त्रक्रिया येथे होणार असून या सुविधा विनामूल्य (कॅशलेस) स्वरूपात पिवळ्या, केशरी तसेच शुभ्र शिधापत्रिका धारकांसाठी येथे सरकारी योजनेंतर्गत उपलब्ध होणार आहे.