Category: ठाणे

Thane news

श्रमिक जनता संघ युनियनच्या अध्यक्षपदी मेधा पाटकर यांची फेरनिवड

श्रमिक जनता संघ युनियनच्या अध्यक्षपदी मेधा पाटकर यांची फेरनिवड अनिल ठाणेकर ठाणे : श्रमिक जनता संघ युनियनचे हीरक महोत्सवी वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन रविवारी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ११५ मध्ये आयोजित करण्यात आले होते. या वेळी संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. तर सरचिटणीसपदावर सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांची निवड करण्यात आली आहे. ठाण्यातील कळवा येथील महापालिका शाळा क्रमांक ११५चे सभागृहात रविवारी १५ मार्च रोजी संपन्न झालेल्या श्रमिक जनता संघ युनियनच्या हीरक महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. दिवसभर चाललेल्या या सभेत अध्यक्षपदी – मेधा पाटकर, उपाध्यक्षपदी – डॉ संजय मंगला गोपाळ व पर्वत सोनेर, सरचिटणीस – जगदीश खैरालिया, चिटणीस म्हणून सुनील कंद, सुनील दिवेकर, संजय चौहान आणि खजिनदार पदावर अविनाश नाईक, सहखजिनदार म्हणून सुदर्शन साहु यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. या वेळी नआणि मध्य प्रदेशातील युनियनच्या विविध आणि महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, कल्याण, भुसावळ, नंदुरबार सह मध्य रेल्वेच्या युनियनचे सभासदांनी निवडलेले राष्ट्रीय जनरल कौन्सिल आणि राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या सदस्यांची देखील निवड झाल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. श्रमिक जनता संघ युनियनची स्थापना स्वातंत्र्य सेनानी वसंतराव खानोलकर यांनी १९६६ साली केली होती.  हीरक महोत्सवी वर्ष साजरा करताना कामगारांच्या न्याय हक्कांसाठी १९७५ पासून प्रदीर्घ काळ केवळ श्रमिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार कार्यकर्ता ते श्रमिक अधिवक्ता म्हणून झटणारे ज्येष्ठ विधिज्ञ यांचे युनियनच्या अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते विशेष गौरव या वेळी करण्यात आले.  या वेळी ॲड रविंद्र नायर यांनी बोलताना सांगितले की, कामगारांना फक्त कोर्टाच्या लढाईने न्याय मिळू शकत नाही तर न्यायासाठी कामगारांची संघटित शक्ती व रस्त्यावरील आंदोलने ही आवश्यक आहे. संघटना व कानूनी संघर्ष साथ साथ असणे आवश्यक आहे. फक्त श्रमिकांच्या बाजुंनी उभं राहण्याचा आमच्या सारख्या काही वकीलांनी संकल्प केला आहे. मात्र ही संख्या हवी तितकी नाही.ही सुध्दा वस्तुस्थिती आहे.सर्वसाधारण सभेचे समारोप करताना वरिष्ठ अधिवक्ता रवींद्र नायर यांचं विशेष सत्कार करताना युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांनी सांगितले की, आज युनियनच्या हीरक महोत्सवी वार्षिक सभेत रस्त्यावर लढाई सुरू असताना कानुनी लढाईत श्रमिकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारे रवींद्र नायर सारख्या खर्या हिर्याचं गौरव करताना खूप आनंद होतो आहे. श्रमिक जनता संघ युनियनला अनेकदा अडचणीच्या प्रसंगी नायर यांचा सल्ला आम्हाला मोलाचा ठरला आहे. आपल्या युनियनच्या कार्यकर्त्यांनी संघटनेची भूमिका व विचारधारेला अनुसरून कार्य करत राहण्याचा निर्धार आवश्यक आहे. कोणत्याही कायदेशीर अधिकार पेक्षा शसंवैधानिक अधिकार श्रेष्ठ आहे आणि संवैधानिक हक्कांपेक्षा ही मानवी हक्के अधिक महत्त्वाची आहेत. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी होणारी दिरंगाई म्हणजेच न्याय नाकारणे अर्थात अन्यायच आहे. अनेक कायदे अस्तित्वात असताना योग्य व वेळेवर अंमलबजावणी होत नसल्याने श्रमिकांचे प्रचंड प्रमाणात शोषण होत आहे. स्थलांतरित मजुरांच्या सुरक्षेचा कायदा अस्तित्वात असताना देखील शासन पुढाकाराने हस्तक्षेप का करत नाही? इतकेच नव्हे तर किमान वेतन अधिनियम १९४८ ची अंमलबजावणी खुद्द महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभाग करत नसल्याने ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांना सहा सहा वर्षे कि मान वेतन कायद्यानुसार वेतन मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. परंतु “सत्य परेशान हो सकता है अपराजित नहीं!” आपल्या न्याय हक्कांसाठी सातत्याने अश्या वेळी आम्हालाच करावं लागतं. हे लोकशाही देशात भूषणावह नाही. आता तर केंद्र सरकारने कामगार हिताचे ४४ कामगार कायद्यांपैकी २९ कामगार हिताचे कायदे निरस्त करून मालक हितासाठी ४ श्रम संहिता लागू करत आहेत. कामगार कायद्याचे आधार घेऊन आम्ही बाजू मांडत होतो, आता सरकारने कामगार कायद्यात बदल करून  मालक वर्गाला श्रमिकांच्या न्याय हक्कांवर अतिक्रमण करण्याची खुली सूट सरकारने दिली जाणार आहे..समता, बंधुता, न्याय आणि श्रमिक अधिकार ही मंजिल श्रमिक जनता संघाने स्वीकारली आहे. आता एकजुटीने अंतिम क्षणापर्यंत संवैधानिक व मानवी हक्कांसाठी अहिंसक मार्गाने संघर्ष करण्याचा आपला निर्धार करूया, असं आवाहन ही त्यांनी केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल ते जागतिक कामगार दिन १ मे २०२६ पर्यंत  युनियनच्या सर्व युनिट्स वर विविध कार्यक्रम आयोजित करून “ श्रमिक जागरण पंधरवडा “ साजरा करण्याची घोषणा ही शेवटी त्यांनी केली.अधिवेशनात कामगार कष्टकरी जनसमुहांच्या हितासाठी किमान वेतन अधिनियमाची अंमलबजावणी व दर पाच वर्षांनी किमान वेतनाचे मुल्यांकन करून श्रमिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी योग्य वेतन दर लागू करावे, श्रमिकांचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य कामगार विमा योजना लागू होण्यासाठी मासिक वेतन मर्यादा एकवीस हजारांपासून किमान पन्नास हजार रुपये करावी, धनिकांच्या संपत्ती वर किमान दोन टक्के टैक्स लावा जेणेकरून सामान्य नागरिकांना शिक्षण, आरोग्य आणि इतर योजनांसाठी निधी उपलब्ध होईल, श्रमिकांवर शोषण करणाऱ्या मालक धार्जिण्या चार श्रमसंहिता रद्द करा, कामगार हिताचे प्रभावी कायदे अंमलात आणा, ठेका मजदूरांना न्याय, श्रमिक वस्त्यांमध्ये निवारा, शुद्ध पाणी, दवाखाने, शिक्षण, शौचालय आदी जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून द्या, महिलांना सन्मान, नशाबंदी हो. आदी विविध प्रस्तावावर सखोल चर्चा होऊन प्रस्ताव मंजूर करण्यात आले.अधिवेशनात श्रमिक जनता संघ युनियनच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विविध युनिट्सचे दीडशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. ठाण्यातील पाणी पुरवठा विभागाचे संघटक गणेश चव्हाण, रस्ता सफाईचे भास्कर शिगवण, शिक्षण विभागाचे सुनील दिवेकर, नरेश घाणेकर, विशाल कांबळे, संतोष देशमुख, अजय भोसले आदींसह समता विचार प्रसारक संस्थेच्या सचिव लतिका सुमो. यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष श्रम घेतले.

 क्लस्टर योजनेविरोधात २७ गावांतील नागरिकांची केडीएमसी मुख्यालयावर धडक

क्लस्टर योजनेविरोधात २७ गावांतील नागरिकांची केडीएमसी मुख्यालयावर धडक परिपत्रक फाडत, जाळून केला निषेध व्यक्त कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील २७ गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या क्लस्टर योजने विरोधात स्थानिक भूमिपुत्रांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून  या पार्श्वभूमीवर २७ गाव सर्व पक्षीय संरक्षण हक्क संघर्ष समिती आणि येथील नागरिकांनी आज केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली. यावेळी या शासन निर्णयाची होळी करत आणि परिपत्रकाचे कागद फाडत निषेध व्यक्त केला. क्लस्टर योजना, ग्रोथ सेंटर आणि बुलेट ट्रेन बिझनेस हब यांसारख्या विविध योजनांमुळे २७ गावांतील स्थानिक नागरिक व भूमिपुत्रांवर परिणाम होत आहे. २७ गावांचा विकास नाही, सुविधा नाही तर मग मालमत्ता कराची सक्ती चालणार नाही अशी भूमिका यावेळी या नागरिकांनी घेतली. यावेळी मोर्चेकर्यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकत लवकरच केडीएमसी महापौर, आयुक्त, २७ गावांतील लोकप्रतिनिधी आणि संघर्ष समिती यांची संयुक्त बैठक लावून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असल्याचे अध्यक्ष सुमित वझे यांनी सांगितले. आंदोलकांचे म्हणणे आहे की, केवळ क्लस्टर योजनाच नाही तर ग्रोथ सेंटर आणि बुलेट ट्रेन बिझनेस हब यांसारख्या विविध मोठ्या प्रकल्पांमुळे २७ गावांतील मूळ रहिवासी आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वावर गदा येत आहे. या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, पाणी आणि इतर सोयीसुविधा मिळत नसताना केवळ प्रकल्पांचा भार लादला जात असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. जोपर्यंत गावांचा खरा विकास होत नाही आणि सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत मालमत्ता कराची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असा पवित्राही ग्रामस्थांनी यावेळी घेतला. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांची भेट घेतली. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुमित वझे, उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. अतिरिक्त आयुक्तांनी आंदोलकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि या विषयावर लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. लवकरच केडीएमसीचे महापौर, आयुक्त, २७ गावांतील सर्व लोकप्रतिनिधी आणि संघर्ष समिती यांची एक संयुक्त बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत सर्व तांत्रिक आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कल्याण ते सीएसएमटी सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करा

कल्याण ते सीएसएमटी सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करा शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत मागणी कल्याण :  मध्य रेल्वेवरील कल्याण ते सीएसएमटी सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करणे, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण, दिवा सीएसएमटी जलद लोकल, कोपर-वसई रेल्वेच्या फेऱ्या वाढवणे, कळवा-ऐरोली एलिव्हेटेड प्रकल्पाला गती आणि प्रत्येक स्टेशन्सवर मराठी साहित्य विक्रीचे स्टॉल्स सुरु करावेत, अशा रेल्वेसंबधींच्या अनेक मागण्यांचे निवेदन आज शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत सादर केले. कल्याण मतदार संघातील ८० टक्के प्रवासी लोकलचा वापर करतात. त्यामुळे कल्याण मार्गावर सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करणे आवश्यक आहे. कोकण मार्गावरील मेल एक्सप्रेस फेऱ्यांची संख्या वाढवणे आणि ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांची सुविधा पुन्हा सुरु करावी, अशी मागणी खासदार डॉ. शिंदे यांनी केली. कल्याण लोकसभा मतदार संघात आजच्या घडीला ५ ते ६ हजार कोटींची रेल्वेची कामे सुरु आहेत. पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेसाठी येथील प्रवाशी १५ ते २० वर्षांपासून वाट पाहत होते. २०१४ मध्ये केंद्रात भाजपप्रणित एनडीए सरकार सत्तेत आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कल्याण मतदार संघातील रेल्वेच्या कामांना गती मिळाली. आज ठाणे ते कल्याण पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले. तसेच कल्याण ते अंबरनाथपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम सुरु आहे. मात्र ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंतच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी  खासदार डॉ. शिंदे यांनी केली. यासाठी आवश्यक भूसंपादन, रेल्वे मार्गावरील झोपड्यांचा प्रश्न आणि नागरिकांचे पुनर्वसन याबाबत रेल्वे मंत्र्यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा. याबाबत राज्य सरकार, एसआरए यांच्यासोबत चर्चा करुन धोरण बनवावे, असे खासदार डॉ. शिंदे सुचवले. महाराष्ट्रात रेल्वेचे १ लाख ७० हजार कोटींची कामे सुरु आहेत. २०२६-२७ साठी महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्पांसाठी २३ हजार कोटींची तरतूद केली आहे. त्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. कल्याण यार्ड रिमॉडलिंगसाठी ८०० कोटींची तरतूद केली आहे. बुलेट ट्रेन आणि दिल्ली मुंबई रेल्वे कॉरिडोर लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली. मुंबई पुणे हायस्पीड कॉरिडोर, पुणे हैद्राबाद हायस्पीड कॉरीडोरमुळे प्रवाशांना फायदा होईल आणि वेळेची मोठी बचत होईल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. १९१६ मध्ये महात्मा गांधी यांनी रेल्वेतील असुविधांबाबत लेख लिहला होता. दुर्देवाने २०१४ पर्यंत ११४ ही परिस्थिती तशीच होती, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी काँग्रेसवर केली. आज रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्याचे काम एनडीए सरकारने केले. संपूर्ण देशात वंदे भारत ट्रेन सुरु आहेत. रेल्वेने विस्तार करतानाच विश्वविक्रम देखील केला आहे. चिनाब नदीवरील रेल्वेचा ब्रिज हा आयफेल टॉवरपेक्षाही उंच आहे. मागील १२ वर्षांत मध्य रेल्वेवरील प्रश्नांना प्राधान्य दिल्याबद्दल माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, पियूष गोयल आणि विद्यमान मंत्री अश्विन वैष्णव यांचे खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी खास आभार मानले.

शहपूरात रानमेवा दाखल कैऱ्या,करवंद,तोरणं विक्रीसाठी दाखल आदिवासींना मिळाला रोजगार

शहपूरात रानमेवा दाखल कैऱ्या,करवंद,तोरणं विक्रीसाठी दाखल आदिवासींना मिळाला रोजगार ठाणे प्रतिनिधी करवंद,जांभळं,कैऱ्या,तोरणं ,हा दाट जंगलात मिळणारा उन्हाळ्यातील खास रान मेवा विक्रीसाठी आता आदिवासी शहापूर बाजारपेठेत दाखल झाले आहेत.या रानमेवा विक्रीतून स्थानिक आदिवासी महिलांना रोजगार मिळाला आहे . शहापूर तालुक्यातील वासिंद किन्हवली,शेणवा, डोळखांब,खर्डी,कसारा या परिसरातील दऱ्याखोऱ्यांत वास्तव्य करणारे आदिवासी जंगलात भटकंती करुन करवंद ,कैऱ्या,तोरणं आदी रानमेवा गोळा करुन उन्हाळ्यात शहरात विक्रीसाठी घेऊन येतात हा रानमेवा मिळविण्यासाठी पहाटेच आदिवासी घराबाहेर पडतात जंगलात जमा केलेला हा रानमेवा एका टोपलीत भरुन नंतर पळसाच्या द्रोणात ठेवून विक्रीसाठी शहरात आणला जातो ऊन्हाळ्यातच मिळणारा हा दुर्मीळ असा रानमेवा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते आहे.१० ते २० रुपये वाटा याप्रमाणे कैऱ्या,करवंद,तोरणं,यांची विक्री केली जाते या रानमेव्याच्या विक्रीतून पुर्ण दिवसभरात २०० ते ३०० रुपयांची कमाई होते असे सुकरी भला या आदिवासी महिलेने सांगितले हा रानमेवा शहापूरसह कल्याण,डोंबिवली,ठाणे,येथील बाजारपेठेत आदिवासी विक्रीसाठी आणतात या रानमेव्यामुळे उन्हाळ्यातील तीन महिने आम्हाला रोजीरोटी मिळत असते असे या व्यवसायातील आदिवासी सांगतात.

ना दरवाढ, ना करवाढ असललेला अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर

ना दरवाढ, ना करवाढ असललेला अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर मिरा -भाईंदर : महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी आज स्थायी समितीसमोर वर्षं २०२५-२६ चा सुधारीत आणि सन २०२६-२७ चा मूळ अर्थसंकल्प मांडला.  कोणतीही दरवाढ आणि करवाढ नसलेला हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी त्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटलं. स्वच्छ सर्वेक्षणात मिळालेल्या देशात प्रथम स्थानानंतर आता आमचे ध्येय ‘ स्वच्छ शहरातून शाश्वत शहराकडे ’ असल्याचं ते पुढे म्हणाले. आर्थिक शिस्त,  पायाभूत सुविधा आणि भविष्यासाठी तरतूद या तीन गीष्टींवर विचार करून त्यावर आधारित हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. करवसुली वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न, बायो मायनिंग,  घनकचरा व्यवस्थापन, सोलर व्यवस्था तसेच डिजिटल व्यवस्था वाढविण्यावर भर देणार असल्याचे आयुक्तानी सांगितले. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी एकूण १४३९.०२ कोटीचे अर्थसंकल्पीय अंदाज त्यांनी स्थायी समिती समोर सादर केले. या समितीच्या पुढील बैठीकीत यावर निर्णय होईल.

गर्भशमुखाच्या कर्करोगपासून बचाव करण्याऱ्या लसीकरणाला मिरा भाईंदर शहरात सुरुवात

गर्भशमुखाच्या कर्करोगपासून बचाव करण्याऱ्या लसीकरणाला मिरा भाईंदर शहरात सुरुवात मिरा – भाईंदर भारतात महिलांमध्ये कर्करोगामुळे होणा-या मृत्यूंचे एक प्रमुख कारण गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हे आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची जवळजवळ सर्व प्रकरणे ह्युमन  पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) या विषाणूच्या संसर्गामुळे होतात आणि वेळेवर लसीकरण करून हा कर्करोग प्रभावीपणे रोखता येतो. महाराष्ट्र राज्यामध्ये सदर एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ ८ मार्चला झाला आहे. त्या अनुषंगाने मिरा भाईंदर महानगरपालिकेने १४ ते १५ वर्षे वयोगटातील (१४ वर्षे पूर्ण मात्र अद्याप १५ वर्षे पूर्ण नाही अशा) मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू केली आहे. सदर एचपीव्ही मोहिमेचे उद्घाटन महापौर डिंपल मेहता, उप-महापौर ध्रुवकिशोर पाटील, सभापती, महिला व बाल कल्याण समिती अनिता पाटील तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नंदकिशोर लहाने यांच्या उपस्थितीत नवघर आरोग्य केंद्रात करण्यात आले.  या मोहिमेदरम्यान एचपीव्ही लस (गार्डासिल -४) सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे (यूपीएचसी) आणि महानगरपालिका / शासकिय रुग्णालयांमध्ये मोफत दिली जाईल. एचपीव्ही लस जगभरात जवळजवळ २० वर्षांपासून वापरली जात आहे, आणि जगभरात सदर लसीचे करोडो डोस दिले गेले आहेत. व्यापक वैज्ञानिक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे, की ही लस सुरक्षित आहे. इंजेक्शनच्या जागी वेदना, लालसरपणा किंवा सूज, ताप, डोकेदुखी, थकवा जाणवणे, मळमळ, चक्कर येणे इ. किरकोळ त्रास वगळता सदर लसीचे कुठलेही मोठे दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे सदर लसीच्या दुष्परिणामाबाबत अपप्रचार करणारे व्हिडीओज् समाजमाध्यमावर फिरत आहेत, त्याकडे कृपया दुर्लक्ष करुन सर्व पालकांनी आपापल्या मुलींना सदर लस द्यावी असे मिरा भाईंदर महानरगपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

उल्हासनगरात कोणार्कच्या सफाई कामगाराची निर्घृण हत्या

उल्हासनगरात कोणार्कच्या सफाई कामगाराची निर्घृण हत्या शरीरावर जवळपास ३२ हून अधिक वार उल्हासनगर दि ९ ( सुनिल इंगळे  ) : उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नशेखोर तरुणाने ऑन ड्युटी सफाई कामगारावर धारदार चाकूने जवळपास ३२ हून अधिक त्याच्या शरीरावर वार करून त्याची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्याची खळबजनक घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे शहरातील सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार चाकूने भोसकून हत्या करण्यात आलेल्या त्या सफाई कामगाराचे नाव महादू उर्फ महादेव जगताप (३५) असे आहे. तो उल्हासनगरातील कॅम्प नंबर एक मधील शहाड गावठाण परिसरात राहत होता. महादू हा कोणार्क ग्रीन एन्व्हायरो या कंपनीमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. सोमवारी सकाळी तो शहरातील पॅनल क्रमांक ११ मध्ये बॅरेग क्रमांक ८९६, माजी नगरसेविका इंदिरा उदासी यांच्या घरासमोर त्या ठिकाणी लोकांच्या घरातून कचरा डब्यामध्ये टाकण्याचे काम करीत होता. सकाळी साडे अकराच्या सुमारास त्या ठिकाणी एका नशेखोर तरुणाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून महादू याच्याशी भांडण काढून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या तरुणाने त्याच्या जवळील धारदार चाकूने महादू जगताप यांच्या शरीरावर जवळपास ३२ हून अधिक चाकूचे सपासप वार केले. महादू हा रक्ताच्या थरोळात त्या ठिकाणी पडला. हा प्रकार घडून येतात त्या तरुणाने त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून डांबून ठेवले. या घटनेची खबर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांना मिळताच त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी महादू जगताप याला त्वरित उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. पोलिसांनी त्या तरुणाला महादू जगताप यांच्या हत्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये एकच संतापाचे वातावरण पसरले असून त्यांनी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात धाव घेऊन त्या ठिकाणी गर्दी केली होती. ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या हत्याची थरारक दृश्य सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहेत. मध्यवर्ती पोलिसांनी या घटने प्रकरणी तपास सुरू केला असून ताब्यात घेतलेल्या त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. मध्यवर्ती पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव दुर्गेश गुप्त असल्याचे सांगितले आहे. कोणार्क कंपनीच्या सफाई कामगारांनी या घटनेचा निषेध केला. नशेखोर तरुणाकडून हा हात्याचा प्रकार घडून आल्याने शहरातील सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा कोण पुरवणार. निर्घृण हत्या करण्यात आलेल्या महादू जगताप याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्याला दोन लहान मुले आणि पत्नी असा परिवार आहे. या घटनेबाबत लढा संघटनेचे संदीप गायकवाड यांनी सांगितले महानगरपालिकेने व कोणार्क कंपनीच्या प्रशासनाने महादू जगताप यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी जेणेकरून त्याच्या मुलांच्या भवितव्याचे तजबीज करता येईल, त्याच्या कुटुंबाला आधार होईल आणि ज्या आरोपीने हे कृत्य केले या घटनेच्या निषेधार्थ उद्या आम्ही काम बंद आंदोलन करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. त्या तरुणाने महादू जगताप यांच्यावर इतक्या भयानक प्रमाणे चाकूने सपासप वार का केले. याचीही माहिती पोलीस काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. या घटनेमुळे उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली असून शहरातील मोकाट फिरणाऱ्या नशेखोर व गांजाडी तरुणाविरुद्ध पोलिसांनी त्वरित काहीतरी उपयोजना करावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.

राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी सोहळा आज लोकभवन येथे पार पडला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या…

मुंबई विद्यापीठाला कांस्यपदक

पश्चिम विभाग आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा मुंबई विद्यापीठाला कांस्यपदक कल्याण: एच.एस.एन.सी. विद्यापीठ, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी पश्चिम विभाग आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ (पुरुष) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रतिष्ठित स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले असून संघाची अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात एसएसटी कला व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत पोटावाड याने प्रतिनिधित्व केले. अनिकेतने संघासाठी उत्कृष्ट खेळ करत उल्लेखनीय कामगिरी बजावली. मुंबई विद्यापीठाच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट रणनीती, संयम आणि कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे संघाला पश्चिम विभागातील बलाढ्य विद्यापीठांमध्ये आपले स्थान सिद्ध करता आले. या कामगिरीमुळे आता मुंबई विद्यापीठाचा संघ अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होणार असून देशभरातील विविध विद्यापीठांशी सामना करणार आहे. या संघासाठी मार्गदर्शक म्हणून अमित भोजने आणि मार्गदर्शक म्हणून उमेश सोनवणे यांची निवड झालेली आहे. अनिकेत पोटावाडच्या या उल्लेखनीय यशाबद्दल एसएसटी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि क्रीडा विभागाने त्याचे अभिनंदन केले असून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.

पालकांनी आपली मुलगी कशी सक्षम होईल याकडे लक्ष द्यावे – हर्षाली चौधरी

पालकांनी आपली मुलगी कशी सक्षम होईल याकडे लक्ष द्यावे – हर्षाली चौधरी कल्याण: पालकांनी आपली मुलगी कशी सक्षम होईल याकडे लक्ष द्यावे आणि मुलीच्या करिअरला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन महापौर हर्षाली चौधरी यांनी केले.   कल्याण (प.) येथील सिटी पार्कच्या निसर्गरम्य परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि सिटी पार्क मॅनेजमेंट यांच्या सयुक्त विद्यमाने ‘अहिल्या-जागर-स्त्री शक्तिचा’ या उक्तीनुसार आयोजित करण्यात आलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले. महिलांचे योगदान सेलिब्रेट करण्यासाठी हा कार्यक्रम करित आहेात ,सर्व क्षेत्रात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. महापालिका देखील महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवित आहे अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाची सुरवात सुमधुर उडत्या गाण्यांनी झाली. या सुरावटींवर तरुणाईने ठेका धरल्याने सर्व वातावरण या सुरांनी भारुन गेले. या कार्यक्रमात ‘स्टोरी ऑफ चेंज’ या आशयाखाली आज तक वृत्तवाहिनीच्या अनुजा धाक्रस, MD Miss India २०२० गजनंदीनी, ठाण्यातील पहिल्या स्टेशन मॅनेजर अपर्णा देवधर, पॉवर लिफटींग मध्ये गोल्ड मेडेल्स मिळवलेल्या गिरिजेश कुमारी, ठाणे जिल्ह्यातील नॅशनल कुस्ती पटू माधवी कुरले या महिलांचा सत्कार महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांचे हस्ते करण्यात आला. विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी बजावलेल्या या महिलांनी आपल्या मनोगतात उपस्थित सर्व महिलांना यशाचा अथक श्रमाने पाठपुरावा करणे बाबत संदेश दिला. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावलेल्या आठ महिलांचा देखील सत्कार करण्यात आला, त्याचप्रमाणे बचत गटातील स्वच्छता मार्शल म्हणून नेमणूक केलेल्या महिलांचा तसेच दामिनी पथकातील पोलिस मार्शलचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापालिका क्षेत्रातील निराधार महिलांना आणि बचत गटांना प्रातिनिधीक स्वरुपात अनुदानाचे वितरणही या वेळी करण्यात आले. यावेळी  करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणाने उपस्थित महिला प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी पालिका सदस्य रेश्मा निचळ, शितल मंडारी, अनघा देवळेकर, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त कांचन गायकवाड, रामदास कोकरे, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, सहाय्यक आयुक्त सुषमा मांडगे, समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.