Category: ठाणे

Thane news

तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील कल्याण : कल्याण मधील विठ्ठलवाडी, शहाड भागातून वाहत असलेल्या वालधुनी नदी पात्रात मागील दोन महिन्यांपासून मातीचे भराव टाकून बांधकामे उभी केली जात आहेत. या बांधकामांमुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अडून वालधुनी नदीचे पाणी लगतच्या वस्त्यांमध्ये शिरून रहिवाशांची दैना होणार आहे. हे माहिती असुनही कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन, महसूल विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ वालधुनी नदी काठ भागातील तीन हजार कुटुंबीयांंनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. वालधुनी नदी बचाव रहिवासी संघर्ष समितीने हा निर्णय घेतला आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडला की वालधुनी नदीचे पाणी विठ्ठलवाडी, शहाड भागातील नदी काठच्या झोपड्या, गृहसंकुलांमध्ये शिरते. दरवर्षी कल्याण डोंबिवली पालिकेला या भागातील पाण्याचा निचरा करताना कसरत करावी लागते. हे माहिती असुनही कल्याण डोंबिवली पालिकेने विठ्ठलवाडी पूर्व भागात वालधुनी नदी काठी बांधा, वापरा, हस्तांतरित करा तत्वावर एक बांधकाम प्रकल्प एका विकासकाला विकसित करण्यासाठी दिला आहे. या बांधकामासाठी नदीमधील अर्धा भाग मातीचा भराव टाकून बुजविण्यात आला आहे. या भरावामुळे नदीचा प्रवाह अरूंद झाल्याने पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती नसताना नदीचे पाणी लगतच्या वस्त्यांमध्ये घुसून रहिवाशांना बेघर होण्याची वेळ येणार आहे, असे वालधुनी नदी बचाव रहिवासी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यासंंदर्भात पालिका आयुक्तांपासून सर्व अधिकाऱ्यांना सांगुनही कोणीही संघर्ष समितीच्या तक्रारींची दखल घेत नाही. या भागातील रहिवाशांना जलमय करण्याचा आणि बेघर करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्याचा निषेध म्हणून या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समितीने घेतला आहे, असे समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले. फलका्व्दारे इशारा वालधुनी नदी पात्रातील बांधकाम कल्याण डोंबिवली पालिकेकडून थांबविली जात नाही तोपर्यंत आताच्या लोकसभा निवडणुकीपासून ते येणाऱ्या विधानसभा, पालिका निवडणुकीवरही वालधुनी नदी परिसरातील साईनगर भागातील रहिवासी बहिष्कार टाकतील, असा इशारा वालधुनी नदी बचाव रहिवासी संघर्ष समितीने वालधुनी नदी भागात साईनगर भागाच्या प्रवेशद्वारावर एका फलकाव्दारे दिला आहे. कल्याण परिसरात मतदान टक्का वाढविण्यासाठी शासन यंत्रणेकडून जोरदार प्रयत्न सुरू असताना या बहिष्काराच्या अस्त्रावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर

नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण डोंबिवली : पूर्वेतील स्वामी समर्थ मठ भागातील नांदिवली पंचानंद येथे रविवारी पुनर्विकासासाठी एक इमारत तोडताना ठेकेदाराने धुळ प्रतिबंधक कोणत्याही उपाययोजना न करता शक्तिमान यंत्रांच्या साहाय्याने दिवसभर तोडकाम केल्याने या भागात धुळीचे लोट पसरले होते. परिसरातील रहिवासी, पादचारी, प्रवासी या धुळीने हैराण होते. विशेष म्हणजे इमारत तोडण्याच्या बाजुला एका खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयातील रुग्णांना या धुळीचा प्रचंड त्रास झाल्याच्या तक्रारी आहेत. परिसरातील रहिवाशांच्या घरात धूळ पसरल्याने त्यांना दरवाजे, खिडक्या बसून घरात बसावे लागते. या भागातील रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना धुळीचा सामना करत प्रवास करावा लागत होता. मुंबई उच्च न्यायालयाने हवेतील धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना पालिकांंना केल्या आहेत. गेल्या वर्षापासून कल्याण डोंबिवली पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी धूळ प्रतिबंधक उपाययोजना न करता इमारत तोडणाऱ्या, धुळीचे प्रदूषण करणाऱ्या अनेक विकासक, ठेकेदारांवर दंडात्मक कारवाया केल्या आहेत. नांदिवलीत धुळीचे लोट हे माहिती असुनही डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद येथे नांदिवली लाईफ केअर रुग्णालयाच्या समोर रविवारी सकाळपासून एक इमारत पुनर्विकासासाठी तोडण्याचे काम शक्तिमान यंंत्राच्या साहाय्याने ठेकेदाराने सुरू केले होते. हे तोडकाम सुरू करण्यापूर्वी ठेकेदाराने इमारतीच्या चारही बाजुला २५ फूट उंचीचे पत्रे, चारही बाजुने हिरव्या जाळ्या लावून धूळ नियंत्रित करणे, पाडकाम करण्यापूर्वी आणि करताना इमारतीवर टँकरव्दारे पाण्याचे फवारे मारणे ही कर्तव्य पाडकाम करताना संबंधित ठेकेदाराने पार पाडणे आवश्यक होते. ठेकेदाराने यामधील एकही अट पूर्ण केली नाही, असे या भागातील रहिवाशांंनी सांंगितले. पाडकाम करण्यापूर्वी या भागातील अनेक रहिवाशांनी ठेकेदाराला धूळ प्रतिबंधक उपाययोजना करण्याची सूचना केली, त्याची दखल ठेकेदाराने घेतली नाही. दिवसभर तोडकाम करून ठेकेदाराने परिसरात धुळीचे प्रदूषण केले, अशा तक्रारी रहिवाशांंनी केल्या. हे पाडकाम करणाऱ्या ठेकेदाराने न्यायालयाच्या आदेशाचा आणि पालिका प्रशासनाचे आदेश दुर्लक्षित करून इमारत पाडकाम केल्याने या ठेकेदारावर पालिकेने दंडात्मक कारवाई करून धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या शिवाय ठेकेदाराला इमारत बांधकाम तोडण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

ठाणे लोकसभेच्या जागेत संभ्रम कायम, उमेदवार अनिश्चितीमुळे महायुतीचा प्रचार थंडावला

भाईंदर : ठाणे लोकसभा जागेसाठी महायुतीचा उमेदवार निश्चित होत नसल्यामुळे भाजप- शिवसेना पक्षांअंतर्गत संभ्रम वाढू लागला आहे. त्यामुळे शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवशी मिरा भाईंदर शहरातील प्रचार थंडावल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतरही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही. शिवेसना आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून ठाणे मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे. भाजपाने दावा करून संजीव नाईक यांचे नाव पुढे केले होते. त्यांनी प्रचारदेखील सुरू केला होता. नंतर शिवसेनेतर्फे प्रताप सरनाईक यांचे नाव समोर आले. पण त्याची देखील अधिकृत घोषणा झाली नाही. दोन्ही पक्षांच्या या रस्सीखेचामुळे मिरा भाईंदर शहरातील महायुतीचा प्रचार थंडावला आहे. शनिवार रविवारी तर शहरात कुठेही प्रचार मेळावे, सभा आयोजित करण्यात आलेले नव्हते.. सुरवातीला नरेंद्र मोदी यांना उमेदवार समजून प्रचार करण्यात येत होता. मात्र आता उमेदवाराबाबत एवढी अनिश्चितता निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला आहे. परिणामी महायुतीचा प्रचार थंडावत गेला. महाविकास आघाडी जोरात.. महायुतीचा उमेदवार ठरत नसल्याने त्यांचा प्रचार थंडावला असला तरी दुसरीकडे हाविकास आधाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी हा मतदार संघ पिंजून काढला असून अन्य पक्षातील नाराज उमेदवारांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा सुरु ठेवला आहे. महायुती मध्ये उमेदवारीवरून सुरु असलेल्या वादामुळे अंतर्गत गटातटाचे राजकारण महायुतीला हानीकारक ठरू शकेल अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे. तर भाजपाच्या स्थानिकांना करावा लागणार सरनाईकांचा प्रचार ठाणे लोकसभेसाठी भाजपातून इच्छुक असलेल्या संजीव नाईक यांनी मागील वर्षभरापासून मिरा भाईंदर, ठाणे आणि नवी मुंबई मधील कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेतून आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, आणि नरेश मस्के हे इच्छुक असल्याचे समजते. प्रताप सरनाईक आणि भाजपाच्या एका गटात वाद आहे. मात्र त्यांची उमेदवारी जाहीर झाली तर भाजपाच्या स्थानिक नेत्यांना त्यांच्या प्रचारात उतरावे लागणार आहे.

‘मनसेच्या मूळ इंजिनमुळे ट्रिपल इंजिन महायुती सरकारला आणखी गती’

मनसे आमदार राजू पाटील यांची मिश्किल टिपणी डोंबिवली : आतापर्यंत महाराष्ट्रात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे महायुतीचे ट्रिपल इंजिनचे सरकार काम करत होते. आता या इंजिनना मनसेचे मूळ इंजिन जोडले गेल्याने या ट्रिपल इंजिन महायुती सरकारला आणखी गती मिळेल आणि वेगवान विकास पाहण्यास मिळेल, असा विश्वास कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी रविवारी डोंबिवलीत खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या येथील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरातील कार्य अहवाल प्रकाशन समारंभात व्यक्त केला. ट्रिपल इंजिनचे सरकार असले तरी या इंजिनमध्ये खरे इंजिन हे मनसेचे मूळ इंजिन आहे, याची जाणीव ठेवावी असे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. शिंदे यांच्याकडे पाहत मिश्किल टिपणी केली. महायुतीमध्ये मनसे सामील झाली असली तरी मनसेचे कार्यकर्ते महायुती उमेदवारांचा प्रचार करतील का, अशा वावड्या उठल्या आहेत, याविषयी बोलताना आमदार पाटील यांनी कल्याण आणि भिवंडी लोकसभेतील दोन्ही उमेदवारी यापूर्वी मनसेमध्ये होते. ते दोन्हीही मनसे सोडून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आता आमचा काही संबंध राहिलेला नाही. अशा सोडून गेलेल्यांकडे मनसे ढुंकुण पाहत नाही, असे सांगून आमदार पाटील यांनी मनसे भक्कमपणे कल्याण लोकसभेत डॉ.श्रीकांत शिंदे आणि भिवंडीत कपील पाटील यांच्या पाठीशी असल्याचे संकेत दिले. विकास कामे, निधी विषयांवरून यापूर्वी आमचे आणि खासदार शिंदे यांच्यात काही लुटुपुटुच्या लढ्या झाल्या असल्या तरी ते वाद तात्विक होते. आम्ही एकमेकांची मने कायमची तोडली नाहीत, अशा शब्दात आमदार पाटील यांनी आपण डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत भक्कमपणे असल्याची ग्वाही दिली. महायुतीला पाठिंबा देण्याबाबत आपणास यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपर्क केला होता. आपण ही जबाबदारी आपले नेते राज ठाकरे याच्याशी बोलून निर्णय घ्या, असे कळविले. महायुतीकडून राज ठाकरे यांना विचारणा होताच मोदी यांच्यासाठी मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. हीच कृती यापूर्वी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी बोलून केली असती तर आता राज्यात वेगळे चित्र दिसले असते, असे सांगून पाटील यांंनी उध्दव ठाकरे यांना लक्ष्य केले. ठाण्यातील बाळकुम, गायमुख भागातून येणारा उड्डाण पूल कोपर, रेतीबंदर भागापर्यंत आणून उतरविला तर वाहतुकीचे विभाजन होऊन नागरिकांना पाच मिनिटात मुंब्रा शहरापर्यंत जाणे शक्य होईल. तसेच या भागात सर्वाचेपचारी रुग्णालये आणि क्रीडासंंकुले विकसित करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली. श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवाल प्रकाशन कार्यक्रमात आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होत्या. शिवसेनेकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. विकासाच्या विषयावर बोलताना आमदार राजू पाटील यांचा उल्लेख करताना खासदार शिंदे यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटत होती.

तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी महापालिकेची उपाययोजना

पाणपोई सुरू, शीत रूम, औषधे यांची सज्जता ठाणे : दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार कार्यवाहीस सुरूवात झाली आहे. सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात येत आहेत. तसेच, महापालिकेची सर्व आरोग्य केंद्र, पालिका रुग्णालय यांनी शीत रुम आणि औषधे यांची सज्जता ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तीव्र उष्णतेमुळे होणाऱ्या आजाराच्या प्रतिबंधासाठी ठाणे महानगरपालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेच्या धोक्याला नियंत्रण करण्यासाठी सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा, महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका व काऊन्सील ऑफ ऍनर्जी एनव्हायरोमेंट अॅण्ड वॉटर या संस्थेने एकत्रितपणे तयार केलेला आहे. उष्णतेच्या लाटेच्या सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे. ठामपा क्षेत्रातील ३३ आरोग्य केंद्रे, ५ प्रसूतीगृहे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उष्माघात, त्याची लक्षणे, घ्यायची काळजी याची माहिती देणारी पत्रके लावण्यात आली आहेत. तसेच, उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी औषधे, शीत रूम तयार ठेवलेली आहे. आरोग्य केंद्रांनी त्यांच्या परिसरातील रहिवासी संकुलामध्ये जनजागृती पत्रके लावली आहेत. त्याचबरोबर, खाजगी रुग्णालयांनाही उष्णतेच्या आजाराला सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. शाळा, महाविद्यालये येथेही जागृती करण्यात येत आहे. संस्थांची बैठक या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी काय करावे, काय करू नये, उष्णतेच्या आजाराची लक्षणे कोणती, पाणपोईची व्यवस्था आदींबाबत चर्चा करण्यासाठी शनिवार, सायंकाळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली एका ऑनलाईन बैठक सत्राचेही आयोजन महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केले होते. त्यात, रिक्षा संघटना, टॅक्सी संघटना, कामगार उपआयुक्त यांचे प्रतिनिधी, उपआयुक्त (शिक्षण), एमसीएचआय-क्रेडाई, हॉटेल असोसिएशन, उद्योग संघटना, टीसा, मेट्रो, एमएसआरडीसी, रेल्वे, एसटी महामंडळ, आरटीओ यांचे प्रतिनिधी, सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. तीन ठिकाणी पाणपोई सुरू आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महापालिका क्षेत्रात निरनिराळ्या ठिकाणी उष्माघात, लक्षणे, घ्यायची काळजी यांची माहिती देणारे फलक, डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत. पोस्टर्सच्या माध्यमातून सर्व गृहसंकुलांपर्यंत ही माहिती पोहोचवली जात आहे. तसेच, ठाणे महापालिकेच्या आवाहनानुसार, सीएसआरच्या माध्यमातून पाणपोई सुविधाही उपलब्ध केली जात आहे. सध्या ठाणे रेल्वे स्टेशन, नौपाडा-आईस फॅक्टरी, तीन हात नाका – सिग्नल शाळेसमोर या तीन ठिकाणी समर्थ भारत व्यासपीठामार्फत पाणपोई सुरू करण्यात आली आहे. त्यात दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संस्था करणार आहे, अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.

मॉर्डन क्रिकेट क्लब सलग दुसऱ्यांदा अजिंक्य

ठाणे : आकाश सावला आणि निशांत मानेने पाचव्या गड्यासाठी केलेल्या नाबाद १०८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर गतविजेत्या मॉर्डन क्रिकेट क्लबने माझगाव क्रिकेट क्लबचा ६ गडी राखून पराभव करत स्पोर्टींग क्रिकेट क्लब…

नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली कल्याण यांच्यावतीने डोंबिवलीमध्ये भव्य कबड्डी स्पर्धेचा थरार

ठाणे- नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ (डोंबिवली – कल्याण) यांच्या विद्यमाने सुधागड तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवार दि. 21 एप्रिल 2024 रोजी लोढा हेरिटेज मैदान, भोपर रोड,…

माणकोली उड्डाण पुलांवरील वाहनांमुळे रेतीबंदर फाटकात दररोज वाहन कोंडी

वाहतूक पोलीस नसल्याने स्थानिकांकडून नियोजन डोंबिवली : मोठागाव माणकोली उड्डाण पुलावरून मुंबई, ठाणे किंंवा नाशिककडे जाण्यासाठी विना अडथळा, सुसाट वेगाने जाता येत असल्याने प्रवासी माणकोली पुलावरून जाण्यास पसंती देत आहेत.…

लोकलमधील प्रवाशाकडून मद्याचा साठा जप्त

पोलिसांची मोठी करवाई डोंिबवली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांनी तपासणीदरम्यान धावत्या…

“आमचं काम बोलतं”, कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदेंची प्रचार मोहीम

शिळफाटा रस्त्यावर विविध विकास कामांचे होर्डींग डोंबिवली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा प्रतिष्ठेचा असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना अद्याप उमेदवारी घोषित करण्यात आलेली…