Category: ठाणे

Thane news

बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर

कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल पनवेल : रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पायी चालणाऱ्या प्रवाशांची वाट तीन आसनी रिक्षाचालकांनी अडवली आहे. सध्या तीन आसनी रिक्षांना स्थानक परिसरात काम सुरू असल्याने प्रवेशबंदी केल्याने काही रिक्षाचालकांनी पादचाऱ्यांची वाट अडवून पोलिसांच्या कारवाईला ठेंगा दाखविला आहे. वाहतूक पोलिसांना याबाबत विचारल्यावर त्यांनी बेशिस्त चालकांवर कारवाई सुरू असल्याची माहिती दिली. पनवेल स्थानक परिसरात बहुउद्देशीय मार्गिकेच्या विस्तारीकरणाचे काम असल्याने स्थानकात रेल्वे पकडण्यासाठी वृद्ध, बालक व अपंगांना स्थानक गाठण्यासाठी दिव्य पार करावे लागते. सुमारे काही मीटर अंतर हातामध्ये ओझे घेऊन चालणाऱ्या प्रवाशांना स्थानकाकडे जाणाऱ्या वाटेत रिक्षांना वळसा घालून जावे लागते. काही रिक्षाचालक त्यांची वाहने बेकायदा पद्धतीने स्थानकापर्यंत घालतात. सामान्य प्रवासी मात्र वाट काढत स्थानकापर्यंत जातो. दीड महिन्यापूर्वी रिक्षाचालकांच्या दोन गटांतील हाणामारीमुळे पनवेल रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या विस्तारीकरणाचे काम पुढे करत रिक्षांना स्थानक परिसरातील स्टॅण्डपर्यंत येण्यास बंदी केली. मात्र रिक्षांना प्रवेश नाही तर सर्वसामान्यांच्या वाहनांना स्थानक परिसरातील रस्ता बंद करण्याची वेळ आली. बेशिस्त पार्किंग व्यवस्था, रेल्वे प्रशासनाचा अनियोजित कारभार आणि रेल्वे तसेच वाहतूक पोलिसांची सातत्याची कारवाई नसल्याने या असमन्वयाच्या कारभारात सामान्य प्रवासी भरडले जात आहेत. सामान्यांची वाट अडवणाऱ्या या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलीस कारवाई करतील का, हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे स्थानक परिसरात व्यवसाय करणारे रिक्षाचालक प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. रात्रीच्या वेळेस बोलीभाडे पद्धतीने अवाजवी भाडे आकारले जातात. रिक्षाचालक नियमाप्रमाणे व्यवसाय करत नाहीत, याला पनवेलचा प्रादेशिक परिवहन विभागसुद्धा जबाबदार आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने वेळीच लक्ष न घातल्याने ही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. स्थानक परिसरात विस्तारीकरणाचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतल. मात्र एसटी बस पकडण्यासाठी प्रवाशांना दीडशे पावले चालावे लागते. रिक्षा पकडण्यासाठी शंभर पावले चालावे लागते. अपंग व वृद्धांसाठी रेल्वे प्रशासनाने कोणतीही सुविधा ठेवली नाही. पनवेलमधील रिक्षाचालकांनी शिस्त पाळून व्यवसाय करावा यासाठी वेळोवेळी रिक्षाचालकांचे प्रबोधन केले आहे. वेळीच त्यांच्यावर कारवाई केली आहे. पोलिसांची कारवाई या परिसरात सातत्याने सुरू असते. रात्रीच्या व पहाटेच्या वेळी रिक्षाचालक रस्ता अडवून रिक्षा उभी करत असल्यास पोलीस कर्मचारी बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई नक्की करतील. -संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल वाहतूक विभाग

श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलतर्फे ‘गिफ्ट ऑफ लाइफ

सुमारे 30,000  मोफत बाल हृदय शस्त्रक्रिया पनवेल – महाराष्ट्रातील मुंबई; छत्तीसगडमधील रायपूर आणि हरियाणातील पलवल येथील श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल्सने “गिफ्ट ऑफ लाइफ” या कार्यक्रमांतर्गत 30,000 मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रिया…

स्पोर्टींग क्लब कमिटीने जेतेपद राखले

ठाणे ज्युनियर लीग क्रिकेट स्पर्धा ठाणे : शताब्दी वर्ष साजरे करत असलेल्या स्पोर्टींग क्लब कमिटी संघाने विरारच्या अमेय स्पोर्ट्स अकॅडेमीचा तब्बल आठ गडी राखून दणदणीत पराभव करत संदीप दहाड अकॅडेमी आयोजित १२ वर्षे वयोगटाच्या १५ षटकांच्या ठाणे ज्युनियर लीग क्रिकेट स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. निर्णायक लढतीत स्पोर्टींग क्लब कमिटी संघाने उपविजेत्या संघाने दिलेले ११२ धावांचे आव्हान १३.५  षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात ११६ धावा करत अजिंक्यपद कायम राखले. सेंट्रल मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत अमेय स्पोर्ट्स अकॅडेमीने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात ११२ धावा केल्या. सोहम पलईने ४२ धावांची खेळी करत संघाच्या शतकी धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. कौशिक साळुंखेने दोन, अतुल चौधरी आणि अर्णव पांडेने प्रत्येकी एक गडी बाद केला. स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या अनुज चौधरीने या सामन्यातही आपली छाप पाडताना नाबाद ६८ धावा करत संघाला लागोपाठ दुसऱ्या वर्षी विजयी करण्यात मोलाची कामगीरी बजावली. कर्णधार आरुष खंदारेने २० धावा बनवल्या. त्याआधी स्पोर्टींग क्लब कमिटीने उपांत्य फेरीत माटुंगा जिमखान्याच्या ९ गडी राखून फडशा पाडला होता. अर्णव वाणीने ३ गडी बाद करत माटुंगा जिमखान्याला १५ षटकात ७ बाद ८८ धावांवर रोखले होते. त्यांनतर अर्णव चौधरीने नाबाद ४१ आणि आरुष खंदारेने ३१ धावा बनवत ११.४ षटकात १ बाद ८९ धावांसह संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले होते. स्पोर्टींग क्लब कमिटीच्या १२ वर्षाखालील संघाचे या मोसमातील हे दुसरे विजेतेपद आहे. शताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित केलेल्या १२ वर्ष वयोगटाच्या स्पर्धेत यजमान संघ विजयी ठरला होता. एल्फ वेंगसरकर अकॅडेमी आयोजित ड्रीम इलेव्हन स्पर्धेत या संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. याशिवाय त्यांच्या १६ वर्षांखालील संघानेहि शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धेत बाजी मारली होती. यजमान स्पोर्टींग क्लब कमिटीने त्यस्पर्धेत एसपी ग्रुप क्रिकेट क्लबचा पराभव केला होता. संक्षिप्त धावफलक : अमेय स्पोर्ट्स अकॅडेमी : १५ षटकात ७ बाद ११२ (सोहम पलई ४२, कौशिक साळुंखे ३-०-१५-२, अतुल चौधरी ३-०-२५-१, अर्णव पांडे २-०-१३-१) पराभूत विरुद्ध स्पोर्टींग क्लब कमिटी : १३.५ षटकात २ बाद ११६ ( अनुज चौधरी नाबाद ६८, आरुष खंदारे २०) स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : सर्वोत्तम फलंदाज : अनुज चौधरी, सर्वोत्तम गोलंदाज : अर्णव वाणी (७ विकेट्स), सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : अतुल चौधरी, सर्वोत्तम कर्णधार : आरुष खंदारे (सर्व स्पोर्टींग क्लब कमिटी ).

आरटीई २५% मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत पात्र असणाऱ्यांनी सुविधेचा लाभ घ्यावा – बाळासाहेब राक्षे

अनिल ठाणेकर ठाणे : आरटीई २५% मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत पात्र असणाऱ्या (वंचित गट : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,एसटी, व्हिजे, ओबीसी, एसबीसी, दुर्बल गट- १ लाखापेक्षा कमी उत्पन्न, दिव्यांग  बालकांचे ४०% अपंगत्व असल्यास) जास्तीत जास्त पालकांनी आपल्या बालकांची अर्ज नोंदणी करून सदर सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षण विभाग (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सर्व पंचायत समिती व महानगर पालिकामध्ये एकूण २ हजार ६१६ पात्र शाळा असून एकूण ३६ हजार ८२८ रिक्त जागा उपलब्ध आहेत. आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून दिलेल्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new  या वेबसाईटवर दि. १६/०४/२०२४ ते ३०/०४/२०२४ रोजी पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centers), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या वरील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, असेही शिक्षण विभाग (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले.

उल्हासनगरातील आंबेडकरी चळवळीतील नेत्याचा मुलगा आयएएस

अभिषेकची आयआरपीएसवरून आयएस पदावर झेप उल्हासनगर : आंबेडकरी चळवळीतील नेते माजी नगरसेवक प्रमोद टाले यांचा मुलगा अभिषेक टाले यांनी दुसऱ्यांदा दिलेल्या यूपीएससी परीक्षेत आयआरपीएस वरून आयएएस पदावर झेप घेतली आहे.या…

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल

भाजपच्या जाहीरात होंर्डींगवर पालिकेची कारवाई डोंबिवली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारार्थ मोदी की गॅरंटी असे जाहीरातींचे होर्डींग कल्याण शीळ रोड परिसरात लागले असल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे प्राप्त झाली. पालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीर रित्या लावण्यात आलेल्या या होर्डींगवर पालिका प्रशासनाच्यावतीने रातोरात कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी जाहीरात एजन्सीवर मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे होर्डींग काढताना पालिका कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली असून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा सहारा पालिका कर्मचाऱ्यांना घ्यावा लागला. केडीएमसी हद्दीत आचारसंहितेचा हा पहिला गुन्हा आहे. कल्याण लोकसभा निवडणूका जाहीर झाल्या असून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी हद्दीत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी व शासकीय कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे फलक, ध्वज काढण्यात आले आहेत. पक्षाची चिन्हे, नावे झाकण्यात आली आहेत. आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये याबाबत आवाहन देखील प्रशासनाने केले आहे. आचारसंहितेचा भंग झाल्यास तातडीने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून केडीएमसी हद्दीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी न घेता आचारसंहितेचा भंग करत हे होर्डींग लावले असल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे प्राप्त झाली. प्राप्त तक्रारीनुसार केडीएमसीने या होर्डींगवर कारवाई करत ते रातोरात उतरविले आहेत. केडीएमसी ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिस ठाण्यात कळवा येथील ए.डी.प्रमोशन अॅडव्हर्टायझिंग एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल तक्रारीनुसार सोमवारी सायंकाळी निवडणूक विभागाच्या अॅपवर तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीत जाहीरातीचे फोटोंसह परवानगी शिवाय काही ठिकाणी पोस्टर, बॅनर लावण्यात आले आहेत असा संदेश दिला गेला होता. सदरचे ठिकाण हे डोंबिवली असे दर्शविले होते. त्यानुसार सहाय्यक आयुक्त भारत पवार यांसह फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी सर्जेराव जाधव, गणपत गायकवाड, अरविंद म्हसकर, सावंत पाटील, रतन खुडे, विलास पाटील, भगवान पाटील, अमित गायकर, प्रकाश म्हात्रे, गणेश दळवी यांनी दावडी रिजन्सी येथे पाहणी केली. कल्याण शीळ रोडवर साई सिटी निळजे रोडलगत लोखंडी साच्यावर अंदाजे 10 ते 12 मजले उंच असा 40 बाय 40 फुट लांबी रुंदी आकाराचा होर्डिंग लावलेला पथकास आढळला. त्यावर 4 कोटी पक्की घरे, बांधली आहेत, आणखी बांधली जातील मोदी ची गॅरंटी, पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन करा असा मजकूर लिहिलेला होता. तसेच त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो होता. हा जाहीरातीचा रंगीत होर्डिंग अनधिकृत रित्या लावुन आचारसंहिता कालावधीत मालमत्ता विदुपिकरन करून जाहिरात होर्डिंग लावण्यात आला असल्याचे निर्देषानास आले. याविषयी पवार यांनी केडीएमसीच्या मालमत्ता विभागाशी संपर्क करत विचारणा केली असता त्यांनी हे होर्डिंग ए.डी.प्रमोशन अॅडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस असल्याचे सांगितले. तरी नमुद कंपनीने कोणत्याही प्रकारे कल्याण डोंबिवली मनपा कार्यालयाकडुन पुर्व परवानगी न घेता ती बेकायदेषिर रित्या लावण्यात आली असल्याचे मालमत्ता विभागाच्या निर्देषनास आल्याने सदर घटनास्थळी जात पालिका कर्मचाऱ्यांनी ते होर्डींग हटविले. त्याचा पंचनामा करुन ते ताब्यात घेत कार्यालयात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले असल्याचे म्हटले आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हा पहिलाचा गन्हा दाखल झाला असून पालिका प्रशासन व निवडणूक विभागाने परिसरात बेकायदा होर्डींग, बॅनरची पहाणी करण्यावर जोर दिला आहे.

ठाण्यात प्रताप सरनाईक उमेदवार?

तिन्ही पोलीस आयुक्तालयांकडून गुन्ह्यांची माहिती मागविली ठाणे : महायुतीच्या जागावाटपात ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या तिन्ही पोलीस आयुक्तालयांमधून स्वत: विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागविल्याने येथील राजकीय वर्तुळात नव्या चर्चाना उधाण आले आहे. आपणास लोकसभा निवडणूक लढवायची असल्याने त्यासाठी ही माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करणे महत्त्वाचे असल्याचे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे. सरनाईक यांनी पाठविलेले हे पत्र मार्च महिन्याच्या अखेरचे असून दरम्यानच्या काळात महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत बऱ्याच घडामोडी घडून गेल्या आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सेनेपुढील ठाण्याचा संभ्रम वाढविल्याची चर्चा होती. ठाणे लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मिळायला हवा आणि या मतदारसंघातून भाजप नेते गणेश नाईक यांच्या कुटुंबीयांपैकी कुणालाही उमेदवारी देऊ नका, अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी घेतली होती. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा वाढल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई पोलिसांना पत्र पाठवून स्वत: विरुद्ध दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती मागविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, हे पत्र जुने असले तरी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाल्यामुळेच सरनाईक यांनी हे पत्र पुढे रवाना केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडून ठाण्याच्या जागेसाठी माजी महापौर नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक आणि आमदार प्रताप सरनाईक अशी तीन नावे चर्चेत आहेत. ठाणे लोकसभेच्या जागेसंदर्भात महायुतीचे नेते जो निर्णय घेतील, तो निर्णय सर्वांना मान्य असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश मिळाल्यास निवडणूक रिंगणात उतरताना कागदपत्रांची जुळवाजुळव करताना घाई होऊ नये यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीसच आपण ही माहिती मागविली होती. – प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना

लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपाची राम गर्जना

आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ‘राम गर्जना’गीताचे अनावरण ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघासाठी अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नसला तरी महायुतीच्या नेत्यांनी मतदार संघात मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला असून त्यापाठोपाठ आता महायुतीतील भाजपने राम नवमीचे औचित्य साधून राम गर्जना गीताचे अनावरण केले आहे. नाही जगात तोड, श्रीराम बोल. प्रभु श्रीराम आमचा कणा, असे हे गीत असून या गीताच्या निमित्ताने भाजपने प्रचाराचे शंख फुकल्याची चर्चा आहे. ठाणे लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी गेल्या काही दिवसांपासून मेळाव्यांच्या माध्यमातून निष्ठावान विरुद्ध गद्दार असा प्रचार सुरू केला असून त्याचबरोबर विचारे यांनी आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नवरात्रौत्सवात राम मंदीराचा देखावा उभारण्यात आला होता. या उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी एकप्रकारे लोकसभा निवडणुक काळात राममंदीराचा उल्लेख करणाऱ्या भाजपला शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्यातच आता भाजपनेही राम नवमीचे औचित्य साधून राम गर्जना गीताचे अनावरण करत प्रचाराचे शंख फुकल्याची चर्चा आहे. प्रभु श्रीराम गर्जना या गीताचे गीतकार आणि संगीतकार प्रकाश बोर्डे आहेत. या गीताचे गायक गणेश खांडके हे आहेत. ठाणे येथील रोहन रेकॉर्डींग स्टुडिओ यांचे संगीत संयोजन आहे. भाजपचे ठाण्यातील पदाधिकारी महेश कदम यांचे गीतासाठी विशेष सहकार्य लाभले आहे. कार सेवक असलेले भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते गीताचे अनावरण करण्यात आले आहे. प्रभु रामंचद्रांनी रामराज्याची कल्पना आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्येत राम मंदीर उभारून एकप्रकारे देशात रामराज्य आणण्याचा संदेश दिला आहे. राम राज्य म्हणजे गरिबांची सेवा, सुशासन, विकास, अशी प्रतिक्रिया आमदार केळकर यांनी यावेळी व्यक्त केली. काय आहे गीत श्वासा श्वासात राम, ध्यासाध्यासात राम, नसानसात राम, रक्तारक्तात राम, या हद्यात रामगर्जना…तुम्ही आम्ही मिळून करू राम वंदना. निष्ठेने वागा, दिली शिकवण प्रभु श्रीरामांनी. मर्यादा पुरुषोत्तम तुम्ही आर्दश आमच्यासाठी. नाही जगात तोड, श्रीराम बोल. प्रभु श्रीराम आमचा कणा, असे हे गीत आहे.

कल्याण पश्चिम मतदारसंघामध्ये दोन लाख मतांचा महायुतीचा निश्चय

कॉंग्रेसचे नेते प्रकाश मुथा भाजपात दाखल कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम मतदारसंघामध्ये महायुतीच्या झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात महायुतीच्या नेत्यांनी केवळ कल्याणमधून दोन लाख मते मिळविण्याचा निश्चय केला आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या साह्याने घराघरांमध्ये पोचून पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्याचा संकल्प केला. या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीत प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आधारवाडी येथे मंगळवारी सायंकाळी उत्साहात व जल्लोषात पार पडला. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री व महायुतीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, माजी आमदार जगन्नाथ शिंदे, मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश बारशिंगे, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, माया कटारिया, उपेक्षा भोईर, वैशाली पाटील, कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील आदींसह महायुतीचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेसच्या इंटकचे प्रदेश अध्यक्ष व प्रदेश चिटणीस प्रकाश मुथा यांनी कॉंग्रेसचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत भाजपामध्ये प्रवेश केला. कल्याण पश्चिम मतदारसंघात महायुतीतील सर्व पक्षांची ताकद एकत्र आली आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक घरापर्यंत पोचून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांत आणि राज्यातील महायुती सरकारने दोन वर्षांत केलेल्या कामाची माहिती द्यावी, असे आवाहन करून दोन लाख मते मिळविण्याचा निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. देशातील १४० जनतेला शांत झोप लागावी. गरीबांचे कल्याण व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत. त्यांच्यामध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. आपल्या देशाचे व पुढील पिढीचे भविष्य घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून द्यावे, असे आवाहन कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन नागरिकांना करावे. महाविकास आघाडीच्या भूलथापांना मतदारांनी बळी पडू नये, असे ते म्हणाले. कल्याण पश्चिम मतदारसंघाच्या इतिहासात नोंद होईल, असा हा भव्य मेळावा आहे. महायुतीची ताकद पाहून विरोधकांनाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. मनसेची एक लाख मतांची ताकद आपल्यासोबत आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचाही मोठा समर्थक वर्ग आहे. रिपब्लिकन पक्ष, रासप आदींच्या मदतीने आपल्याला भिवंडी लोकसभा मतदारसंघात इतिहास रचता येईल, त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी केले. कल्याण शहरात केंद्र व राज्य सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. तर महाविकास आघाडी सरकारने अनेक प्रकल्पांना स्थगितीच दिली, अशी टीका कपिल पाटील यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचा कल्याण पश्चिममधील प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिकाने महायुतीच्या विजयासाठी झटावे, असे आवाहन आमदार विश्वनाथ भोईर व जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी केले. तर कल्याण-मुरबाड रेल्वे धावणार, ही समस्त मुरबाडवासियांच्या अभिमानाची बाब असून, महायुतीच्या विजयासाठी सर्वांनी कार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी केले. या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प

ठाणे : घोडबंदर येथील कापूरबावडी उड्डाणपूलावरील वाहतुक दुरूस्ती कामासाठी बंद करण्यात आल्याने बुधवारी सकाळी त्याचा परिणाम घोडबंदर मार्गावर झाला आहे. कापूरबावडी ते पातलीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतुक कोंडीमुळे वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहतुक करण्यास सुरूवात केली. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडली आहे. मुंबई नाशिक महामार्ग, ढोकाळी-हायलँड रोड येथील वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. वाहतुक कोंडीसोबत उन्हाचा फटका चालकांना सहन करावा लागत आहे. कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी उशीराने घराबाहेर पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. घोडबंदर मार्गावरून हजारो वाहने दिवसाला ठाणे, भिवंडी, नाशिक आणि मुंबईच्या दिशेने वाहतुक करतात. अवजड वाहने येथील कापूरबावडी उड्ड्डाणपूलावरून प्रवेश करून वाहतुक करतात. या उड्डाणपूलावरील रस्त्याला जोडणारी लोखंडी पट्टी बदलण्याचे कार्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंगळवारी रात्री हाती घेण्यात आले होते. परंतु या पट्टीवरील सिमेंट अद्यापही सुकलेले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी देखील हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. येथील उड्डाणपुलाखालून वाहतुक सोडण्यात आली. त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर झाला. घोडबंदरहून हजारो नोकरदार ठाणे, मुंबई, भिवंडीच्या दिशेने वाहतुक करतात. परंतु या वाहन चालकांना कोंडीत अडकावे लागले. त्यामुळे कापूरबावडी ते पातलीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. काही वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहने चालविण्यास सुरूवात केली. त्यामुळे कोंडीत भर पडली. पर्यायी मार्ग म्हणून काही वाहन चालकांनी ढोकाळी, हायलँड मार्गाचा पर्याय निवडला. येथीही कोंडीचा सामना सहन करावा लागला. कोंडीमुळे मुंबई नाशिक महामार्गाची वाहतुक रोखली जात आहे. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावरही भार वाढला आहे. उड्डाणपूलावरील वाहतुक दुपारनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. उन्हाचा मारा आणि कोंडी अशा दुहेरी समस्येत वाहन चालक अडकले आहेत.