Category: ठाणे

Thane news

सर्व होर्डिंगचे होणार आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट

अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी घेतला होर्डिंगच्या स्थितीचा आढावा अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेण्यासाठी करणार तत्काळ सर्वेक्षण ठाणे : मुंबईत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंगचे आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (स्थैर्यता प्रमाणपत्र) महापालिकेस सादर करण्याचे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी जाहिरात विभागास तत्काळ सर्वेक्षण करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी बुधवारी सकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपायुक्त (जाहिरात विभाग) दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त रंजू पवार, जाहिरात कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्रात होर्डिंग लावण्यासाठी लहान-मोठे असे २९४ स्ट्रक्चर (सांगाडे) आहेत. या सर्व स्ट्रक्चरचे नियमितपणे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते. मात्र, आता त्यांच्या मालकांनी-कंपन्यांनी पूर्णपणे नव्याने, आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (स्थैर्यता प्रमाणपत्र) महापालिकेस सादर करायचे आहे. त्यासाठी सर्व कंपन्यांना नोटीसाही देण्यात आल्या आहेत. स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (स्थैर्यता प्रमाणपत्र) सादर न केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, ज्या होर्डिंगचे आकारमान मंजूर मोजमापापेक्षा जास्त आहे. त्यात आठ दिवसात सुधारणा न झाल्यास वाढीव काम महापालिका काढून टाकणार आहे. त्याबद्दल संबंधित कंपनीकडून दंड आकारला जाणार असल्याचेही या बैठकीत रोडे यांनी सांगितले. तसेच, राज्य शासनाने निर्धारित केलेल्या उंचीपेक्षा जास्त उंचीवर फलक लावण्यात आले असल्यास ती उंचीही कमी करण्यात येणार आहे. उंची वाढवण्यात आलेल्या, धोकादायक होर्डिंगचे सर्वेक्षण जाहिरात विभागातर्फे करण्यात येणार आहे. त्याचवेळी, महापालिका क्षेत्रात अनधिकृत होर्डिंग असल्यास त्याचाही शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रात, मध्य रेल्वेच्या हद्दीत आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारित काही होर्डिंग आहेत. त्यांचेही आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेटची प्रत (स्थैर्यता प्रमाणपत्र) महापालिकेस सादर करण्यासंदर्भात दोन्ही यंत्रणांना कळविण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

सफाई कामगारांना घनकचरा विभागात हजर राहण्याचे आदेश

शिपाई, फेरीवाला हटाव पथकात काम करणाऱ्या कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागातील अनेक सफाई कामगार प्रभागांमध्ये फेरीवाला हटाव पथक, अधिकाऱ्यांचे शिपाई, टपाल वाहक म्हणून काम करतात. रस्त्यावर झाडू मारण्यापेक्षा कार्यालयात ऐषआरामात काम करण्यास मिळत असल्याने हे कामगार वर्षानुवर्ष लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने प्रभाग कार्यालये, पालिका मुख्यालयांमध्ये कार्यरत आहेत. अशा सर्व सफाई कामगारांनी तातडीने आपल्या मूळ नियुक्तीच्या घनकचरा विभागात हजर व्हावे, असे आदेश घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी सोमवारी दिले. कल्याण डोंबिवली शहरे कचरा मुक्त करण्याचे अभियान यशस्वी होत आहे. या कामासाठी घनकचरा विभागाला सफाई कामगारांची नितांत आवश्यकता आहे. आता कार्यरत असलेले बहुतांशी सफाई कामगार हे ५० वयाच्या पुढील आहेत. त्यांची क्रयशक्ती कमी झाली आहे. सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले ३५ ते ५० वयोगटातील अनेक सफाई कामगार वर्षानुवर्ष नगरसेवक, आमदार, राजकीय नेते यांच्या आशीर्वादाने कल्याण डोंबिवली पालिकेच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांचे दालन, यापूर्वी महापौर, सभापती यांच्या दालनात शिपाई, प्रभागात फेरीवाला हटाव पथकात वर्णी लावून घेण्यात यशस्वी झाले आहेत. रस्त्यावर काम करण्यासाठी घनकचरा विभागाला सफाई कामगारांची आवश्यकता असताना, ६० हून अधिक सफाई कामगार प्रभागांमध्ये फेरीवाला हटाव पथक, साहाय्यक आयुक्तांचा शिपाई, टपाली, आवक जावक लिपिक म्हणून काम करत आहेत. सफाईचे मूळ काम सोडून त्यांना प्रशासकीय कामात सहभागी होण्याची मुभा दिली कोणी, असे प्रश्न करत काही माजी नगरसेवक, काही जागृत नागरिकांनी यासंदर्भात पालिका आयुक्त, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन उपायुक्त अतुल पाटील यांनी पालिकेच्या दहा प्रभागांमध्ये जे सफाई कामगार अन्य कामे करत आहेत. त्यांनी तातडीने आपल्या मूळ नियुक्तीच्या घनकचरा विभागात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. सफाई कामगारांची बदली अन्य कोणत्याही विभागात करू नये, असे आयुक्तांचे स्पष्ट आदेश आहेत. सफाई कामगारांचे नियंत्रक म्हणून उपायुक्त घनकचरा हे नियंत्रक अधिकाऱी आहेत. असे असताना प्रभागातील साहाय्यक आयुक्त घनकचरा विभागाची परवानगी न घेता सफाई कामगारांना आपल्या अधिकारात अन्य विभागात बदली करत आहेत, असे उपायुक्त पाटील यांच्या निदर्शनास आले आहे. अशा नियमबाह्य नियुक्त सफाई कामगारांनी तातडीने सफाई कामगार म्हणून घनकचरा विभागात तातडीने हजर व्हावे, असे आदेश उपायुक्त पाटील यांनी दिले आहेत. काही दिवसापूर्वी ह प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील सफाई कामगार दिलीप उर्फ बुवा भंडारी यांनी ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांच्या बरोबर रेल्वे स्थानक भागात मंडप टाकण्यावरून हुज्जत घातल्याने अंगचोर सफाई कामगारांचे प्रकरण उघडकीला आले आहे. घनकचरा विभागातील सफाई कामगारांनी प्रभागात विनामंजुरी इतर विभागात सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने पदस्थापना घेतल्या असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित साहाय्यक आयुक्तांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केली जाईल. सफाई कामगारांनी आपल्या मूळ घनकचरा आस्थापनेत तातडीने हजर व्हावे. -अतुल पाटील, उपायुक्त, घनकचरा विभाग.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलणे कुणालाही शक्य नाही!

विरोधी पक्षांकडून संविधान बदलले जाणार असल्याचे सांगत समाजाची दिशाभूल! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विरोधी पक्षांवर हल्लाबोल कल्याण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलणे कुणालाही शक्य नसून विरोधकांकडून संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवत समाजाची दिशाभूल केली जात असल्याचे म्हणत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ज्या काँग्रेसने संविधान बदलून देशात आणीबाणी लावली, तीच काँग्रेस आज संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवते, हे दुर्दैवी आणि दुटप्पीपणाचे असल्याची टीकाही खासदार शिंदे यांनी केली. कल्याणमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे बोलत होते. कल्याणमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बुद्धभूमी फाउंडेशनने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना खासदार शिंदे यांनी विरोधकांवर हा हल्ला चढवला. याप्रसंगी बोलताना कल्याण पूर्वेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी गेल्या १२ वर्षांपासून होत होती. पण माझ्याकडे ही मागणी आल्यानंतर त्याचा लगेचच पाठपुरावा सुरू केला आणि जागेचे आरक्षण बदलून तिथे फक्त पुतळाच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या स्मारकात ग्रंथालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास, त्यांनी केलेला संघर्ष, डिजिटल पुस्तके, इतकेच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आवाज देखील ऐकता येणार आहे. त्यामुळे हे फक्त स्मारक नव्हे, तर ज्ञानकेंद्र असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. आज विरोधकांकडे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मुद्देच नसून त्यामुळे देशाचे संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवत समाजाची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. मात्र याच काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांचा निवडणुकीत पराभव केला होता, हे आज विसरून चालणार नाही, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने संविधान दिन साजरा करणे सुरू केले, संविधान यात्रा सुरू केली, इतकेच नव्हे, तर नवीन संसद भवनालाही संविधान भवन असे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले. तर राज्य सरकारकडून इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारले जात असून लंडनमधील बाबासाहेबांच्या राहत्या घरातील स्मारकही आपले सरकार उभारत असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्यांच्या आणि माथी भडकावणाऱ्यांच्या बाजूने नव्हे, तर आपल्या माणसाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी समस्त समाजाला केले. कल्याणमध्ये बुद्धभूमी फाउंडेशनकडून तथागत भगवान गौतम बुद्धांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम सुरू असून भविष्यात त्यांच्या काही प्रलंबित विषयांसाठीही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. २०१४, २०१९ मध्ये आपण मला भरभरून प्रेम दिले. आता २०२४ मध्ये पुन्हा एकदा भन्तेजींनी मला आशीर्वाद दिला असून आपणही पाठीशी उभे राहाल याची खात्री असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी बुद्धभूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौतम रत्न महाथेरो, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष देवचंद अंबादे, रिपाइंचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे, शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पूर्व विधानसभा निरीक्षक वामन म्हात्रे, कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, माजी नगरसेवक निलेश शिंदे यांच्यासह केतन रोकडे, भारत सोनवणे, सुबोध भारत, शेखर केदारे, मिलिंद सपकाळ, प्रशांत भंडारे, अशोक भोसले, संजय राक्षसकर, प्रशांत बनसोडे, राजेंद्र नितनवरे, भूषण यशवंतराव, नुपूर घाडीगावकर, रोहित डुमणे यांच्यासह आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीकांत शिंदेंच्या प्रचार रॅलीत एकनाथ शिंदे होणार सहभागी!

गुरुवारी डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण भागात निघणार रॅली! डोंबिवली : शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाररॅलीत सहभागी होणार आहेत. गुरुवारी १६ मे रोजी डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण भागात ही रॅली निघणार असून यावेळी राज्यातील मंत्री, आमदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. तर दुसरीकडे त्यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे निवडणूक लढवत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा सोपवली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीत आले होते. यानंतर आता येत्या गुरुवारी, १६ मेला डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे डोंबिवलीत येत आहेत. डोंबिवलीच्या नांदीवली येथील स्वामी समर्थ चौकातून सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रचार रॅलीला सुरुवात होईल. यानंतर डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण असा ४ किमीचे मार्गक्रमण करून आजदे गावात रॅलीचा समारोप होईल, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे. या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, आमदार, नेते आणि मान्यवर मंडळी सहभागी होणार आहेत. तर महायुतीचे कार्यकर्तेही हजारोंच्या संख्येने रॅलीत सहभागी होणार असल्याची महिती शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे.

ठाण्यातील होर्डिंग्ची होणार झाडाझडती

ठाणे : घाटकोपर येथे जाहिरात होर्डिग्ज कोसळून १४ जणांचा बळी गेल्यानंतर ठाणे शहरातील मोठमोठ्या होर्डिंग्जमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका सतर्क झाली असून शहरातील सर्वच होर्डिंग्जची झाडाझडती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात सर्व होर्डिंग्जमालकांना बुधवारी (ता. १५) होणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले असून त्यानंतर योग्य ती कार्यवाही होणार आहे. ठाणे शहरात प्रवेश केल्यापासून ते अगदी गायमुखपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत सर्वत्र महाकाय होर्डिंग्ज सर्वांचे लक्ष वेधून घेतात. पालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात सुमारे अशी ५२८ होर्डिंग्जचे मनोरे आहेत; मात्र प्रत्येक पावसाळ्यात या होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर येतो. ठाण्यात यापूर्वीही जाहिरात होर्डिंग स्टँड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. २०२१ च्या सप्टेंबरमध्ये मासुंदा तलावसमोरील शिवाजी मैदानाबाहेरचे होर्डींग केसळले होते. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गेल्यावर्षी ६ मार्चला झालेल्या अवकाळी पावसात कापूरबावडी परिसरातील होर्डिंग कोसळून सहा वाहनांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शहरातील या होर्डिंगसचे कालबद्ध पद्धतीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना गेल्या वर्षी तत्कालीन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या होत्या. तसेच दुर्घटना घडल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सर्व होर्डिंग मालकांनी हे स्ट्रक्चरल ऑडिट सादर केल्याची माहिती पालिकेने दिली; पण तरीही घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर ‘भय इथले संपत नाही’ अशीच परिस्थिती आहे. वास्तविक पालिकेच्या तिजोरीत भर पडावी, यासाठी होर्डिंगच्या मनोऱ्यांना परवानगी देण्यात आली; पण हे होर्डिंग पावसाळ्यात जीवघेणे ठरण्याची भीती बळावली आहे. घोडबंदर पट्ट्यात सर्वाधिक धोका रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भल्या मोठ्या होर्डिंगची सर्वाधिक संख्या घोडबंदर भागात असल्याचे आढळते. ढोकाळी, मानपाडा, कापूरबावडी, गायमुख येथून जाणाऱ्या महामार्गाला लागून असे शेकडो होर्डिंग आहेत. लवकरच ठोस भूमिका घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पालिकेने सर्व होर्डिंग मालकांची बैठक घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिटच्या रिपोर्टसह सर्वांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. धोका किंवा दुर्घटना टाळण्यासाठी कोणते नवीन उपाययोजना करणे आवश्यक आहेत. यासंदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय उभारण्याचे स्वप्न केले पूर्ण

बच्चू कडू यांची माहिती उल्हासनगर : दिव्यांग कल्याण मंत्रालय मंत्रीपदाच्या दर्जाचा पदभार हाताळताना केलेला पाठपुरावा आणि मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय उभारण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी उल्हासनगरातील मेळाव्यात दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिव्यांगांच्या स्वप्नाची पूर्तता केल्याने त्यांचे आपल्यावर ऋण आहेत. त्यामुळे आपण शिवसेनेत सोबत असून कल्याण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे. उल्हासनगर-4 येथील स्वामी शांती प्रकाश हॉल येथे प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार 13 मे रोजी रात्री पार पडला.यावेळी बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग मंत्रालय उभारण्यात यावे आणि ते स्वप्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्षात उतरवले.माझ्यावर भरपूर गुन्हे दाखल असले तरी ते सर्वसामान्यसाठी लढलो म्हणून असून गुंडागर्दी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरोधात ठाणे जिल्हात अनेक वेळा उपोषण तसेच आंदोलन करण्यात आले आहेत. त्यात काही प्रमाणात यश आले असले तरी काही अधिकाऱ्यांवर राजकीय नेत्यांचे वरदहस्त असल्यामुळे त्यांचावर कारवाई होत नाही. असा आरोप करतानाच निवडणूक संपल्यावर मी स्वतः उपोषणाला येऊन बसतो. मग बघू सरकार या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कशी कारवाई करत नाही. असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला. यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील, संपर्क प्रमुख हितेश जाधव, शहरप्रमुख प्रधान पाटील, पदाधिकारी बाळकृष्ण पाटील, श्याम भोईर, दिपक लढे, अविनाश सोनवणे, आलम खान, वसंत पानसरे, विजय मढवी, रक्षक म्हात्रे उपस्थित होते.

ठाण्यातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डींग्जवर निवडणूक काळातही कारवाई करा – संजय केळकर

अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्जचे पेव फुटले असून निवडणूक काळातही ठाणे महापालिकेने यावर तातडीने आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली. घाटकोपर येथे अवाढव्य होर्डींग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी दुःख व्यक्त करतानाच ठाण्यातील अनधिकृत बांधकामे, अनधिकृत होर्डिंग्ज आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला. याबाबत आमदार संजय केळकर म्हणाले, ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच  धोकादायक होर्डींगचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा होर्डिंग्जचे सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने हटवून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे महापालिकेने देखील याबाबत मागे राहू नये. निवडणूक असली तरी प्रशासनाने शहरात सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डींग्जवर कारवाई करावी, अशी मागणी आ. संजय केळकर यांनी केली. चौकट एखाद्या होर्डींगमुळे मेट्रोचे काम रखडले असेल  आणि ते अनधिकृत असेल तर त्यावर तत्काळ कारवाई करण्यासाठी मी प्रशासनाकडे पाठपुरावा करेन.अनधिकृत बांधकामांवर मागील काळात तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी कारवाई केली, पण संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही. अशा इमारती काही काळानंतर दुर्घटनाग्रस्त होतात आणि निष्पाप नागरिकांचा बळी जातो. अनधिकृत बांधकाम प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आ. संजय केळकर यांनी केली.

24-कल्याण लोकसभा मतदारसंघात 39 सूक्ष्म निरीक्षक दाखल

ठाणे : 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज 39 सूक्ष्म निरीक्षक मतदारसंघात दाखल झाले असून ते केंद्रीय निवडणूक निरीक्षक यांच्यासाठी काम करणार आहेत. मतदारसंघात दाखल झालेल्या या सूक्ष्म निरीक्षकांना आज त्यांच्या कर्तव्याबाबत, मतदान यंत्र हाताळणीबाबत, तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) मनोज जैन, निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते, पदनिर्देशित अधिकारी तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली लंभाते उपस्थित होत्या. सूक्ष्म निरीक्षक दि. 20 मे 2024 रोजी मतदानाच्या दिवशी होणाऱ्या मतदान प्रक्रियेचा अहवाल निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री. मनोज जैन यांना सादर करतील.

ठाणे रेल्वे स्थानकावर राबविण्यात आलेल्या मतदार जनजागृतीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग घ्यावा व मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे अशी जनजागृती आज ठाणे रेल्वेस्थानकावरील प्रवासी मतदारांमध्ये करण्यात आली. २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज (१४ मे) ठाणे  रेल्वे स्टेशन परिसरात मतदार साक्षरता अभियान राबविण्यात आले. यावेळी १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ स्वीप पथकातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जाऊन प्रवाशांशी संवाद साधला. रेल्वे स्टेशनवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यात युवावर्ग,स्त्री -पुरुष ,दिव्यांग नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता. ठाणे शहरात २० मे २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व पात्र मतदारांना मतदान करण्याचे आणि लोकशाही व्यवस्था मजबूत करण्याचे आवाहन स्वीप पथकाने केले. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिक हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांना मतदान केंद्रावर कोणताही त्रास होवू नये यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे त्याची माहिती यावेळी देण्यात आली. कोणत्याही शंका, स्पष्टीकरण आणि तक्रारींसाठी नागरिक 1950 वर कॉल करून आपल्या शंकाचे निरसन करु शकतात असेही यावेळी सांगण्यात आले. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन करीत उपस्थित नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली.

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत १५ दुचाकी खाक

बदलापूर : वादळीवाऱ्याच्या पावसानंतर बदलापूर पश्चिमेकडील मुख्य बाजारपेठेतील वैशाली सिनेमागृह परिसरात मंगळवारी सकाळी सहा वाजता आग लागण्याची घटना घडली. या आगीत १५ दुचाकींसह सात दुकानांतील तब्बल २० जणांचे स्टॉल जळून खाक झाले. महावितरणच्या रोहित्रामध्ये बिघाड होऊन शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग महावितरणच्या दुर्लक्षामुळे लागली असल्याचे येथील गाळाधारकांचे म्हणणे आहे. बदलापूर पश्चिमेकडील बाजारपेठेत वैशाली सिनेमागृह हे शहरातील मध्यवर्ती व गजबजलेले ठिकाण आहे. या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून दुचाकी पार्किंगचा व्यवसाय केला जातो. तर उर्वरित जागेत अनेक व्यावसायिक गाळे आहेत. ज्यात कपडे, चप्पल, मोबाईल कव्हर, ज्यूस सेंटर, फळे व फुले व्यावसायिक अशी सात ते आठ दुकाने होती. याच भागात महावितरणचा भला मोठा रोहित्र आहे. त्यात या रोहित्रामध्ये अनेक दिवसांपासून ठिणग्या उडत होत्या. याबाबतीत अनेकदा महावितरणकडे तक्रार केली होती, असे या गाळाधारकांचे म्हणणे आहे. तसेच सोमवारी (ता. १३) रात्रीदेखील या रोहित्रामधून फटाके फुटल्याचा आवाज आणि ठिणग्या बाहेर पडत होत्या. याबाबत तक्रार देण्यासाठी महावितरण प्रशासनाकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मंगळवारी सकाळी सहा वाजता काही स्थानिकांनी या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची माहिती प्रशासनाला दिली, ही माहिती मिळताच संबंधित प्रशासन व अग्निशमन दलाला प्राचारण केले. तसेच महावितरणकडेदेखील यासंदर्भात तक्रार केली, मात्र महावितरणने कॉल उचलेपर्यंत वेळ निघून गेली होती, अशी खंत येथील गाळेधारकांनी व्यक्त केली. तसेच बाजारात गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी रोहित्र असू नये, यासाठी आम्ही वारंवार महावितरणकडे पाठपुरावा करत आहोत, मात्र याकडेही महावितरणने अजूनपर्यंत लक्ष दिले नसल्याचे म्हटले. या संपूर्ण आगीत गाळेधारक व दुचाकीस्वार असे मिळून ५० लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा दावा नुकसानग्रस्तांनी केला आहे. तसेच याची नुकसानभरपाई, महावितरण प्रशासनाने लवकरात लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. कचऱ्याला लागलेली आग रोहित्रापर्यंत पोहोचली, त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे. गेली अनेक वर्षे हा रोहित्र याच ठिकाणी आहे. जेव्हा कधी त्यात तांत्रिक बिघाड निर्माण होतो, त्यावेळी वेळीच लक्ष देऊन दुरुस्तीचे काम केले जाते. ही आग गाळेधारकांच्या निष्काळजीपणामुळे लागली आहे. त्याचबरोबर सध्या आम्ही या रोहित्रामधील जोडणी इतर ठिकाणी वळवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच या ठिकाणी ही आग कशामुळे लागली याचा तपासदेखील होणार आहे. -चांगदेव काळे, उपअभियंता, महावितरण, बदलापूर आम्ही वीस ते पंचवीस वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करत आहोत. येथे असलेल्या अनेक व्यावसायिकांचे हातावर पोट आहे. आमचा संसारदेखील याच ठिकाणी असतो. गेल्या अनेक वर्षांपासून या रोहित्राबाबत महावितरणकडे, आम्ही तक्रारी केल्या आहेत; मात्र महावितरणने या तक्रारींकडे कधीही सोयीस्कररीत्या लक्ष दिलेले नाही. पावसानंतर रात्री या ठिकाणी अनेकदा फटाके फुटल्यासारखे आवाज येत होते. यासंदर्भातील आम्ही व्हिडीओदेखील आहेत. रात्री यासंदर्भात तक्रार देण्यासाठी महावितरणला सतत कॉलही केले, मात्र महावितरणकडून कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळाला नाही. -निहाल मलिक, व्यावसायिक