Category: ठाणे

Thane news

ठाण्यात पाणी बचतीसाठी पालिकेने लागू केले निर्बंध;

उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई ठाणे : तीव्र उन्हामुळे धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत असून त्याचबरोबर विहिरी आणि कूप नलिका यांच्यातील पाण्याची पातळीही वेगाने कमी होत आहे. यामुळे तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने पाणी बचतीसाठी १० जूनपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे आणि इतर साफसफाईची कामे करण्यास मनाई करण्यात आली असून त्याचबरोबर तरण तलावासाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई केली आहे. या आदशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे, गावे यांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचबरोबर, ठाणे महापालिका क्षेत्रातील विहिरी आणि कूप नलिका यांच्यातील पाण्याची पातळीही वेगाने कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणी बचतीसाठी १० जूनपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. यानुसार दूचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहने, मोठी वाहने धुणे, तसेच पाण्याने साफसफाई करणे या कामांवर निर्बंध असणार आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करून पाणी बचत करावी, असे आवाहन महापालिकेने केले. शक्यतो दररोज गाड्या धुतल्या जावू नयेत. त्याऐवजी कूपनलिकेच्या पाण्याने ओल्या केलेल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात, अशी सूचना महापालिकेने नागरिकांना केली आहे. अंगणात पाणी मारू नये. नळ सुरू ठेऊन कपडे धुणे, भांडी घासणे, दात घासणे, दाढी करणे टाळावे. घरातील नळांची गळती तातडीने दुरुस्त करावी.  सोसायटीतील गळकी टाकी, जलवाहिनी, व्हॉल्व्ह दुरुस्त करावेत. इमारतींच्या छतावरील टाकी ओव्हरफ्लो होवू नये याची दक्षता घ्यावी. त्यासंदर्भात, तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा अशी गळती आढळल्यास संबंधीत इमारतीचे-सोसायटीची नळ जोडणी खंडीत करण्यात येईल. आंघोळीसाठी शॉवर व बाथटबचा वापर करू नये.  स्वच्छतागृहामध्ये डुअल फ्लशचा वापर करावा, अशी सूचना प्रशासनाने केली आहे इमारतीतील जिने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये. पाण्याचा अनावश्यक साठा करू नये तसेच, साठा केलेले पाणी रोज सकाळी ओतून देण्याची सवय बंद करावी. इमारती, सोसायटी, संकुलांमधील तरण तलावासाठी पिण्याचे पाणी वापरू नये आणि वारंवार पाणी बदलण्यात येऊ नये. शक्यतो आठवड्यातील पाच दिवस धुण्यायोग्य सगळे कपडे एकत्र करुन एकाच दिवशी धुवावेत. इतर दिवशी गरज पडल्यास दररोज लागणारे छोटे कपडे हाताने कमी पाण्यात धुवावेत.  कपडे धुण्याचे मशीन आठवड्यातून एकदा किंवा अगदी आवश्यक असेल तेव्हा दोनदाच आणि ते पूर्ण क्षमतेने वापरावे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल आणि मशीनचा वापर पूर्ण क्षमतेने होईल. कपडे धुण्याचे मशीन किंवा हाताने कपडे धुवून निर्माण होणार निरुपयोगी पाणी साठवण करुन पुढचे दोन दिवस फ्लशसाठी, बाथरुम धुण्यासाठी, गाड्या धुण्यासाठी तसेच बगीच्यासाठी वापरावे, अशी सूचनाही प्रशासनाने केली आहे.

जप्त मालमत्तांकडे खरेदीदारांची पाठ

मागील दहा वर्षात थकबाकीदारांच्या कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत लाखो रुपयांच्या मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांचे विहित प्रक्रिया पूर्ण करून लिलाव जाहीर केले होते. कोट्यवधी रूपये पालिकेला या लिलावातून मिळणार होते. परंतु, गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत अशाप्रकारे जाहीर करण्यात आलेल्या लिलाव बोलीतील एकाही थकबाकीदाराची मालमत्ता विकली गेली नसल्याची पालिकेच्या अभिलेखातील धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून उघडकीला आली आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करायच्या असतील तर त्यासाठी पालिकेचा मालमत्ता कर विभाग संबंधिताला पहिले नोटिसा पाठवून थकीत रक्कम भरणा करण्याचे सूचित करतो. अशाप्रकारे तीन नोटिसा पाठविल्यानंतर संबंधित थकबाकीदाराने मालमत्ता कर थकबाकी भरणा केली नाही तर पालिका त्या मालमत्ता जप्त करते. अशा अनेक थकबाकीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्यानंतर पालिका प्रसिध्द वर्तमानपत्रात या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्याची आणि त्यांचा लिलाव जाहीर करते. या जाहिरातींसाठी पालिका लाखो रुपये खर्च करते. या मालमत्ता नागरिकांनी खरेदी कराव्यात म्हणून जनजागृती करते. मालमत्ता विक्रीला न गेल्याने पालिकेने खर्च केलेला सगळा पैसा फुकट जातो, असे माहिती कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी सांगितले. मागील १५ ते २० वर्षाच्या काळात थकबाकीदार कर मालमत्ताधारकांकडे पालिकेची सुमारे पंधराशे कोटीहून अधिकची रक्कम होती. या रकमा वेळोवेळी पालिकेने अभय योजना, विविध प्रकारच्या क्लृप्त्या करून थकबाकीदारांकडून वसूल केली आहे. ही रक्कम आता सुमारे चारशे ते पाचशे कोटीच्या आसपास आहे. थकबाकीदार कर भरणा करत नाहीत मात्र पालिका पुरवत असलेल्या पाणी, रस्ते आणि इतर सुविधांचा लाभ घेतात. गेल्या महिन्यापूर्वी पालिकेने अनेक वर्ष कर भरणा न करणाऱ्या २७ कर थकबाकीदारांच्या ११४ कोटीच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव जाहीर गेला होता. या मालमत्ता विक्रीतून पालिकेला सुमारे सहाशे कोटीहून अधिकची रक्कम बाजारभावाप्रमाणे मिळणार होती. परंतु, पालिकेने हा लिलाव अचानक रद्द केला. त्यामुळे थकबाकीदारांनी समाधान व्यक्त करून पालिकेला या लिलाव प्रक्रियेसाठी केलेला खर्च वाया गेला, असे तक्रारदार कुलकर्णी यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षात पालिकेने किती मालमत्तांचे लिलाव केले. किती मालमत्ता विक्रीला गेल्या, अशाप्रकारची माहिती मनोज कुलकर्णी यांनी कर विभागाकडून मागवली होती. त्यावेळी कर विभागाचे साहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांनी लिलाव प्रक्रियेव्दारे मिळकती विकल्या गेल्या नाहीत, असे उत्तर दिले आहे. या मालमत्तांंचे पुढे पालिकेने काय केले, थकित रकमा पालिकेने वसूल केल्या आहेत का, असे प्रश्न कुलकर्णी यांनी केले आहेत. राजकीय दबाव आणून बडे थकबाकीदार पालिका अधिकाऱ्यांना असे लिलाव रद्द करण्यास किंवा त्यांच्या जप्त मालमत्ता कोणी खरेदी करू नये म्हणून ‘व्यवस्था’ करतात, असे समजते.

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ‘ब’ संघ उपांत्य फेरीत

ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धा ठाणे : गतविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने बेनेटन क्रिकेट क्लबचा एक गडी राखून पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे…

शिळफाट्याचा प्रवास आता आणखी सुसाट!

शिळफाटा उड्डाणपूलाच्या आणखी तीन मार्गिका सेवेत ठाणे : ह. भ. प. संत सावळाराम महाराज कल्याण शीळ मार्गावरून कल्याण, डोंबिवली ते ठाणे, नवी मुंबई प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. या मार्गावरील शिळफाटा येथील उड्डाणपुलाच्या आणखी तीन मार्गिका नुकत्याच खुल्या करण्यात आल्या आहेत. या मार्गिकांमुळे शिळफाटा चौकातला प्रवास अधिक वेगवान झाला आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापुरातून ठाणे, नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना कोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर तसेच आसपासच्या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना ठाणे, नवी मुंबईला जाण्यासाठी ह. भ. प. संत सावळाराम महाराज कल्याण शीळ मार्ग हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मागील वर्षी या रस्त्याचे सहा पदरीकरण करून येथील वाहनचालकांना दिलासा देण्यात आला होता. तर या मार्गावरील प्रवास अधिक वेगवान होण्यासाठी या मार्गावरील पुढील टप्पा असलेल्या मुंब्रा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील शिळफाटा जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या सहा पदरी उड्डाणपुलाच्या उर्वरित सहा मार्गिका आता खुल्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाच्या तीन मार्गिका खुल्या करण्यात आल्या होत्या, ज्यावरून दोन्ही बाजूंची वाहतूक होत होती. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या उड्डाणपुलामुळे बदलापूर ते डोंबिवली येथून कल्याण शीळ मार्गे ठाणे आणि नवी मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळणार असून अधिक वेगवान प्रवास करता येणार आहे. यामुळे वाहन चालकांच्या वेळेची आणि इंधनाचीही बचत होणार आहे. शीळफाटा सहापदरी उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये : – एमएमआरडीएच्या माध्यमातून ११९ कोटी रुपयांच्या निधीतून पुलाची या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. – ७४० मीटर लांब आणि १२ मीटर रुंद असा हा उड्डाणपूल आहे. – या पुलामुळे शिळफाट्याची वाहतूक कोंडीची समस्या कायमची मार्गी लागली आहे.

नरेश म्हस्के यांनी घेतली नाराज गणेश नाईक यांची भेट !

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे लोकसभेतील महायुती पुरस्कृत शिवसेना शिंदेगटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी नाराज भाजप नेते गणेश नाईक यांची मंगळवारी तातडीने सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार व नवीमुंबई भाजपचे अध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक उपस्थित होते. माजी खासदार संजीव नाईक हे ठाणे लोकसभेतुन निवडणूक लढविण्यास उत्सुक होते. तिकीट मिळेल हे गृहीत धरुन संजीव नाईक यांनी ठाणे लोकसभेतुन निवडणूक प्रचारही सुरु केला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे लोकसभेसाठीआग्रही होते. तर संजीव नाईक यांच्यासाठी भाजप अत्यंत आग्रही होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजप व शिवसेना शिंदेगटात ठाणे लोकसभा जागावाटपावरुन दोन्हीकडे रस्सीखेच सुरु होती. अखेर पालघर लोकसभेची जागा शिवसेना शिंदेगटाकडून घेऊन ठाणे लोकसभेची जागा शिवसेना शिंदेगटाला भाजपने सोडली पण यामुळे ठाणे लोकसभा क्षेत्रातील भाजप कार्यकर्ते अतिशय नाराज झाले होते. नवीमुंबई व मिराभाईंदर येथील नाईक समर्थक ४०० भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी या नाराजीतुन पक्षाकडे राजीनामे सोपविले होते. तर भाजप नेते गणेश नाईक यांनीही, प्रेमाने दिलेला पक्ष आदेश स्वीकारू पण आपल्याला तंबी देणारा जन्माला आलेला नाही, असे ठणकावून आपली नाराजी उघड केली होती. ठाण्यात सोमवारी झालेला टीपटाॅप प्लाझा येथील ठाणे लोकसभेतील पदाधिकारी मेळाव्यातही गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक, सागर नाईक, माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह नवीमुंबई व मिराभाईंदर येथील नाईक समर्थकांनी गैरहजर राहून आपली नाराजी उघड केली होती. यामुळेच नरेश म्हस्के यांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी व नाराजी दूर करण्याकरिता तातडीने राज्याचे माजी मंत्री व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार गणेश नाईक यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत निवडणुकीच्या अनुषंगाने नरेश म्हस्के आणि गणेश नाईक यांच्यात चर्चा झाली. प्रचारसभा, चौकसभा, जाहीरसभेबरोबरच घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचे निर्णय पोहोचविले पाहिजेत, अबकी बार ४०० पार खासदार निवडून यायलाच हवेत, अशी गणेश नाईक यांच्यासोबत चर्चा झाल्याचे व निवडणुकीतील विजयासाठी गणेश नाईक यांनी आपल्याला आशीर्वाद दिल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी दिली.

शिंदेंच्याआधी म्हस्के गद्दारी करणार होता- राजन विचारे

ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या आधी हा नरेश म्हस्के गद्दारी करणार होता. त्यावेळी म्हस्के काँग्रेसमध्ये जात होता, शिवाजी मैदानमध्ये त्याचा प्रवेश होता. उद्धव ठाकरे म्हणाले म्हणून त्याला मी थांबवलं. मी तुमच्यासारखा गद्दार नाही, मला…

ठाण्यासाठी २४ उमेदवार रिंगणात

अनिल ठाणेकर ठाणे, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत २५ ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्‍याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज दुपारी तीन वाजेपर्यत संभाजी जगन्नाथ जाधव या एका…

नरेश म्हस्के यांच्या ठाणे लोकसभा मेळाव्यात नाईक समर्थक नवीमुंबई व मिरा-भाईंदरचे पदाधिकारी अनुपस्थित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांची निवडणूक केली प्रतिष्ठेची अनिल ठाणेकर ठाणे: लोकसभा मतदार संघातील महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांची निवडणूक प्रचार सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक डॉ. दीपक दळवी यांना मातृशोक

ठाणे, दैनिक महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक डॉ. दीपक दळवी यांच्या मातोश्री सौ.सुलोचना महिपत दळवी (वय ७६) यांचे रविवारी, ५ मे २०२४ रोजी दुपारी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,…

तन्वी चव्हाणचे पाच बळी

ठाणे  : तन्वी चव्हाणच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर स्पोर्टींग क्लब कमिटीने क्वोरा क्रिकेट क्लबचा १५१ धावांनी दणदणीत पराभव करत मुंबई क्रिकेट संघटना आयोजित महिलांच्या डॉ कांगा बाद पद्धत क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या…