Category: ठाणे

Thane news

संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन ठाणे :- थोर समाजसुधारक, स्वच्छता व सामाजिक समतेचे प्रणेते संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) वरुणकुमार सहारे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शशिकांत गायकवाड, तहसीलदार (सर्वसाधारण) सचिन चौधर, तहसीलदार (संगणक/सांख्यिकी) संदीप थोरात, तहसीलदार (रेतीगट) अमोल कदम तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संत गाडगे महाराज यांनी कीर्तनांच्या माध्यमातून समाजात स्वच्छता, नैतिकता आणि समतेचा संदेश दिला. त्यांच्या कार्यातून समाजजागृतीची चळवळ उभी राहिली.

 ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात स्वतंत्र वाहतूक विभागासाठी ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’ची मागणी

ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात स्वतंत्र वाहतूक विभागासाठी ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’ची मागणी डंपर अपघाताने दिला इशारा कल्याण  : भरधाव डंपरच्या धडकेने नुकतेच टिटवाळा हादरले आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा ठळकपणे समोर आल्या. वाढती जड वाहनांची वर्दळ, अपुरे नियंत्रण आणि मनुष्यबळाची कमतरता यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची भावना नागरिकांत तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, टिटवाळा शहर यांच्यावतीने ॲड. जितेंद्र जोशी यांनी स्वतंत्र वाहतूक विभाग स्थापन करण्याची ठाम आणि व्यापक मागणी केली आहे. नुकत्याच झालेल्या डंपर अपघातात वाहनांचे नुकसान होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली. या घटनेने केवळ टिटवाळ्यातीलच नव्हे तर संपूर्ण ठाणे ग्रामीण परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि जड वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे प्रभावी व समर्पित वाहतूक शाखेची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे. महत्वाचे म्हणजे, ही मागणी केवळ टिटवाळा किंवा कल्याण तालुका पोलीस ठाण्यापुरती मर्यादित नसून, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय व त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांसाठी स्वतंत्र वाहतूक विभाग स्थापन करण्याची आहे. सध्या उपलब्ध पोलीस यंत्रणेवर कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण या दोन्ही जबाबदाऱ्या असल्याने कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे मत व्यक्त होत आहे. या मागणीचा पाठपुरावा करत ॲड. जोशी यांनी  पोलीस महासंचालक, महाराष्ट्र यांची सुनियोजित भेट मिळावी यासाठी अधिकृत अर्ज सादर केला आहे. भेट निश्चित झाल्यानंतर ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा, आवश्यक मनुष्यबळ, विशेष पथके आणि जड वाहनांवर कठोर नियंत्रण यासाठी ते प्रखरपणे भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुत्रा चावल्यानंतर रेबिज रिपोर्ट पॉझेटीव्ह आल्याने ३० वर्षीय युवकाची आत्महत्या

कुत्रा चावल्यानंतर रेबिज रिपोर्ट पॉझेटीव्ह आल्याने ३० वर्षीय युवकाची आत्महत्या कल्याण : कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात कुत्रा चावल्यानंतर रेबिजचा रिपोर्ट पॉझेटीव्ह आल्याने त्यापासुन होणारा त्रास आपल्या आईवडीलांना सहन होणार नाही या भावनेने ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आयेश विश्वनाश अमिन असे या युवकाने नांव असून त्याच्या पश्चात एक भाऊ आणि वृध्द आई वडील असा परिवार आहे. तिसगांव नाक्यावरील सहजीवन सोसायटी मध्ये राहणारा आयेश विश्वनाथ अमीन (३०) असे मृत युवकाचे नाव आहे. तो गेली आठ वर्षांहून अधिक काळ भारत बँक, ठाणे शाखेत नोकरी करत होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तिसगांव नाका परिसरात एका भटक्या कुत्र्याने आयेश यांच्या पायाला चावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी केवळ एकच इंजेक्शन घेतल्याचे सांगितले जाते. मागील चार दिवसांपासून त्यांच्या हालचालींमध्ये असामान्य बदल जाणवत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. दरम्यान, काल सायंकाळी घरात कोणीही नसताना आयेश यांनी आपण आत्महत्या का करीत आहोत याबाबतची सुसाईड नोट लिहून गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या सुसाईड नोट मध्ये ‘आपल्याला रेबिजमुळे जो त्रास होणार आहे तो त्रास आपले आई वडील सहन करू शकणार नाहीत त्यामुळे आपण आत्महत्या करीत असून आपल्या मृत्युस कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये’ असे त्याने नमुद केले असून या सुसाईड नोट सोबत डॉक्टरांचे प्रिशेपशनही जोडले असल्याचे समजते.या प्रकरणाचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस ठाणे करत आहेत.

‘माझी वसुंधरा’अभियानात केडीएमसीला प्राप्त झालेला दीड कोटीचा पुरस्कार ही अभिमानास्पद बाब – महापौर हर्षाली चौधरी

‘माझी वसुंधरा’अभियानात केडीएमसीला प्राप्त झालेला दीड कोटीचा पुरस्कार ही अभिमानास्पद बाब – महापौर हर्षाली चौधरी कल्याण : माझी वसुंधरा अभियान ५.० (सन २०२४-२५) अमृत गटात कोकण विभागीय स्तरावर कल्याण डोंबिवली महापालिकेला प्राप्त झालेला दीड कोटीचा पुरस्कार ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी आज केले. महापालिकेला या मिळालेल्या पुरस्कारासाठी परिश्रम घेतलेल्या अधिकारी, कर्मचारी वर्गाच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन आज स्थायी समिती सभागृहात करण्यात आलेले होते. त्यावेळी बोलताना महापौरांनी हे प्रतिपादन केले आणि पुरस्कार प्राप्त अधिकारी, कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले. महानगरपालिका चांगले काम करीत आहे, याची पोचपावती म्हणजे हा पुरस्कार आहे. चांगल्या कामाचे समाधान नक्कीच मिळते, असे उद्गार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आपल्या भाषणात काढले. तथापि कचऱ्याची समस्या मोठी आहे, यासाठी कचरा विलगीकरण करणे आवश्यक आहे. मनपा क्षेत्रातील गृहसंकुले, विद्यार्थी, एनजीओ यांच्या मदतीने याबाबतची जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश  त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या समन्वयाने शहराचा विकास पुर्णत्वास जावू शकतो, असे सांगत उप महापौर राहुल दामले यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये राज्यातील ४२२ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपला सहभाग दर्शविला होता. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी शहरात विविध पर्यावरणपूरक प्रकल्प, व्यापक जनजागृती मोहिमा, नागरीकांचा सक्रीय सहभाग तसेच पर्यावरण संवर्धन व साश्वत विकासासाठी तांत्रिक आणि व्यवहारीक उपयोजनांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या करण्यात आली. त्यामुळे हे यश प्राप्त होण्यासाठी वर्षभर सातत्याने परिश्रम घेतलेले अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत) प्रशांत भागवत आणि त्यांचे सहकारी, अतिरिक्त शहर अभियंता (जनि:मनि:) जगदीश कोरे आणि त्यांचे सहकारी, पर्यावरणाचे उपआयुक्त समीर भुमकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे आणि त्यांचे सहकारी, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे आणि त्यांचे सहकारी, मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव आणि त्यांचे सहकारी तसेच कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, मनोज सांगळे, या अभियानाचे शहर समन्वयक गितेश झुंझारराव, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे व मनपाच्या सोशल मिडीया टिमचे उमेश यमगर तसेच या अभियानासाठी परिश्रम घेतलेले इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग यांचा महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, उपमहापौर राहुल दामले व उपस्थित शिवसेना गटनेते‍ विश्वनाथ राणे, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, काँग्रेस गटनेते कांचन कुलकर्णी, एनसीपी गटनेते रमीज मनीयार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यावरण विभागाचे उपआयुक्त समीर भुमकर आणि सुत्रसंचालन महापालिका सचिव किशोर शेळके यांनी केले. महानगरपालिकेने ऊर्जा संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत महाराष्ट्र शासनाने  “Certificate Of Excellence” हा पुरस्कार महानगरपालिकेला जाहीर केला,  ऊर्जा संवर्धन क्षेत्रात योगदान दिल्याबाबत महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत /यांत्रिकी) प्रशांत भागवत आणि त्यांचे सहकारी यांचा  महापौर, आयुक्त व  उपमहापौर यांच्या हस्ते सन्मानपत्र  व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 १० वीच्या लेखी परीक्षेदरम्यान वीजपुरवठा खंडित

१० वीच्या लेखी परीक्षेदरम्यान वीजपुरवठा खंडित राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार कल्याण :  इयत्ता १० वीच्या पहिल्या लेखी परीक्षेदरम्यान शाळेत वीजपुरवठा खंडित झाल्याची घटना कल्याणमधील अनेक शाळांमध्ये घडली होती. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला असून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कल्याण पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष रुपेश थळे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण अधिकारी भारत बोरनारे यांची भेट घेत निवेदन देत वीजपुरवठा खंडित झाल्यास शाळांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्याची मागणी केली. यावेळी भानुदास घुगे, दिनेश मढवी, प्रेमनाथ मढवी, मजरखान पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते. २० फेब्रुवारीला इयत्ता १० वीचा पहिला लेखी पेपर सुरू असताना कल्याण डोंबिवली महानगर पालिका शेत्रातील शाळांमध्ये सकाळी ११:३० वाजे पासून वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना अत्यंत उकाडा व अस्वस्थतेमध्ये परीक्षा द्यावी लागली. इयत्ता १० वीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असते. वर्षभर कष्ट करून तयारी केलेल्या वि‌द्यार्थ्यांना योग्य वातावरण मिळणे आवश्यक आहे. मात्र वीज नसल्यामुळे पंखे, लाईट तसेच इतर आवश्यक सुविधा बंद होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता बाधित झाली व त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. ही बाब अत्यंत गंभीर असून भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी संबंधित शाळांना वीजपुरवठा नियमित व अखंडित ठेवण्याबाबत तात्काळ उपाययोजना करावी, तसेच या घटनेची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी रुपेश थळे यांनी केली आहे.

 ‘बेस्ट ऑफ इंडिया’मध्ये विश्वविक्रम नोंद

 कोकण विभागात ५१ लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमला ‘हिंद-दी-चादर’  ‘बेस्ट ऑफ इंडिया’मध्ये विश्वविक्रम नोंद नवी मुंबई : (अशोक गायकवाड) – हिंदुस्थानी संस्कृती व मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणारे गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी…

आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये पनवेल शहरातील खेळाडूंची १३ पदकांची कमाई

आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये पनवेल शहरातील खेळाडूंची १३ पदकांची कमाई ठाणे: नवी दिल्ली येथे वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन, स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया तसेच जेके टायर यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग २०२६ च्या स्पर्धेत पनवेल येथील खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना‌‌ ४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कास्य अशी एकुण १३ पदकांची कमाई केली. के.डी जाधव इनडोअर इंदिरा गांधी स्टेडियम येथें स्पर्धा  आयोजित करण्यात आली होती. भारतीय संघामध्ये पनवेल शहरांमधील १० खेळाडूंची निवड करण्यात आली होती तसेच संपूर्ण महाराष्ट्र मधून ९१ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता पॅलेस्टाईन, उझबेकिस्तान, इराक, इटली, कझाकिस्तान, स्विझर्लंड, नेपाळ, युरोप यांच्यासहित २५ देशातील खेळाडूंचा समावेश ‌स्पर्धेत होता. पनवेलच्या अर्णव इंगोलेने २ सुवर्ण पदके मिळवली तर अन्वी निकम, काव्य सेजलला प्रत्येकी एक सुवर्ण पदक मिळाले. रोनल पाटीलने २ रौप्य पदकांची कमाई केली. शुभम पवार, सानिया शेखला देखील रौप्य पदक मिळाले. श्रेया कुडलकरने २ कांस्य पदक पटकावली तर प्रणव लब्दे, शुभम पवार, आर्यन शिवतरकर यांनी प्रत्येकी एक कांस्य पदक मिळवले. पदक विजेत्या खेळाडूंना पनवेल शहर किकबॉक्सिंगचे अध्यक्ष परेश ठाकूर, सचिव मंदार पनवेलकर, कार्याध्यक्ष व सीनियर प्रशिक्षक निलेश भोसले, प्रशिक्षक योगेश बैकर, रोहित थळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

नवी मुंबई महानगरपालिकेत १२ परिवहन सदस्य नेमणूक

नवी मुंबई महानगरपालिकेत १२ परिवहन सदस्य नेमणूक महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २५(२) अन्वये, प्रशासनाचा किंवा परिवहनचा अनुभव असलेल्या तसेच अभियांत्रिकी, औद्योगिक, वाणिज्यिक, वित्तीय किंवा कामगार विषयक बाबतीत ज्यांची क्षमता दिसून आली असेल तसेच जे पालिका सदस्य असतील वा नसतील अशा व्यक्तींमधून परिवहन समितीवरचे सदस्य म्हणून १२ व्यक्तींची नेमणूक करण्याचा प्रस्ताव आज महासभेच्या पटलावर घेण्यात आला. या १० परिवहन सदस्यांमध्ये राहुल चंद्रकांत शिंदे, राजेश हौसला राय ,विकास कुंडलिक झंझाड, शितल श्रीपत भोईर, रोशन रामचंद्र पाटील, राजश्री नारायण कातकरी, विनोद तुळशिराम म्हात्रे, यशपाल सिद्राम ओव्हाळ, कुणाल प्रकाश महाडिक, हनुमंत कोंडीबा रोडे, अभिजीत प्रकाश पेडणेकर, तिर्था मारूती सकपाळ आदी मान्यवरांची निवड झाली असून त्यांचे महापौर सुजाता पाटील, उपमहापौरदशरथ भगत आणि आयुक्त डॉ.कैलाश शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

हिंद दी चादर” गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त ठाण्यात समूहगान कार्यक्रम

हिंद दी चादर” गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त ठाण्यात समूहगान कार्यक्रम अनिल ठाणेकर ठाणे,– “हिंद दी चादर” म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त  २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमांच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पाचपाखाडी, ठाणे येथे  २३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता विशेष समूहगान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गुरु तेग बहादूर यांच्या जीवनकार्यावर आधारित सादर केलेले प्रेरणादायी गीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या सहभागातून सामूहिकरित्या गायन करण्यात आले. समूहगानातून गुरु तेग बहादूर यांच्या बलिदान, धर्मस्वातंत्र्य व मानवतेच्या मूल्यांची आठवण उपस्थितांना करून देण्यात आली.या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, प्रकल्प संचालक (स्वच्छ भारत मिशन) पंडित राठोड, उपशिक्षणाधिकारी (योजना) शुभांगी बढे, विस्तार अधिकारी (शिक्षण) आशिष झुंझारराव, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे तसेच मुख्याध्यापिका मानसी मिलिंद ढवळीकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची माहिती नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचते, असे मत व्यक्त केले.तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये “हिंद दी चादर” गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त समूहगान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी वर्गाने विविध शाळांना भेट देऊन या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला व विद्यार्थ्यांना प्रेरित केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदविला. देशभक्ती, त्याग व मानवतेचा संदेश देणाऱ्या या समूहगान उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. आगामी २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणाऱ्याषका मुख्य शहीदी समागम कार्यक्रमासाठी या उपक्रमातून सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

 मिरा -भाईंदर, वसई – विरार पोलीस आयुकत्तालयाची एकूण ८७९ पदांसाठी पोलीस भरती

मिरा -भाईंदर, वसई – विरार पोलीस आयुकत्तालयाची एकूण ८७९ पदांसाठी पोलीस भरती मिरा – भाईंदर सुभाषचंद्र मैदान,  भाईंदर येथे पोलिस आयुक्तालयाची मोठ्या उत्साहात आणि कडक देखरेखीखाली २०२४-२५ ची पोलिस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ८७९ रिक्त पदांसाठी या भरतीसाठी एकूण ५७९९० अर्ज प्राप्त झाले आहेत, ज्यामुळे स्पर्धा अत्यंत कठीण झाली आहे. या भरतीत ८४० पोलिस कॉन्स्टेबल आणि ३९ ड्रायव्हर पदे भरली जाणार आहेत.  २५ मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेत रोज २५०० उमेदवारांची चाचण्या घेतल्या जाणार आहेत.  १०० मीटर आणि १६०० मीटर आणि गोळफेक अश्या तीन ५० मार्कांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओग्राफी केली जात आहे, ज्यासाठी ६९ कॅमेऱ्यांची टीम तैनात करण्यात आली आहे. मैदानाबाहेर सुरळीत वाहतूक राखण्यासाठी विशेष पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. कोणत्याही अनियमिततेसाठी कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सुभाषचंद्र बोस मैदानात होणाऱ्या या भरतीत डॉक्टर, परिचारिका आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसह एक वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. उमेदवारांसाठी मोफत पिण्याचे पाणी आणि बिस्किटे दिली जातात आणि तक्रार निवारण कक्षाची स्थापना देखील करण्यात आली आहे.