मुंबई : शिवाजी महाराजांची झाडाझुडपात लपलेली समाधी ही महात्मा जोतिबा फुले यांनीच शोधली आहे. तुम्ही इतिहासाचे विकृतीकरण करत आहात, अशी संतप्त प्रतिक्रीया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधून काढली असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी केले होते. मोहन भागवतांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, मोहन भागवतजी इतिहासाच्या कुठल्याही पानावर लिहिलेले नाही की, छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी शोधून काढली. वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी महात्मा जोतिबा फुले यांनी शोधून काढल्याबाबत कोणत्याही इतिहासकारांमध्ये मतभेद नाहीत. ही समाधी त्यांनी अत्यंत कष्टाने शोधून काढली. झाडाझुडपात लपलेली ही समाधी शोधत असताना तेथील मनुवाद्यांनी महात्मा फुले यांना त्रासदेखील दिला होता. पण, या मनुवाद्यांना न जुमानता छत्रपती शिवरायांची समाधी व्यवस्थित करून घेतली ती फक्त आणि फक्त महात्मा जोतिबा फुले यांनीच! आपण जे बोलता त्यालाच आम्ही इतिहासाचे विकृतीकरण म्हणतो.
