Month: October 2024

अर्ज दाखल करण्यापूर्वी आनंद दिघे यांच्या स्मारकासमोर मनसे नेते अविनाश जाधव नतमस्तक

ठाणे : शहर मतदार संघातून मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी शक्ती प्रदर्शन केले तसेच शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकासमोर…

कल्याण पूर्वेत शक्तिप्रदर्शन करत सुलभा गायकवाड यांनी भरला उमेदवारी अर्ज

 शिवसेनेतील नाराज गटाची मिरवणुकीकडे पाठ   कल्याण : कल्याण पूर्वेतील महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज गुरूवारी महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयातील निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला. यावेळी शिवसेनेतील नाराज गटाने महायुतीच्या या मिरवणुकीकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. गोळीबार प्रकरणामुळे भाजपचे कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड तुरूंगात आहेत. त्यामुळे यावेळी भाजपने त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार असल्याचे वातावरण भाजपने बुधवारी निर्माण केले होते. पण व्यस्ततेमुळे तेही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येऊ शकले नाहीत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी मंत्री कपील पाटील, आमदार कुमार आयलानी, रिपब्लिकन पक्षाचे अण्णा रोकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, शिवसेनेच्या माजी नगरसेविका माधुरी काळे सहभागी झाले होते. तिसगाव नाका येथील आमदार गणपत गायकवाड यांच्या तिसाई हाऊस येथून मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. मिरवणुकीत चित्ररथ, ढोल-ताशा, कर्णकर्कश वाद्ये यांचा समावेश होता. महायुती आणि सुलभा गायकवाड यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सजविलेल्या रथामधून उमेदवार सुलभा गायकवाड, मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, सुलभा गायकवाड यांचे कुटुंबीय उपस्थितांना अभिवादन करत होते. शिवसेनेतील स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यासह शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी या मिरवणुकीकडे पाठ फिरवली होती. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्याण पूर्वेत आणून महायुतीमधील नाराजांना सूचक इशारा देण्याचा प्रयत्न केला जाणार होता. पण, या नाराजांवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची पूर्ण नजर राहणार असल्याची चर्चा आहे. मिरवणुकीच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोट अनेक वर्ष कल्याण पूर्वेतील निवडणूक शिवसेना-भाजप युतीमधून लढवत आहेत. आमदार गणपत गायकवाड यांचा दांडगा जनसंपर्क येथे आहे. अनेक विकास कामे या भागात त्यांनी केली आहेत. तोच विकासाचा अजेंडा समोर ठेऊन सुलभा गायकवाड या निवडणूक लढवित आहेत. त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल. रवींद्र चव्हाण (भाजप नेते)

‘गद्दारांना क्षमा नाही’ आणि निष्ठावंतांचे अस्तित्व टिकू द्या’

 ठाण्यात निष्ठावान शिवसैनिकांचे शक्तीस्थळावर गाऱ्हाणे, राजन विचारे यांनी भरला उमेदवारी अर्ज ठाणे : गद्दारांना क्षमा नको आणि निष्ठावंतांचे अस्तित्व टिकू द्या असे म्हणत ठाण्यातील निष्ठावान शिवसैनिकांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर राजन विचारे यांचा गुरुवारी अर्ज दाखल केल्यानंतर गाऱ्हाणे घातले. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी चरई येथील त्यांच्या कार्यालयापासून ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन केले. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे त्यांनी दर्शन घेतले. महायुतीचे उमेदवार संजय केळकर आणि मनसेचे अविनाश जाधव यांचे राजन विचारे यांच्यासमोर आव्हान आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय केळकर आमदार असले तरी, हा मतदारसंघ महायुतीसाठी प्रतिष्ठेचा मानला जातो. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत शिवसेना(शिंदेगट) खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना (ठाकरेगट) माजी खासदार राजन विचारे यांचा पराभव केला. या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यावर त्यांचाच प्रभाव असल्याचे दाखवून दिले होते. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राजन विचारे ४८ हजार मतांनी पिछाडीवर होते. तर, कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजीवडा या मतदारसंघातही विचारे यांना मोठा फटका बसला. परंतू, शिंदे यांच्या पक्षातील एक मोठा गट भाजप आमदार संजय केळकर यांच्या विरोधात आहे. या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांचे काही निकटवर्तीय देखली आग्रही होते. परंतू, या मतदारसंघातून केळकर यांना उमेदवारी मिळाल्याने शिंदे गटातून माजी महापौर मीनाक्षी शिंदे तसेच माजी नगरसेवक संजय भोईर यांनी बंड पुकारल्याचे चित्र आहे. तर, विचारे हे २००९ मध्ये ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते. या पार्शभूमीवर पुन्हा एकदा ठाकरे गटाने माजी खासदार राजन विचारे यांनाच ठाणे शहर विधानसभा मतदार संघातुन निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. राजन विचारे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह त्यांनी चरई येथील त्यांच्या कार्यालयापासून ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन केले. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे ही दर्शन घेतले. तर, अर्ज दाखल केल्यानंतर दिघे यांच्या शक्तीस्थळावर दर्शन घेऊन सर्व निष्ठावान शिवसैनिकांनी गद्दारांना क्षमा नाही आणि निष्ठावंतांचे अस्तित्व टिकू द्या, यासाठी आपले शिलेदार राजन विचारे यांचा सर्वाधिक मतांनी विजय व्हावा असे म्हणत गाऱ्हाणे घातले. 00000

शाळा, मार्केट, उद्याने अशा विविध ठिकाणी मतदान करण्याविषयी जनजागृती

नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत असून निवडणूक कार्यालयांच्या स्वीप पथकांप्रमाणेच महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावरील पथकांमार्फतही विविध समाज घटकांपर्यंत पोहचून 20 नोव्हेंबर रोजी…

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, २६ लाखाचा मुद्देमाल जप्त – रविकिरण कोले

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा निवडणूक सन २०२४ च्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून १५ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबरपर्यंत एकूण १०७ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून ८८ आरोपीना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण कारवाईमध्ये ३७५२०  लि.दारु जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रुपये २६ लाख ६१ हजार २१२ असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रविकिरण कोले यांनी दिली. अवैध मद्याच्या व्यवसायात गुंतलेल्या सराईत इसमांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधीलकलम ३ अंतर्गत एकूण ६१ प्रस्ताव विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले असून पैकी १४ कलम-९३ अंतर्गत बंधपत्र करुन घेण्यात आलेले आहेत. तसेच संशयित आरोपी ज्ञातपत्यावर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६८ (फौजदारी प्रक्रीया संहितेच्या कलम १४९) नुसारसंबंधीताना गुन्हयापासून परावृत्त करण्याकरीता एकूण ४७० कायदेशीर नोटीस देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुक-२०२४ आचारसंहिता कालावधीत सर्व मद्य उत्पादक घटक, ठोक विक्री व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीवर प्रभावी नियत्रंण ठेवण्याकरीता अनुज्ञप्त्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सदरचे कंट्रोल रुम या कार्यालयात कार्यान्वित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुक-२०२४ आचारसंहिता कालावधीत या विभागाची ७ पथके तैनात असून पथकांस आंतरराज्यीय  मद्य तस्करी होणार नाही तसेच बेकायदेशीर हातभट्टी दारु निर्मिती व विक्री केंद्र व वाहतूक यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.  तसेच कोणत्याही प्रकारची अवैध मद्य वाहतूक होणार नाही याकरीता रायगड जिल्ह्यात शेडूंग, ता.पनवेल, व चांदवे, ता.पोलादपूर येथे २ तपासणी नाके उभारण्यात आलेले असून तेथे संशयितवाहनांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. तसेच अवैध मद्यविक्री करणारे ढाबे, हॉटेल, टपऱ्या यांच्यावर वारंवार कारवाई करण्यात येत आहे. विधानसभा निवडणूक २०२४ मुक्त व निर्भयपणे पारपाडावी याकरीता विधानसभा मतदारसंघात मतदारांना दारुचे प्रलोभन देत असल्याचे निदर्शनांस आल्यास तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्रीबाबत काही तक्रारी असल्यास या विभागाचा व्हॉटस ॲप क्र. ८४२२००११३३ व टोल फ्रीक्र. १८००२३३९९९९ व अधीक्षक कार्यालय रायगड येथील दूरध्वनी क्रमांक ०२१४१- २२८००१ वर संपर्क साधण्यात यावा.

दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीतील फडके रोड गुरूवार, शुक्रवार वाहतुकीसाठी बंद

डोंबिवली : दिवाळी सणानिमित्त डोंबिवली पूर्वेतील फडके रोड तरूणाईने गजबजून गेलेला असतो. दिवाळी पहाट, दीपावली पूर्व संध्या उत्सवी कार्यक्रमांची फडके रोडवर रेलचेल असते. हा सगळा विचार करून वाहतूक विभागाचे पोलीस…

परळ स्थानकाजवळून सुटणाऱ्या बेस्ट बस बंद

धारावी : मध्य रेल्वेवरील परळ (पूर्व) स्थानकाबाहेरून बेस्टतर्फे १६३ व १७७ क्रमांकाच्या बस सोडल्या जात होत्या. अचानक बेस्ट प्रशासनाने या बस बंद केल्‍याने प्रवासी नाराजी व्यक्‍त करीत आहेत. या मार्गावर…

कॉलेज, डॉक्टरांवर निवडणूक जनजागृतीची जबाबदारी

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महानगरपालिकेने कसली कंबर   उल्हासनगर – महानगरपालिकेने उल्हासनगर विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कंबर कसली असून त्याकरिता शहरातील 4 नामचिन कॉलेज व डॉक्टरांवर जनजागृतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयुक्त विकास ढाकणे, स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी स्थायी समिती सभागृहात विधानसभा निवडणूकित जनजागृतीची रूपरेषा ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली होती. त्यात चांदीबाई कॉलेज, आरकेटी कॉलेज,एसएसटी कॉलेज आणि वेदांत कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यासह सहायक आयुक्त विशाल कदम, मयुरी कदम,जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, डॉक्टर संघटनांचे प्रतिनिधी, दिव्यांग अधिकारी, समाजसेविका उपस्थित होते. या बैठकीत विकास ढाकणे, किशोर गवस यांनी सर्व सदस्यांनी निवडणुक जनजागृती निमित्ताने विविध लक्षवेधक नियोजन करून त्याप्रमाणे जास्तीत जास्त परिणामकारक उपक्रम राबवून महापालिका क्षेत्रातील मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश उपस्थितांना दिले. यासोबतच महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्याकडूनही मतदान जनजागृतीची शपथ घेण्यात आली असून शालेय विद्यार्थीही या मोहिमेत सहभागी झाले आहेत. 0000

 मध्य रेल्वेने मारली बाजी

अखिल भारतीय आंतर रेल्वे खो-खो स्पर्धा रामजीक कश्यपला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मुंबई : १८ वी अखिल भारतीय आंतर रेल्वे खोखो स्पर्धा बिलासपूर, छत्तीसगड येथे संपन्न झाली. या स्पर्धेत सहा संघांनी भाग घेतला होता व हि स्पर्धा तीन दिवस सुरु होती. त्यामध्ये दक्षिण मध्य रेल्वे, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, उत्तर रेल्वे, रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांचा समावेश होता. या स्पर्धेत रेल्वेच्या विविध भागातून १३ अधिकाऱ्यांसह ८८ खेळाडूंनी भाग घेतला होता. तर हि स्पर्धा नीट पार पाडण्यासाठी रेल्वे बोर्डाने १४ पंचांची नियुक्ती केली होती. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी रेल्वे बोर्डाने ४ निरीक्षकांची नियुक्ती केली होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान व गतविजेत्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपूरचे कडवे आव्हान मध्य रेल्वे, मुंबईला होते. सुरवाती पासूनच अतिशय चुअराशीचा खेळ पाहायला मिळाला परंतु शेवटी मध्य रेल्वे मुंबईने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा १४-१३ असा जवळ जवळ तीन मिनिटे राखून विजेतेपदाला गवसणी घातली. या सामन्यात क्षणा-क्षणाला दोन्ही संघांची कामगिरी वरचड ठरत होती. मध्यंतरला ७-७ अशी बरोबरी पाहायला मिळाली व प्रत्येक खेळाडू “कांटे कि टक्कर” देत होता व ते आपआपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत होते. दुसऱ्या डावात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूरला प्रथम आक्रमण करताना सहाच खेळाडू बाद करण्यात यश आल्याने मध्य रेल्वे, मुंबईला विजय नजरेच्या टप्प्यात येत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी मध्य रेल्वेच्या खेळाडूंनी जिंकू किंवा मरू या अविर्भावात संरक्षण करताना दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या खेळाडूंच्या तोंडाला फेस आणला. एक एक गुण मिळवण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या खेळाडूंना झगडावे लागत होते. तर सामन्याच्या शेवटी आक्रमण करताना मध्य रेल्वेच्या खेळाडूंनी कमालीचा खेळ उंचावत ७ खेळाडू जवळ जवळ तीन मिनिटे राखून बाद केले व मध्य रेल्वेने विजयाचा जल्लोष साजरा केला. या सामन्यात मध्य रेल्वेच्या रामजी कश्यप (२, १.१० मि. संरक्षण व ५ गुण), विजय हजारे (१.५०, २ मि. संरक्षण व १ गुण), संकेत कदम (१.३०, १.४० मि. संरक्षण),  दिलीप खांडवी (१.३०, १.३० मि. संरक्षण व १ गुण) व अवधूत पाटील (नाबाद १.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी विजेतेपद खेचून आणताना दमदार खेळ केले व मध्य रेल्वेला विजयी केले. तर पराभूत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अरुण गुणकी (१.२०, १ मि. संरक्षण व २ गुण), निलेश (१.४० मि. संरक्षण व १ गुण), आदित्य गणपुले (१.१०, १.१० मि. संरक्षण) व स्वामी (१.१०, १.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी दिलेली कडवी लढत गत वर्षीचा इतिहास घडवण्यास अपुरी ठरली. सामना संपल्यावर मध्य रेल्वेचे प्रशिक्षक सुधीर म्हस्के व संघ व्यवस्थापक योगेश मोरे यांनी समाधान व्यक्त करताना खेळाडूंनी विजयश्री खेचून आणल्याचे सांगितले. तृतीय क्रमांकाच्या सामन्यात पश्चिम रेल्वेने दक्षिण मध्ये रेल्वेला हरवत तिसरा कमांक पटकावला. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक रामजी कश्यपला तर उत्कृष्ट आक्रमकाचे पारितोषिक रंजन शेट्टी व उत्कृष्ट संरक्षकाचे पारितोषिक अरुण गुणकीला देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ रेल्वे महाप्रबंधक मीनु इटियेरा यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी महाप्रबंधकांनी विजेत्या संघाचे व स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचे अभिनंदन केले. या स्पर्धेत खेळलेले सर्व संघ हे रेल्वे परिवाराचे असून सर्वच संघांनी चंगल्या व उच्च दर्ज्याच्या  खेळाचे प्रदर्शन केल्याचे सांगितले.