Month: October 2024

 रिक्षा संघटनेचा आंदोलनाचा इशारा

डोंबिवली पश्चिमेत अभूतपूर्व वाहन कोंडी डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या चौक, रस्त्यांवर संध्याकाळच्या वेळेत एकही वाहतूक पोलीस, सेवक तैनात नसल्याने पश्चिमेतील महत्वाचे रस्ते, चौक दररोज वाहन कोंडीत अडकत आहेत. या कोंडीचा सर्वाधिक फटका कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांना बसत आहे. पश्चिमेत वाहतूक नियोजनासाठी वाहतूक पोलीस तैनात केले नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा संघटनेने दिला आहे. डोंबिवली पश्चिमेतील सर्वच रस्ते अरूंद आहेत. या रस्त्यांचे रूंदीकरण आणि काँक्रिटीकरण झाले नाही. या रस्त्यांच्या दुतर्फा दुकानदार पदपथ अडवून आपले सामान ठेवतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ता राहत नाही. रिक्षा, मोटारी, अवजड वाहने एकाचवेळी रस्त्यावरून धावत असल्याने या अरूंद रस्त्यावर कोंडी होते. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील कोल्हापुरे इस्टेट चौक दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत वाहन कोंडीत अडकलेला असतो. याच रस्त्यावरील प्रसाद स्नॅक्स दुकानाजवळील चौक कोंडीत अडकलेला असतो. याशिवाय घनश्याम गुप्ते रस्त्यावरील गोपी माॅल चौकाला कोंडीचा विळखा पडलेला असतो. कोल्हापुरे इस्टेट चौकातून गरीबाचापाडा, सुभाष रोड, गणेशनगर भागात जाणारी आणि रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहने धावतात. प्रसाद स्नॅक्स दुकानाजवळील चौकात भागशाळा मैदान ते गुप्ते रस्ता, पंडित दिनदयाळ रस्त्याकडे जाणारी वाहने धावतात. गोपी माॅल चौकातून सम्राट चौक ते नवापाडा भागात जाणारी वाहने धावतात. संध्याकाळच्या वेळेत या चौकांमध्ये एकही वाहतूक पोलीस नसतो. त्यामुळे प्रत्येक वाहन चालक चढाओढीच्या स्पर्धेत वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. या चढाओढीत सर्व वाहने चौकांमध्ये अडकून पडतात. यावेळी परिसरातील रस्ते, गल्ल्या वाहनांंनी बजबजून जातात. डोंबिवली वाहतूक विभागाला या सर्व चौक आणि तेथील कोंडीची माहिती आहे. या भागात दररोज संध्याकाळी एकही वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक या भागात तैनात नसतो, असे रिक्षा चालक मालक संघटनेचे शेखर जोशी यांनी सांगितले. येत्या पंधरा दिवसानंतर दिवाळी सण येणार आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील पादचारी, वाहनांची संख्या वाढणार आहे. हा विचार करून डोंबिवली वाहतूक विभागाने डोंबिवली पश्चिमेतील वर्दळीच्या चौक, रस्ते भागात वाहतूक पोलीस तैनात करावेत, अशी मागणी रिक्षा संघटनेने केली आहे. या मागणीचा विचार केला नाहीतर मात्र रिक्षा चालक आंदोलन करतील, असा इशारा रिक्षा चालक मालक संघटनेने दिला आहे.

शाळांच्या इमारतीवर मोबाईल टॉवर उभारता येणार नाही

उच्च न्यायालयाचे निर्देश   मुंबई :  दक्षिण मुंबईतील एका शाळेच्या छतावरील मोबाईल टॉवरमुळे विद्यार्थी तसेच रहिवाशांच्या जीवाला धोका आहे. तसेच, शाळा, कॉलेजच्या इमारतींवर मोबाईल टॉवर उभारण्यास मनाई असल्याने तत्काळ कारवाईचे निर्देश उच्च न्यायालयाने संबंधित कंपनीला दिले आहेत. मोबाईल टॉवर्स उभारण्यासंबंधी २०१३च्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार शाळा, कॉलेज व रुग्णालये इमारतींच्या टेरेसवर मोबाईल टॉवर उभारण्यास बंदी आहे. असे असताना डोंगरी परिसरातील एका शाळेच्या टेरेसवर एका मोबाईल कंपनीने टॉवर उभारला आहे. याविरोधात कैसर-ए-अमीन बिल्डिंग टेनंट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ॲड. विश्वनाथ पाटील, ॲड. अक्षय नायडू आणि ॲड. केदार न्हावकर यांच्यामार्फत दाखल याचिकेवर न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी पालिकेने मोबाईल टॉवर्स उभारणीसाठीच्या २१ जानेवारी २०१३ रोजी सुधारित मार्गदर्शक तत्त्वानुसार घरमालकांची संमती घेणे बंधनकारक आहे. तसेच, शाळा- कॉलेजच्या इमारतींच्या छतावर टॉवर उभारणीवर बंदी असल्याचा युक्तिवाद रहिवाशांतर्फे करण्यात आला. त्याची दखल घेत खंडपीठाने तत्काळ टॉवर हटवण्याचे निर्देश दिले. तसेच, गरज पडल्यास पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करावी, असे निर्देशही दिले आहेत.

नवी मुंबईत करता येणार मोफत केमोथेरपी

 महानगरपालिकेचा उपक्रम नवी मुंबई : शहरातील स्थानिक कॅन्सरपीडित रुग्णांना मुंबईतील टाटा रुग्णालयात जाऊन कॅन्सर आजारावर औषधोपचार घ्यावे लागत होते. त्यामुळे रुग्णांबरोबरच नातेवाइकांनादेखील त्याचा त्रास सोसावा लागत होता.  आता कॅन्सरपीडित रुग्णाला नवी मुंबईतच केमोथेरपी करता येणार आहे. तसेच, कॅन्सर आजाराचे निदान चाचणी आपल्याच प्रभागातील पालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यविषयक सोयी-सुविधा पुरविण्यात येतात. पालिकेच्या सर्वच नोडमध्ये प्रशस्त अशी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारली स असून येथे रुग्णांना उपचार दिले जात आहेत. पालिकेच्या आरोग्यसेवेला अधिक सक्षम करण्यासाठी कोपरखैरणे प्र येथील नागरी आरोग्य केंद्राचे लोकार्पण, सहा आधुनिक शस्वक्रियागृह सुविधाचे लोकार्पण, आरोग्यवर्धिनी केंद्र आणि कॅन्सर रुग्णांसाठी केमोथेरपी व स्क्रिनिंग सुविधाचे उ‌द्घाटन करण्यात आले आहे. कॅन्सर आजाराबाबत जागरूकता वाढविणे, रुग्णाला वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी १३ प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅन्सर निदान चाचणी होईल.

 टोलमाफी, माझी लाडकी बहीण,३ सिलेंडर वर्षभरात मोफत, बळीराजासाठी ७५० एचपीपेक्षा कमी मोटारपंप वीज माफी

सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे महायुतीच सत्तेत येणार – आनंद परांजपे अनिल ठाणेकर ठाणे : टोलमाफी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, माता-भगिनींसाठी ३ सिलेंडर वर्षभरात मोफत देण्याची योजना, माझ्या बळीराजासाठी ७५० एचपी पेक्षा कमी मोटारपंप वापरणाऱ्यांना वीज माफी आदी क्रांतीकारी व कल्याणकारी निर्णय महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी घेतले. यामुळेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे राज्यातील शीर्ष नेतृत्व व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुती पुन्हा एकदा सत्तेत येईल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. एका टप्प्यात होणार्‍या या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होईल. मला विश्वास आहे की महायुती पुन्हा एकदा बहुमताने सत्तेवर येईल. महायुती शासनाने, टोलमाफी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, माताभगिनिंना ३ सिलेंडर वर्षभरात मोफत देण्याची योजना, माझ्या बळीराजासाठी ७५० एचपी पेक्षा कमी मोटारपंप वापरणाऱ्यांना वीज माफी असेल. अश्या अनेक क्रांतीकारी व कल्याणकारी निर्णय महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी घेतले. यामुळेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजपचे राज्यातील शीर्ष नेतृत्व व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या तीनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुती पुन्हा एकदा सत्तेत येईल. ह्या विधानसभेचा कार्यकाल हा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपत आहे. त्याच्या आत नवीन विधानसभा अस्तित्वात आली पाहिजे. २० नोव्हेंबरला मतदान आणि मतमोजणी २३ नोव्हेंबरला आहे आणि त्यामुळेच कार्यकाल संपायच्या आत विधानसभेची निवडणूक व निवडणूक निकाल दोन्ही पार पडत आहे. त्यामुळे कुठेही केंद्रीय निवडणूक आयोग २६ नोव्हेंबर नंतर निवडणूका घेत नाही. महाविकास आघाडी या निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांच्याकडे मुद्देच नाहीत. कुठल्या मुद्द्यांवर महायुतीविरोधात प्रचार करायचा हा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना पडलेला आहे. तरुण मतदारांना खासकरुन १८ ते २५ वयोगटातील मतदारांना व पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना आवाहन आहे की, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदानाचा जो पवित्र हक्क आपल्याला दिलेला आहे तो हक्क आपण निभावला पाहिजे. जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्रात मतदान कसे होईल यासाठी माझ्या तरुण मित्रांनी प्रयत्न करायला हवेत, असे अपील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहे.

 पांढरीच्या लाकडांची तस्करीप्रकरणी संबंधितांवर

 शहापूर वन विभागाने काय कारवाई केली ? – सागर जोंधळे ठाणे : पांढरीच्या लाकडांची तस्करी केल्याप्रकरणी शहापूर तालुक्यातील डोळखांब वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बोधनपाडा गावाशेजारील फार्महाऊसवर संबंधितांवर शहापूर विभागीय वन अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली ? असा प्रश्न डोंबिवली येथील स. है. जोंधळे विद्यासमुहाचे अध्यक्ष सागर शिवाजीराव जोंधळे यांनी माहितीच्या अधिकारात विचारला आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये पांढरीच्या लाकडांची तस्करी केल्याप्रकरणी वनविभाग शहापूर यांनी वअनिल देशमुख यांच्या डोळखांब वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बोधनपाडा गावाशेजारील फार्महाऊसवर कारवाई केलेली होती व वन विभागाकडून धाड टाकून पांढरीची लाकडे जप्त करण्यात आली. पुढे आपण संबंधित व्यक्तीवर काय कारवाई केली ? आणि कारवाई केली असल्यास त्याची पूर्ण माहिती मला मिळावी ? असे प्रश्न स. है. जोंधळे विद्यासमुहाचे अध्यक्ष सागर शिवाजीराव जोंधळे यांनी माहितीच्या अधिकारात विचारला आहे. सागर शिवाजीराव जोंधळे यांच्या या माहिती अधिकारातील प्रश्नाने शहापूर विभागीय वन अधिकाऱ्यांकडून उत्तरे देताना अनेक गुपीते बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. यामुळे सागर शिवाजीराव जोधळे यांच्या प्रश्नांना शहापूर विभागीय वन विभाग काय उत्तरे देतो याकडेच सर्वांचेच लक्ष लागले आहे. चौकट पांढरीचे लाकुड खुप दुर्मिळ अशी वनस्पती आहे. ही वनस्पती मुख्यत: कोकण भागातील जंगलामधेच आढळते. पांढरीच्या लाकडाचे मुख्य वैशिष्टे म्हणजे या वनस्पतिचे लाकुड पाण्यात तळाशी बुडते.

अर्चना देशमुख यांच्या श्री ब्रम्हगुलाब तालवाद्य क्लासेस संस्थेचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

ठाणे : श्री. ब्रम्हगुलाब तालवाद्य क्लासेस, ठाणे या संस्थेच्या प्रमुख अर्चना देशमुख यांनी आयोजित केलेल्या वार्षिक संमेलणाचा कार्यक्रम नुकताच द्वारका बँक्वेट हॉल येथे उत्साहात संपन्न झाला. दर्शना योगेश जानकर, डॉ. अरुंधती भालेराव, तेजश्री सावंत, चंद्रकांत चौधरी, चेतन कोळी, आनंदी खोत, पत्रकार अनिल ठाणेकर आदी विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवर उपस्थित होते. श्री ब्रह्म गुलाब क्लासेस यांचा स्नेहसंमेलन तसेच गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता  हा सांस्कृतिक कार्यक्रम अर्चना देशमुख यांच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण दाखवत स्वतंत्र तबला वादन, ढोलकी वादन तसेच गायन नृत्य यांच्या सादरीकरणाने साजरा करण्यात आला. यावेळी प्रेक्षकांनी व पालकांनी भरभरून दाद दिली. याप्रसंगी मान्यवरांचे योग्य असे मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना लाभले गेल्या पंधरा वर्ष विद्यादानाचे कार्य श्री ब्रह्म गुलाब क्लासेस मार्फत अर्चना देशमुख या करीत आहेत ठाणे, मुलुंड येथे ऑनलाइन वर्ग अर्चना देशमुख या घेत असतात.

जनताच आता न्याय करणार, मशाल धगधगणार- आदित्य

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडीयावर प्रतिक्रीया व्यक्त करताना आता जनताच आता न्याय करणार असून मशाल धगधगणार असल्याचे म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी…

मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका

अहिल्यानगर :  ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना आज पहाटेच्या सुमारास ब्रेनस्ट्रोकचा झटका बसला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नाशिकच्या नाईन पल्स रूग्णालयात उपचार सुरु आहेत. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना आज पहाटेच्या सुमारास राजूर…

आमदारांच्या नियुक्तीला कोर्टात आव्हान देणार : अनिल देशमुख

नागपूर : राज्यपाल नियुक्त ७ आमदारांच्या शपथविधीला कोर्टात आव्हान देणार असल्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी जाहीर केले. राज्यपाल हे भाजप कार्यकर्त्यासारखे काम करत असल्याची टीकाही…