१०५ दलघमी साठवण क्षमता होणार निर्माण
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांसाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली शहरांसह नव्याने समाविष्ट २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे.
यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे २७ गावांतील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच १०५ दलघमी साठवण क्षमता निर्माण होणार आहे.
अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन व हरित क्षेत्र विकास इत्यादी पायाभूत सुविधांची निर्मिती शहरांत करण्यात येत आहे. त्यानुसार कल्याण-डोंबिवली शहरांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
कल्याण-डोंबिवली शहरांच्या पाणीपुरवठा प्रकल्पातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुधारित तांत्रिक बदल प्रस्तावाला राज्यस्तरीय तांत्रिक समिती तसेच राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी दिली होती. त्याला अनुसरून या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
अमृत अभियानाची प्रकल्प विकास व व्यवस्थापन सल्लागार असणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सादर केलेल्या तांत्रिक बदलाच्या ३५७.१६ कोटी रुपयांच्या प्रकल्प किमतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या योजनेचा लाभ कल्याण-डोंबिवली शहरांसह नव्याने समाविष्ट २७ गावांना होणार आहे.
०००००