Month: March 2026

कळसुबाई शिखरावर शालेय विद्यार्थ्यांचा झेंडा

कल्याण : शालांत परीक्षा संपल्यानंतर मुलांना सुट्ट्यांचे वेध लागतात. दहावीची परीक्षा संपल्यानंतर पिकनिक, वॉटर रिसॉर्ट, मोबाईल, कम्प्युटर गेम यापासून दूर जात  काही मुलांनी एकत्र येत महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर पार करण्याची मोहीम आखली. यासाठी गिर्यारोहक आणि प्रशिक्षक प्रदीप नायक यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत लोक कल्याण पब्लिक स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच ही मोहीम फत्ते केली. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्या मध्ये असणारे सर्वोच्च शिखर (१६४६ मी/५४०० फूट उंच ) ज्याला महाराष्ट्र चा एव्हरेस्ट मानले जाते. मुलांनी सायंकाळी शिखराकडे कूच केल्यानंतर मध्ये अनेक अडचणी आल्या. विद्यार्थ्यांचा हा पहिलाच प्रयत्न होता. या सर्वांवर मात करत सकाळी ६ वाजता शालेय विद्यार्थ्यांनी कळसुबाई शिखर सर केले. या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि पहिल्यांदाच केलेला कामगिरीचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता.  या टीम मध्ये स्केटिंगची राष्ट्रीय खेळाडू आस्था नाइकर, तीर्था पणिकेर, दिशिता खाचणे, हर्षिल सोळंकी, धनराज सावंत, सार्थक घोडेस्वार, श्रेया प्रसाद, श्लोक बोंबाटकर, शोभित लोखंडे, सई देशमुख, अमेय सोरकाडे, यश भोर, रणबीर प्रसाद, श्रावणी बांदेकर, कृष्णा पाणीग्रही, तृषा खराडे, पार्थ दाभाडे, मनस्वी ढेंगरे, विरेन वानखेडे, अथर्व कदम, वेदिका देवळेकर, मनस्वी फुटाणे, आर्या गुरव आणि प्रशिक्षक प्रदीप नायक यांचा समावेश होता.

टँकरच्या नावाने करोडो रुपयांची झाली सरकारी उधळपट्टी तरीही पाणी टंचाई कायम !

टँकरच्या नावाने करोडो रुपयांची झाली सरकारी उधळपट्टी तरीही पाणी टंचाई कायम ! धरणांच्या तालुक्याची भयानक कैफियत अविनाश उबाळे ठाणे : शहापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी गाव पाड्यांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या काळात उन्हाळ्यात दरवर्षी टंचाईग्रस्त गाव पाड्यांना टँकरने पाणी पुरविले जाते.यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून सरकारी टँकर सुरु केले जातात केवळ आदिवासी गाव पाड्यांवर पाणी पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आजमितीस सरकारी तिजोरीतून करोडो रुपयांची टँकरच्या नावाने उधळपट्टी केलेली आहे.उन्हाळा सुरु झाला की टंचाई गाव पाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा पाणी पुरवठा विभागाकडून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला जातो त्यास शासनाची मंजूर मिळाली की टँकर सुरु करण्यासाठी निविदा मागविल्या जातात आपल्या मर्जीतल्याच टँकर लॉबीला पाणी पुरविण्याची दरवर्षी कंत्राट दिली जातात जिथे टँकर पोहचू शकत नाहीत अशा डोंगरदऱ्या खोऱ्यात पठारावर असलेल्या वाड्या वस्त्यांवर बैलगाडीतून पाणी पुरवठा केला जातो गेल्या १० वर्षांत तब्बल ६ कोटींहून अधिक खर्च हा राज्य सरकारला केवळ टंचाई गाव पााड्यांना पाणी पुरविण्यासाठी करावा लागला आहे बरेच वर्ष टँकरवर अवलंबून असणारा शहापूर तालुका दुर्दैवाने आजही टँकरमुुक्त होऊ शकलेला नाही . आजही आदिवासी महिलांची पाण्यासाठी सुरु असलेली वणवण व त्यांच्या डोक्यावर हंडा हे चित्र नजरेस पडते.टँकर उन्हाळ्यात सुरु होऊनही हे टँकर कधीच सुरळीतपणे व वेळेवर टंचाई ग्रस्त गाव पाड्यांवर पोहचले नाहीत अशी ओरड आदिवासी महिलांची असते आणि प्रत्यक्षात वस्तुस्थिती देखील तशीच बघायला मिळते आहे.अनियमित टँकर येत असल्याने टँकरची वाट पाहत बसण्यापेक्षा आदिवासी पाण्यासाठी इतरत्र भटकंती करतात प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका आदिवासींना बसत असल्याने  टँकर नंतरही पाण्यासाठी त्यांचे भयानक हाल सुरुच असल्याचे चित्र तालुक्यातील टंचाई ग्रस्त गाव पाड्यांवर दिसत आहे .टंचाई ग्रस्त भागात टँकरने पाणी पुरवठा करण्याबरोबरच टंचाई आराखड्यात नवीन पाणी योजना प्रस्तावित करणे,नव्या विहीरी बांधणे,विहिरींमधील गाळ काढणे,व विहिरींचे खोलीकरण करणे ,नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती करणे, नवीन विंधन विहीरी,जुन्या विंधन विहीरींची दुरुस्ती करणे,हात पंप बसवणे टंचाईग्रस्त भागातील गावासाठी बोअरवेल मंजूर करणे यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो पण गेल्या कित्येक वर्षापासून हा निधी खर्च होऊनही अनेक योजनांत गैरव्यवहार झाल्याने बहुतांश योजनांचा खर्च हा अक्षरशः पाण्यात गेलेला दिसतो आहे .या गैरव्यवहार प्रकरणी स्थानिक ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनांवर यापूर्वी गुन्हे देखील दाखल झालेले आहेत या सर्व पाणी योजनांची शासनस्थरावर चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे .या सर्व पाणी योजना या कुचकामी ठरल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येथे आली आहे.जवळपास तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या गाव पाड्यावरील अनेक पाणी योजना बोगस ठरलेल्या आहेत.शहापूर तालुक्यात एकूण २०३ पाणी योजना असल्याची माहिती मिळते आहे यातील १३७ पाणी योजना या कशातरी रडतखडत सुरु आहेत तर जवळपास १७ पाणी योजना अपूर्ण अवस्थेत बंद पडून आहेत.बऱ्याच आदिवासी वस्त्यांमध्ये पाणी योजनाच नाहीत ठाणे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कित्येक वर्ष टँकरने पाणी पुरविण्याचे नियोजन करते परंतु शहापूरची ही पाणी टंचाईची अवस्था पाहता व त्यासाठीचा होणारा अवास्तव खर्च पाहता टंचाईग्रस्तांसाठी पाणी पुरवठा करण्यासाठीच्या ठोस अशा कोणत्याच उपाययोजना पाणी पुरवठा खात्याला एवढया वर्षांत करता आलेल्या नाहीत हे टंचाईग्रस्तांना टँकरने पाणी पुरवठयासाठी झालेल्या सरकारी खर्चावरुन स्पष्ट होत आहे.या कामी ग्रामीण पाणी पुरवठा योजना सपशेल अपयशी ठरल्याने उन्हाळ्यात फक्त पाण्यासाठी टँकरवरच गाव पाड्यांवरील लोकांना अवलंबून राहावे लागत आहे.हे येथील जळजळीत वास्तव आहे.शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई सोडवण्यासाठी सरकारचे कुठलेच योग्य नियोजन दिसून येत नसून केवळ नेहमीची येतो पावसाळा, या युक्ती प्रमाणे दरवर्षी फक्त टँकरने पाणी पुरवठा या गोंडस नावाखाली टँकर लॉबीला पोसण्याचे काम येथे कित्येक वर्ष प्रशासनाकडून सुरु असून ही टँकरच्या नावाने सरकारी उधळपट्टी येथे सुरु असल्याचे दिसत आहे .करोडो रुपये टँकरच्या नावाखाली खर्च होऊनही हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांची उन्हातान्हात वणवण कायम असल्याचे विदारक असे चित्र धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर तालुक्यात दिसत आहे.

ॲट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

विष्णू व अक्षय घुडे दोघे अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी राजीव चंदने मुरबाड :सरळगाव येथे वकील एड. प्रफुल्ल अजित रोकडे व त्यांचे भाऊ अक्षय अजित रोकडे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी विष्णू सदाशिव घुडे व अक्षय सदाशिव घुडे या दोघांना मुरबाड पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणात जातीय द्वेषातून हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर मुरबाड पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात बौद्ध समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. समाजातील वाढत्या रोषाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाला गती देत दोन्ही आरोपींना अटक केली. या कारवाईबद्दल पोलीस उपविभागीय अधिकारी लाड यांच्या कार्याचे आंबेडकरी समाजाकडून अभिनंदन करण्यात येत आहे. या प्रकरणातील सर्व संबंधित आरोपींना अटक करण्यात आल्याने आता तपास पुढील कायदेशीर प्रक्रियेनुसार सुरू असून, पीडितांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 00000000000

एसएनडीटी विद्यापीठात शिवाजी महाराज जयंती उत्सव

मुंबई: चर्चगेट येथील एसएनडीटी महिला विद्यापीठात “छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव” हा कार्यक्रम नुकताच उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख निर्माण करणे व त्यांच्यापासून प्रेरणा देणे हा…

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ

हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली माहिती अशोक गायकवाड अलिबाग: देशातील व्यावसायिक एलपीजी गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, राज्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण कोट्यात आता ५० टक्क्यांपर्यंत मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी राज्य शासनाच्या सूचनेनुसार करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. या नव्या धोरणानुसार, राज्यांना यापूर्वी मिळणाऱ्या २० टक्के आणि त्यानंतर सुधारणांच्या आधारे वाढविण्यात आलेल्या १० टक्के कोट्याव्यतिरिक्त आता अतिरिक्त २० टक्के कोटा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे व्यावसायिक एलपीजीचा एकूण पुरवठा आता संकटपूर्व काळातील पातळीच्या ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. या वाढीव कोट्याचा सर्वाधिक फायदा रेस्टॉरंट्स, ढाबे, हॉटेल्स, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया उद्योग, दुग्धशाळा आणि सरकारी अनुदानित अन्न केंद्रांना होणार आहे. तसेच स्थलांतरित मजुरांसाठी उपलब्ध असलेल्या ५ किलोच्या एफटीएल सिलिंडर पुरवठ्यालाही यात प्राधान्य देण्यात आले आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही अटीही लागू केल्या आहेत. सर्व व्यावसायिक आणि औद्योगिक एलपीजी ग्राहकांना संबंधित तेल कंपन्यांकडे आपली अधिकृत नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या कंपन्या ग्राहकांच्या वार्षिक वापराचा आणि त्यांच्या क्षेत्राचा संपूर्ण रेकॉर्ड ठेवणार आहेत, जेणेकरून गॅसचा गैरवापर टाळता येईल. यासोबतच, ज्या भागात पाईप गॅसची सुविधा उपलब्ध आहे, तिथे ग्राहकांनी पीएनजीसाठी अर्ज करणे आणि त्या वापरासाठीची तयारी दर्शविणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक क्षेत्रातील इंधन टंचाई दूर होण्यास मदत होणार असून उद्योगांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.

नाशिक कोर्टाच्या आवारात गोंधळ! तृप्ती देसाई भोंदू बाबाच्या अंगावर धावल्या

हरिभाऊ लाखे नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण पोलिसांनी स्थानिक पातळीवर दाबण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नेत्यांनी आणि पोलिसांनी पीडितांना न्याय मिळेल अशी कृती करणे अपेक्षित असताना प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला,…

समतेचा जागर वर्षभर सुरू राहणार

समतेचा जागर वर्षभर सुरू राहणार डॉ. हर्षदीप कांबळे यांचे प्रतिपादन चवदार तळे सत्याग्रह दिनी बार्टीचे प्रबोधनात्मक कार्यक्रम अलिबाग : (अशोक गायकवाड )- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी हक्क मिळवून देण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. तो लढा समतेसाठी, स्वाभिमानासाठी न्यायासाठी होता. या समतेच्या संगराला पुढील वर्षी शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. यानिमित्त वर्षभर सामाजिक न्याय विभागाच्यामार्फत समतेचा जागर सुरू राहणार, असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्यावतीने महाड येथील राष्ट्रीय स्मारकामध्ये बार्टीच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या लढ्यात सर्व जातीधर्मातील लोकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे साथ दिली. चवदार तळ्याचा लढा हा मानव मुक्तीचा होता. चवदार तळ्यातील पाणी स्वच्छ करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ५५ कोटी रुपये मंजूर केले असून ते पाणी जल शुद्ध प्रकल्पाद्वारे शताब्दी पूर्वी पिण्यायोग्य होईल. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय खाते कटिबद्ध असून आपण सर्वांनी डॉ बाबासाहेबाचा समतेचा लढा पुढे नेण्यासाठी आपण एकत्र येऊन पुढे नेवू या, असे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे यांनी बार्टी आयोजित चवदार तळे सत्याग्रह दिन अभिवादन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना व्यक्त केले. २० मार्च भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्या वतीने महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील सभागृहात चवदार तळे सत्याग्रह दिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजकल्याणच्या आयुक्त तथा बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ -मुंडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे, उपायुक्त भंडारे, लवटे, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव, बार्टीच्या निबंधक डॉ सुचिता शिंदे, विभागप्रमुख रविंद्र कदम, शुभांगी पाटील, डॉ.बबन जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.कांबळे पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे पिण्याच्या पाण्यासाठी जो सत्याग्रह केला तो सत्याग्रह नुसता पाण्याचा नव्हता तर तो स्वाभिमानाचा होता. समाजात समता प्रस्थापित करण्याचा होता. त्याच वाटेवर सामाजिक न्याय विभाग काम करत आहे.सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनेक नवीन उपक्रम सुरू असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेतलेल्या लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने आंबेडकर अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तिथे आपली मुले संशोधन व अभ्यास करतील. आपल्या मुलांनी यशस्वी होण्यासाठी अविश्रांत मेहनत करा, मेहनतीमुळेच आपण आपल्या जीवनात यशस्वी होतो, असा प्रेरक संदेश त्यांनी दिला. यावेळी डॉ.हर्षदीप कांबळे लिखित “मी महाडचे चवदार तळे बोलतोय” ही अत्यंत प्रेरक अशी चित्रफीतही दाखवण्यात आली. आभार व्यक्त करताना समाजकल्याणच्या आयुक्त तथा बार्टीच्या महासंचालक श्रीमती दीपा मुधोळ -मुंडे यांनी समाजकल्याण व बार्टीच्या विविध योजनेचा समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन उच्च शिक्षण घ्यावे, तसेच आपले भविष्य घडवावे, असे आवाहन केले. क्रांतीस्तंभ येथील मुख्यमंचावर बार्टीच्या वतीने प्रसिद्ध गायक कुणाल वराळे, शाहीर शहीद खेडकर, हर्षद कांबळे यांनी “पाऊले या क्रांतीच्या” भीम गीतांच्या माध्यमातून चवदार तळ्याच्या संघर्षमय आठवणीला उजाळा दिला. महाड स्मारकात गायक अशोक गायकवाड यांनी “रथ भीमाचा नेऊ पुढे” हा संगीतमय कार्यक्रम सादर केला. तसेच लेखक -दिगदर्शक- निर्माता राहुल जोंधळे लिखित “निळी टोपी” व दर्शन महाजन निर्मित संविधानावर आधारित “राष्ट्रग्रंथ” हे ४० कलाकारांचा संच असलेली नाटके सादर केली. बार्टी संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांचे मौल्यवान ग्रंथ सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली होते. त्याचे उद्घाटनही प्रधान सचिव डॉ.कांबळे यांनी केले. याप्रसंगी समाजकल्याण व बार्टीतील अधिकारी व कर्मचारी तसेच राज्यभरातून आलेले भीम अनुयायी, विविध क्षेत्रातील मान्यवर” बार्टीचे समतादूत, तालुका समनव्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात, डॉ.सारिका थोरात, महाड व्यवस्थापक प्रकाश जमदाडे, जनसंपर्क अधिकारी लीना कांबळे यांच्यासह बार्टीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन विस्तार व सेवा विभागाचे विभागप्रमुख डॉ.बबन जोगदंड यांनी केले.

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जिल्हा कृती दलाची बैठक

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जिल्हा कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे मार्गदर्शन रत्नागिरी : (अशोक गायकवाड )—पथनाट्ये, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मॅरेथॉन यासारख्या विविध स्पर्धा आयोजित करुन ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाची प्रचार प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात करावी. १० वी, १२ वी मुलींसाठी कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन मेळावा आयोजित करुन एमपीएससी, युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मल्लीनाथ कांबळे, परिविक्षा अधिकारी अनिल माळी आदी उपस्थित होते. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. मुलांप्रमाणे मुलींनाही समान दर्जा प्राप्त करुन देणे, स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण समान करणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, स्त्री भ्रूण हत्या रोखणे, मुलींना संरक्षण पुरविणे, बालिकेच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे, मुलीच्या जन्माबाबत सकारात्मक विचार निर्माण करणे, शिक्षणासाठी मुलींना अधिकाधिक प्रोत्साहित करणे, बालिकेच्या शिक्षणाबाबत खात्री देणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत. पोलीस पाटील, सरपंच, निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांचे पीसीपीएनडीटी, पोक्सो, आरटीई बालविवाह या विषयांवर प्रबोधन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी जिंदल यांनी योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत सांगितले. यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ कृती आराखडा २०२५-२६ ला मान्यता देण्यात आली.

रुबेनच्या दोन गोलच्या जोरावर कॅथलिक जिमखान्याचा सहज विजय

सुपर कॉर्पोरेट फुटबॉल लीग रुबेनच्या दोन गोलच्या जोरावर कॅथलिक जिमखान्याचा सहज विजय मुंबई, २३ मार्च: आक्रमक स्ट्रायकर रुबेन फर्नांडिसच्या अप्रतिम दोन गोलच्या जोरावर कॅथलिक जिमखाना लिमिटेडने मुंबई फुटबॉल असोसिएशन (एमएफए) सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये नेव्हल डॉकयार्डविरुद्ध ४-१ असा एकतर्फी विजय मिळवला. चर्चगेट येथील कर्नाटक एसए मैदानावर झालेल्या सामन्यात सोमवारी मध्यंतरापर्यंत कॅथलिक जिमखान्याकडे २-१ अशी आघाडी होती. उत्तरार्धात त्यात आणखी दोन गोलची भर घातली. रुबेनचे सहकारी कस्तुभ मेहेर आणि करण कपूरने प्रत्येकी एक गोल करून विजयात खारीचा वाटा उचलला. नेव्हल डॉकयार्डकडून एकमेव गोल मिलिंद मेहेरने पेनल्टीवर पहिल्या सत्रात केला. ११ व्या मिनिटाला करणने फॉरवर्ड पास देऊन रुबेनला गोल करण्याची संधी दिली. रुबेनने चेंडूवर नियंत्रण ठेवत प्रतिस्पर्ध्याच्या दिशेने धाव घेतली आणि अचूक प्लेसमेंटने डॉकयार्डचा गोलकीपर कुंदन धनूला सहज चकवले. त्यानंतर, २८ व्या मिनिटाला कस्तुभने चेंडू गोल जाळ्यात ढकलून कॅथलिक जिमखान्याची आघाडी (२-०) दुप्पट केली. मध्यंतरापूर्वी काही मिनिटांपूर्वी, किंग्स्टन परेराने पेनल्टी एरिया क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने चेंडू हाताळल्यामुळे डॉकयार्डला पेनल्टी मिळाली. त्यावर मिलिंद मेहेरने पेनल्टी स्पॉटवरून गोल केला. उत्तरार्धात, रुबेनने गोलपोस्टच्या डाव्या बाजूने डाव्या पायाने मारलेल्या जोरदार लो-शॉटने प्रतिस्पर्धी गोलकीपरला चकवून कॅथलिक जिमखान्याची आघाडी (३-१) वाढवली. त्यानंतर, रुबेनच्या थ्रू पासवर करणने पुढे आलेल्या गोलकीपरला चकवून सर्वोत्तम गोल केला. कॅथलिक जिमखान्याचा हा सलग तिसरा विजय आहे. निकाल: कॅथलिक जिमखाना लिमिटेड ४(रुबेन फर्नांडिस २, कस्तुभ मेहेर, करण कपूर प्रत्येकी १) विजयी वि. नेव्हल डॉकयार्ड १ (मिलिंद मेहेर).