Month: March 2026

निसर्गातील पंचतत्त्वांचे जतन करून घरोघरी नर्सरी ही संकल्पना राबवावी – महापौर डिंपल मेहता

निसर्गातील पंचतत्त्वांचे जतन करून घरोघरी नर्सरी ही संकल्पना राबवावी – महापौर डिंपल मेहता मिरा – भाईंदर : पर्यावरण संवर्धन ही केवळ शासन किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. निसर्गातील पंचतत्त्वांचे जतन करून घरोघरी नर्सरी ही संकल्पना राबवावी, असे आवाहन मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांनी केले. महापालिका आयोजित वसुंधरा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या. माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित या तीन दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी महापौरांच्या हस्ते आणि आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. माझी वसुंधरा महोत्सवाच्या निमित्ताने पद्मभूषण मेजर ध्यानचंद मैदानात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांनी प्रदर्शनातील पर्यावरणपूरक स्टॉल्स आणि शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रकल्पांची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. या प्रदर्शनात औषधी वनस्पती, बी-बियाणे आणि विविध नर्सरी, आयुर्वेदिक उत्पादने, हस्तकला आणि हँडलूम वस्त्रे, सोलर सेल्स, सोलर बॅटरी आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसारखी आधुनिक तंत्रज्ञानाची सादरीकरणे करण्यात आली. या सोहळ्याला उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, स्थायी समिती सभापती हसमुख गहलोत, महिला व बालकल्याण समिती सभापती अनिता पाटील, उपसभापती हेमा बेलानी, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे व प्रियंका राजपूत, डॉ. सचिन बांगर, कविता बोरकर, प्रणाली घोंगे, स्वप्नील सावंत, नागेश विरकर हेही उपस्थित होते.

बोरीवली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

बोरीवली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर असंख्य नागरिकांनी घेतला लाभ मुंबई,  (प्रतिनिधी ) : श्री साईधाम सेवा समिती, देवीपाडा, बोरिवली (पूर्व) येथे श्री राम नवमी निमित्त या विभागातील नागरिकांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत आरोग्य शिबिरात वैद्यकीय चिकित्सा करण्यात आली. कांदिवली पूर्व येथील साईबाबा हॉस्पिटलच्या सौजन्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. नर्सिंग ऑफिसर सौ. नीता सिद्धेश नाईक यांनी आयोजक या नात्याने मार्गदर्शन केले. मधुमेह, रक्तदाब, ई. सी. जी., महिलांच्या आरोग्य समस्या व गर्भधारणा बद्दलचा सल्ला फिस्टुला, स्टोन, अपेन्डिक्स लहान मुलांना शाळेसाठी ब्लड ग्रुप व इतर अन्य तपासणी करण्यासाठी डॉ. श्रद्धा गांधी (एम. डी. फिजिशन), डॉ. जयश्री खोपकर (स्त्रीरोगतज्ञ), डॉ. पूजा तिवारी (लेप्रोस्कोपी सर्जन) यांच्या मार्गदर्शनाखाली चिकित्सा करण्यात आल्या. लॅब टेक्निशियन दिलीप नाटेकर. प्रकाश सहारे. साई मुरली केमिस्ट परीन पटेल, कुशल शाह, भारती पन्हाळे, (सिस्टर) प्रतीक्षा हंकारे, पूजा भोसले, गणेश कोणार, चेतन शिंदे यांच्या पथकाने हे शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेळाव्यात स्नेहसंमेलन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेळाव्यात स्नेहसंमेलन मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची अभिनव संकल्पना मुंबई, (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यातील सेवानिवृत्तांच्या तिसऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा दिमाखदार कार्यक्रम नुकताच लखमशी नप्पू हॉल, माटुंगा येथे संपन्न झाला. विश्वनाथ बंगेरा यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांच्या दमदार प्रवेशाने स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला अत्यंत मराठमोळ्या आणि अत्युच्च वातावरणात पोहोचविले. जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातच महापालिका कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन साजरे होत आहे, असा आभास निर्माण झाला होता. यावेळी प्रसिद्ध गझलकार आप्पा ठाकूर यांच्या गझलांची पेशकश उपस्थितांची वाहव्वा मिळवून गेली. प्रसिद्ध दिग्दर्शिका सुषमा भागवत यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रहसनाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. तद्नंतर सादर झालेल्या मराठी गाण्यांवर उपस्थित सेवानिवृत्तांची पावले याही वयात थिरकली. यावेळी सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्र गीताच्या वेळी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या प्रवेशाने कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला. कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक संजय मोरे, विजय पाताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाची धुरा रवींद्र मोरे व प्रकाश मोरये यांनी समर्थपणे सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा शेट्ये, वंदना शिर्के व ज्योत्स्ना मुळावकर यांनी केले.

‘हेमुदादा’ मधील ह्रुदयद्रावक प्रसंग पाहून बिर्ला मातोश्री सभागृह हेलावले

‘हेमुदादा’ मधील ह्रुदयद्रावक प्रसंग पाहून बिर्ला मातोश्री सभागृह हेलावले स्वतः डॉ. हेमराज शाह यांच्या अश्रूंचा फुटला बांध मुंबई, दि. (प्रतिनिधी): आई वडील यांचे छत्र गमावलेला तरुण सामखियाली, भचाऊ या कच्छच्या रणातून मुंबईत येतो काय, पदपथावर झोपून रात्री काढतो काय आणि मग संघर्षमय जीवन जगता जगता समस्त कच्छी, गुजराती बांधवांसाठी झटता झटता तब्बल सात मजली गुजराती भवन उभारुन समाज बांधवांना एका रेशमी धाग्यात गुंफून भली मोठी समाज बांधवांची माला तयार करतो काय. सारेच विलक्षण, सारेच अनाकलनीय, अकल्पनीय आणि त्यात पत्नी सौ. केसर यांचा ग्रॅंट रोड रेल्वे स्थानकात अपघाती मृत्यू होतो तसेच एकुलती एक कन्या रेखा हिचा कर्करोगाने मृत्यू होतो. सुपुत्र उदय आणि अरविंद यांनी हेमराज शाह यांना पावलोपावली दिलेला आधार तसेच कोणतेही संवैधानिक पद नसतांना एक कादंबरी, एक डॉक्युमेंटरी आणि हेमूदादा ही दीर्घांकिका रंगमंचावर येते. अनेक देश विदेशातील संस्था डॉक्टरेट देऊन गौरव करतात. अशा या तरुणांनाही लाजवील अशा ८६ वर्षीय डॉक्टर हेमराज विरम शाह या अफलातून व्यक्तिमत्त्वाचे संघर्षमय जीवन उलगडताना चर्चगेट जवळील बिर्ला मातोश्री सभागृह हेलावले आणि स्वतः डॉ हेमराजभाईंच्या ‘नयनां’तून अश्रूंचा बांध फुटला. बृहन्मुंबई गुजराती समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष, कच्छ शक्ती वृत्तपत्राचे संस्थापक संपादक डॉ. हेमराजभाई शाह यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त बिर्ला मातोश्री सभागृह, चर्चगेट येथे त्यांच्या जीवनावर आधारित ‘हेमूदादा’ या वसंत मारु लिखित आणि वसंत मारु, कवन सांवला दिग्दर्शित दीर्घांकिका सादर करण्यात आली. लहान मोठ्या १६ कलाकारांनी या नाट्यप्रयोगात काम करतांना डॉ हेमराज शाह यांचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखविला. जन्मभूमी चे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मुख्य संपादक पद्मभूषण कुंदनभाई व्यास समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. गुजरातचे माजी अर्थमंत्री बाबुभाई मेघजी शाह, महाराष्ट्राचे माजी सनदी अधिकारी बिपीन श्रीमाळी तसेच नवनीत प्रकाशनचे अनिल गाला आणि बिपिन गाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथींनी डॉ. हेमराजभाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. नागजी रीठा यांनी सूत्रसंचालन केले.

४० वर्षावरील क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

नवी मुंबई महानगरपालिका चषक ४० वर्षावरील क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ नवी मुंबई : ४० वर्षावरील क्रिकेट खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावे व शारीरिक तंदुरुस्तीबाबत त्यांच्या मनात असलेली आरोग्य जागरुकता वाढविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषकांतर्गत मागील १० वर्षापासून ४० वर्षावरील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धा जाहीर होऊन अलपकालावधी उपलब्ध होऊनही या स्पर्धेला मिळलेला भरघोस प्रतिसाद उत्साह वाढविणारा असल्याचे मत महानगरपालिकेच्या क्रीडा, सांस्कृतिक कार्य व युवक कल्याण समितीचे सभापती  गिरीष म्हात्रे यांनी व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयाजवळील क्रीडांगणात २३, २४ व २५ मार्च २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर चषक ४०वर्षावरील क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. या प्रसंगी क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, ४० वर्षावरील क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मास्टर प्रदिप पाटील, उपाध्यक्ष  नरेश गौरी, सचिव  एल डी पाटील व विकास मोकल, मनोज म्हात्रे, बळीराम पाटील, भालचंद्र दळवी, बाळकृष्ण बंदरे व इतर मान्यवर उपस्थित होते. स्पर्धमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ग्रामीण भागातील ३३ क्रिकेट संघ तसेच शहरी भागातील २५ क्रिकेट संघ असे एकूण ५८ क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत. यावेळी पावणेगाव व ऐरोलीगाव या संघांमध्ये झालेल्या शुभारंभाच्या सामन्यात पावणेगाव संघाने विजय संपादन केला. या स्पर्धतील ग्रामीण क्रिकेट संघांसाठी स्वतंत्र विजेता व उपविजेता चषक तसेच शहरी भागातील क्रिकेट संघांसाठी स्वतंत्र विजेता व उपविजेता चषक असणार आहे.  वैयक्तिक कामगिरी करणा-या सर्वोतम खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील दोन स्वतंत्र स्पर्धांच्या अंतिम फेरीचे सामने सेक्टर ३ सीबीडी बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकूलात संपन्न होणार आहेत. विशेष म्हणजे हे सामने क्रीडा संकुलात नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रखर विद्युत व्यवस्थेत प्रकाशझोतात संपन्न होणार आहेत. तरी क्रिकेटप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी क्रिकेट सारख्या लोकप्रिय खेळाच्या माध्यमातून चाळीशीनंतर आपले आरोग्य जपणा-या ४० प्लस खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

लीलावती, जेजे हॉस्पिटलचा विजयी प्रारंभ  

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा लीलावती, जेजे हॉस्पिटलचा विजयी प्रारंभ आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत सामनावीर संदीप कणसे (३७ धावा) व संतोष पंधारे (३४ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे लीलावती हॉस्पिटलने बलाढ्य केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई संघाचा ५ विकेटने पराभव केला आणि सनसनाटी विजयासह सलामीची लढत जिंकली. शतकवीर नितीन कांबळेने केडीए हॉस्पिटलचा पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दुसऱ्या सामन्यात जे.जे. हॉस्पिटलने बॉम्बे हॉस्पिटल संघावर ८ विकेटने धडाकेबाज विजय मिळविला. क्रिकेटपटू प्रवीण तेजाळे, क्रीडाप्रेमी संजय कदम व प्रभाकर गोलामडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी रुग्णालयीन क्रिकेटपटूंना शिवाजी पार्क मैदानात उद्घाटनीय शुभेच्छा दिल्या. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने सुरू झालेल्या स्पर्धेत लीलावती हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून केडीए हॉस्पिटलला प्रथम फलंदाजी दिली. लीलावती हॉस्पिटलचा मध्यमगती गोलंदाज पराग जाधवच्या (२० धावांत ३ बळी) अचूक गोलंदाजीमुळे केडीए हॉस्पिटलची दुसऱ्या षटकात ३ बाद १५ धावा अशी बिकट अवस्था झाली. परंतु नितीन कांबळेच्या (५० चेंडूत १०३ धावा) झंझावाती शतकी फलंदाजीमुळे केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई संघाने मर्यादित २० षटकात ६ बाद १५९ धावसंख्या उभारली. संदीप कणसे (२५ चेंडूत ३७ धावा) व संतोष पंधारे (२५ चेंडूत ३४ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे लीलावती हॉस्पिटलने विजयी लक्ष्य १८.२ षटकात ५ बाद १६३ धावा फटकावून साध्य केले. दुसऱ्या सामन्यात फिरकी गोलंदाज प्रवीण वाघेलाच्या हॅटट्रीकमुळे जे.जे. हॉस्पिटलने बॉम्बे हॉस्पिटलचा डाव १५.४ षटकात १०७ धावांमध्ये गुंडाळला. मयुरेश पाटीलने नाबाद ४६ धावा केल्या. शैलेश वाघेलाच्या दमदार अर्धशतकामुळे जे.जे. हॉस्पिटलने दहाव्या षटकाला २ बाद १०८ धावा फटकावून बॉम्बे हॉस्पिटल विरुध्द मोठा विजय नोंदविला.

 मतदानापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीचा खून!

मतदानापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीचा खून! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा साताऱ्यातील घटनेवर घणाघात अनिल ठाणेकर मुबंई, राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनातून बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळावर संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत म्हटले की, “मतदानापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीचा खून आहे.” या घटनेला त्यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे प्रकरण ठरविले. सदरची बाब त्यांनी आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली. विधानसभेत बोलताना शिंदे यांनी सांगितले की, निवडणुकीपूर्वीच शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी त्यांना फोन करून दोन मतदारांवर अचानक गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिली होती. या प्रकारामागे निवडणुकीचा निकाल बदलण्याचा प्रयत्न असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर शिंदे यांनी तत्काळ साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्याशी संपर्क साधून स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, मतदान पूर्ण होईपर्यंत कोणत्याही मतदाराला अडवू नये. मात्र प्रत्यक्षात दोन मतदारांना ताब्यात घेण्यात आल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या घटनेचा निषेध करताना शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारे मतदारांना मतदानापासून रोखण्याची घटना प्रथमच घडली असून हा प्रकार लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर आघात करणारा आहे. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे सहन केले जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितले.

‘१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषद संपन्न

‘१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषद संपन्न अनिल ठाणेकर सांगली, स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्था संचलित, बाबा नाईक महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि आय.क्यू.ए.सी. (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने “१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता” या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. भगतसिंग नाईक यांच्या हस्ते झाले. बीजभाषक म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रो. डॉ. एम. एस. देशमुख यांनी भारताच्या ७९ वर्षांच्या कृषी प्रवासाचा आढावा घेतला. परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला पाटील होत्या. या सत्राचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रो. डॉ. विनोद राठोड यांनी केले. प्रथम सत्र: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय ठिगळे यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कृषी विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या सत्राचे अध्यक्षपद डॉ. जयवंत इंगळे यांनी भूषवले. या सत्राचे आभार प्रो.डॉ.के.आर.गावडे यांनी मानले.द्वितीय सत्र: पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथील डॉ. कुलविंदर सिंग यांनी १९४७ मधील कृषी स्थिती आणि आजची शाश्वतता यातील आव्हानांवर सविस्तर प्रकाश टाकला. या सत्राचे अध्यक्ष डॉ. मनोहर कोरे होते.या परिषदेसाठी तांत्रिक सहाय्य आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रो. डॉ. अनिल काटे आणि प्रा.डॉ. संदीप देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. एस. डी. शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. निलेश कांबळे यांनी मानले. या ऑनलाईन परिषदेत देशातील विविध भागांतून प्राध्यापक आणि संशोधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 अखिल भारतीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत इशिता रेवालेची सुवर्ण कामगिरी

अखिल भारतीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत इशिता रेवालेची सुवर्ण कामगिरी मुंबई : चंदीगड येथील पंजाब यूनिवर्सिटीमध्ये १३ ते १६ मार्चदरम्यान पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत मुंबईच्या विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल मधील जिम्नॅस्ट इशिता रेवाले…

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धा

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धा खालसाचे तायक्वांडोपटू चमकले मुंबई : जालंधर (पंजाब) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेत किंग सर्कल येथील गुरु नानक खालसा कॉलेजच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना तीन कास्य पदकांची कमाई केली.  या अ.भा. आंतरविद्यापीठ स्पर्धेत देशभरातील २३४ विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता, तर एक हजारपेक्षा जास्त खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. खालसा कॉलेजच्या आर्यन येवलेने‌ ६८ किलो वजनी गटात, तर ८० किलो खालील वजनी गटात निहाल भोईरने आणि ओम कदमने आपली छाप पाडताना कांस्य पदके मिळवली. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या सामन्यांमध्ये यांना निसटता पराभव पत्कारावा लागला. अन्यथा त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश पक्का होता. या तिघांना प्रशिक्षक राजेश मुरव यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रत्ना शर्मा यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे खास  अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका जसवीर कौर यांनी देखील खेळाडूंच्या या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.