नवी मुंबई – स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या सुपरस्वच्छ लिगमध्ये समाविष्ट शहर म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई शहरातील दैनंदिन स्वच्छतेकडे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विशेष लक्ष पुरविण्यात येत आहे. यादृष्टीने शहरातील सार्वजनिक जागा, वर्दळीची ठिकाणे येथे सातत्याने विशेष स्वच्छता मोहीमांचे आयोजन करण्यात येत असते.
वर्दळीच्या जागांमध्ये नवी मुंबईतील रेल्वे स्टेशन व परिसर हा अत्यंत महत्वाचा भाग असून तेथील स्वच्छता सिडको प्राधिकरणामार्फत पाहिली जाते. तथापि त्याठिकाणी गुणवत्तापूर्ण स्वच्छता राखली जात नसल्याने नवी मुंबई शहराच्या स्वच्छता मानांकनावर दृश्य परिणाम होत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने  रेल्वे स्टेशन व परिसर स्वच्छतेच्या मोहीमा राबविण्यात येत असतात.
अशाचप्रकारे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ ते १२ जून या कालावधीत नवी मुंबईत ठिकठिकाणी राबविण्यात येणा-या विशेष स्वच्छता मोहीमांतर्गत ६ व ७ जून रोजी तुर्भे रेल्वे स्टेशन, घणसोली रेल्वे स्टेशन, वाशी रेल्वे स्टेशन, नेरुळ रेल्वे स्टेशन, दिघा रेल्वे स्टेशन, रबाळे रेल्वे स्टेशन आणि दोन्ही बाजुच्या परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त  सुनिल पवार यांच्या नियंत्रणानुसार, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या माध्यमातून संबधित स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्यासह १२५ हून अधिक स्वच्छताकर्मीसह रेल्वे स्टेशनवरील सखोस स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या. यामध्ये १.५ टन कचरा गोळा करुन तो तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला.दररोज हजारो प्रवासी नवी मुंबईतील रेल्वे स्टेशन्सवरुन प्रवास करत असल्याने रेल्वे स्टेशनची स्वच्छता हा महत्वाचा मुद्दा असल्याचे लक्षात घेत, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ११ रेल्वे स्टेशनवरील स्वच्छता कामे नवी मुंबई महानगरपालिकेकडे सोपविण्यासाठी महानगरपालिकेमार्फत सिडकोला पत्र पाठविण्यात आले आहे. तोपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत स्वच्छ शहराचा नावलौकिक अबाधीत राखण्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार रेल्वे स्टेशन स्वच्छता मोहीमा नियमितपणे राबविण्यात येणार आहेत.
0000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *