मुंबई, दि. : सर्वाधिक काजू उत्पादन कोकणात असताना काजू बाजारपेठ मात्र पश्चिम महाराष्ट्रात, सागर किनाऱ्याच्या सानिध्यामुळे सर्वाधिक मासेमारी होत असताना मत्स्य विद्यापीठ मात्र नागपूरला दुसरीकडे प्रदूषणामुळे इटलीने बंद केलेली रसायन कंपनी मात्र कोकणात आणि आता एकाचवेळी तीन अणुभट्ट्या उभारण्याची घोषणा… कोकण जणू वसाहतीचा प्रदेश आहे, असेच सरकारचे धोरण असून या पार्श्वभूमीवर कोकणी जनतेची भूमिका ठरविण्यासाठी जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्ष, कोकण जनविकास समिती आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांच्या वतीने शनिवारी १३ जून रोजी कोकणची कैफियत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृहात सायंकाळी पाच ते आठ या वेळेत हा परिसंवाद होणार आहे. राज्य सरकारने अलीकडेच काजू बाजार उभारण्याचा निर्णय घेतला असून यासाठी चंदगड तालुक्यात ४० एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. वास्तवात काजूची लागवड आणि उत्पादन सिंधुदुर्ग वर रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे ही बाजारपेठ, काजू निर्यात केंद्र, गोदाम, सेंटर ऑफ एक्सलन्स व अन्य सुविधा कोकणातच व्हाव्यात अशी जनतेची मागणी आहे. सागर किनारा नजीक असल्यामुळे कोकणातच मोठ्या प्रमाणावर मासेमारी होत असताना मत्स्य  विद्यान विद्यापीठ मात्र ८०० किलोमीटर दूर नागपूर येथे सुरू करण्यात आले आहे.
दुसरीकडे स्वस्त आणि स्वच्छ सौर ऊर्जेमुळे सगळे जग अणु आणि औष्णिक ऊर्जेकडे पाठ फिरवत असताना नुकतेच राज्य सरकारने कोकणातील देवगड, आदी तीन ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी जैतापूर येथेही अणुऊर्जा प्रकल्पाची घोषणा झाली होती व तो प्रश्न प्रलंबित आहे. या प्रकल्पाला कोकणातील जनतेने प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची कल्पना सरकारने मागे घ्यावी व त्याऐवजी सौर ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य द्यावे. सौर ऊर्जा प्रकल्प लवकर पूर्ण होतील व त्यातून निर्माण होणाऱ्या विजेचा दरही प्रति युनिट अडीच ते साडेतीन रुपये (२४ तास पडणार आहे) तुलनेने अणुऊर्जा प्रकल्प आज पूर्ण झाला तरी त्याचा प्रति युनिट दर दहा ते बारा रुपये पडून ही  महागडी वीज कोण विकत घेणार, असा प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे. या विषयावर अणूऊर्जा अभ्यासक आणि ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते डॉ. मंगेश सावंत मार्गदर्शन करणार आहेत.
असाच प्रकार “फी पास” या कधीही नष्ट न होणाऱ्या अत्यंत विषारी रसायनांचे उत्पादन करणाऱ्या आणि त्यामुळे इटलीने बंद केलेल्या प्रकल्पाला कोकणात लोटे येथे परवानगी देऊन करण्यात आला आहे. घातक अशी ही रसायने गंभीर आजारांना कारणीभूत ठरत असल्यामुळे इटलीने त्यावर बंदी घातली होती. पण तीच फॅक्टरी लोटे येथे सुरू करण्यात आली आहे. त्या निर्णयाच्या विरोधात खुद्द इटलीतील महिलाही भारतातील महिलांसाठी निदर्शने करीत आहेत. ही कंपनी बंद करण्याचा ठराव परिसंवादात केला जाणार आहे. याविषयी केमिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक असलेले प्रा. सुरेश रानडे बोलतील.
याचबरोबर जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रभाकर नारकर आणि ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते प्रकाश लव्हेकर परिसंवादात आपले विचार मांडतील, अशी माहिती कोकण जनविकास समितीचे सुरेश रासम, जगदीश नलावडे तसेच मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे दिनेश राणे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *