ठाणे: नालेसफाईच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही प्रत्येक पावसाळ्यात शहरात पाणी तुंबणे आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरणे, ही प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराची साक्ष आहे, असे मत ठाणे काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी व्यक्त केले. नालेसफाईच्या ठेकेदारांची मुजोरी आणि ठाणे महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाची झळ कळवा येथील साईनाथ नगर, शनी मंदिर परिसरातील नागरिकांना बसली. घरात पाणी शिरल्यानंतर नाल्यातील गाळ काढण्यासाठी महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेला पाचारण करावे लागल्याने काँग्रेसने प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करून नाले सुरळीत प्रवाहित ठेवणे ही संबंधित ठेकेदाराची करारानुसार जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात हे काम वेळेत न झाल्याने मुसळधार पावसात नाल्यांमध्ये गाळ साचला आणि त्याचा फटका नागरिकांना बसला. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
धक्कादायक म्हणजे, नागरिकांच्या तक्रारीनंतर नाल्यातील गाळ काढण्यासाठी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. संबंधित ठेकेदाराने “आज रविवार असल्याने आम्हाला सुट्टी आहे,” अशी भूमिका घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची नालेसफाईची बिले ठेकेदारांनी घ्यायची आणि प्रत्यक्ष काम मात्र महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेकडून करून घ्यायचे का, असा संतप्त सवाल काँगेस शहर जिल्हा अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदारांची बिले रोखावीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसने दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *