ठाणे- कच्छ समाजाचे नवीन वर्ष म्हणून साजऱ्या होणाऱ्या आषाढी बीज निमित्त कच्छ समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या कच्छ अस्मिता मंचातर्फे यंदाचा ‘कच्छ पागडी कोणा शिरे?’ हा सन्मान सोहळा बुधवार, १५ जुलैला सायंकाळी ७.३० वाजता राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत सुरेश गडा यांनी दिली.
हेमराज शहा यांनी १९८० पासून महाराष्ट्रासह देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कच्छ समाजातील व्यक्तींना ‘कच्छशक्ती पुरस्कार’ देण्याची परंपरा सुरू केली. त्या प्रेरणेने कच्छ अस्मिता मंचाचे अध्यक्ष सुरश गडा यांनी सन २००६ मध्ये कच्छ अस्मिता मंचाची स्थापना करून कच्छ वागड समाजातील विविध क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या ठाण्यातील व्यक्तींचा ‘कच्छ पागडी’ देऊन गौरव करण्याचा उपक्रम सुरू केला.
गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ या उपक्रमाद्वारे शिक्षण, विज्ञान, उद्योग-व्यवसाय, समाजसेवा तसेच विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ८५ गुणवंत व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आहे. या सन्मानामुळे समाजातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढण्याबरोबरच समाजहिताची प्रेरणाही मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात येते. या उपक्रमाला कच्छ समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून दरवर्षी ‘यंदाची कच्छ पागडी कोणाला?’ याबाबत समाजात विशेष उत्सुकता निर्माण होते. यंदाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तसेच ठाण्याचे खासदार, आमदार, महापौर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते निवडक मान्यवरांचा ‘कच्छ पागडी’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *