Month: July 2026

कलातपस्वी पुरस्कारासाठी कलाशिक्षकांना प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

कल्याण : महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ संलग्नीत ठाणे जिल्हा कलाध्यापक संघ आणि ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठाणे जिल्ह्यातील गुणवंत कलाशिक्षकांना प्रतिष्ठित ‘कलातपस्वी…

 राज्य सरकार वीरपत्नी, वीरमाता आणि वीर सैनिकांच्या परिवारासोबत सदैव ठामपणे उभे – सुनेत्रा पवार

 कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक व वीरसैनिकांच्या वीरपत्नींच्या कृतज्ञता सन्मान सोहळा पार… मुंबई : राज्यसरकार वीरसैनिक कल्याण मंडळाच्या माध्यमातून वीरपत्नी, वीरमाता आणि वीरसैनिकांच्या परिवारासोबत सदैव ठामपणे उभे आहे अशा भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि पराक्रमाचा महान वारसा लाभलेला आहे. देशसेवा आणि कर्तव्यपालनासाठी महाराष्ट्र नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. कारगिल युद्धातही राज्यातील अनेक जवानांनी शौर्य, त्याग आणि बलिदानाचे अमूल्य योगदान दिले आहे असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या. महाराष्ट्र शासन आणि स्वरनिनाद फाऊंडेशन यांच्या समन्वयाने आयोजित कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक व वीरसैनिकांच्या वीरपत्नींच्या कृतज्ञता सन्मान सोहळा लोकभवन, मुंबई येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा  आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या प्रसंगी कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच वीरसैनिकांच्या वीरपत्नींचा आणि वीरमातांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, व्हाइस अॅडमिरल संजय वात्सम, लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांच्यासह वीर सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, भारतीय सैनिक आदी प्रमुख उपस्थित होते.

– भूसंपादन प्रक्रियेबाबतचे सर्व आरोप पूर्णपणे तथ्यहीन

 अलिबाग उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केला वस्तुनिष्ठ खुलासा अशोक गायकवाड रायगड-लिबाग : मौजे शहापूर (ता. अलिबाग) येथील जमीन संपादन प्रक्रियेवरून काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या घोटाळा व गैरव्यवहाराच्या बातम्यांचे अलिबागचे उपविभागीय…

 शहरातील सारे रस्ते खड्ड्यात!

दुचाकींसह वाहनांचा खुळखुळा, मनपाकडे दुरुस्तीची तातडीने मागणी हरिभाऊ लाखे नाशिक : सततच्या पावसामुळे शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनधारक त्रस्त झाले आहेत. नाशिकरोड येथील जेल रोड परिसर आणि सिडको, अंबड लिंक रोड भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळे अपघात वाढले असून दुचाकीस्वारांचे आरोग्य आणि वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी, अशी उद्विग्न मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. जेल रोड परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महापालिका आयुक्तांनी काही दिवसांपूर्वीच जेल रोड – नाशिकरोड परिसराची पाहणी करून कंत्राटदारांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही परिस्थिती जैसे थे असून दुरवस्था कायम आहे. बिटको चौक ते नांदूर नाका या प्रमुख मार्गावर दररोज २५ ते ३० हजार विद्यार्थी, कामगार आणि नागरिक ये-जा करतात. हा मार्ग पुणे आणि छत्रपती संभाजीनगर महामार्गांना जोडलेला असल्याने येथे अवजड वाहनांचीही मोठी वर्दळ असते. या मार्गावरील खड्ड्यांमुळे दुचाकींचा पार खुळखुळा झाला आहे. दुसरीकडे सिडको परिसरातील जुने सिडको, बडदेनगर ते पाटीलनगर, शिवशक्ती चौक, गोविंदनगर, अश्विननगर, पाथर्डी फाटा, कर्मयोगीनगर, सदाशिवनगर, अंबड लिंक रोड आणि प्रभाग क्रमांक २६ मधील रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले आहेत. पावसाळ्यात किमान कोल्डमिक्स किंवा योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून तात्पुरते खड्डे बुजवावेत आणि पावसाळ्यानंतर रस्त्यांची दर्जेदार कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करताना माजी गटनेते अशोक सातभाई यांनी म्हटले आहे की, कुंभमेळ्याच्या नावाखाली सर्व शहर बकाल करून टाकले आहे. नवीन नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने काम कोणाकडून करून घ्यावे हेच समजत नाही, ज्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीला मनपा प्रशासनही तितकेच जबाबदार आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधींनी या समस्येची दखल घेतली आहे. प्रभाग २४ च्या नगरसेविका पल्लवी गणोरे यांनी मनपा बांधकाम विभागाला खड्ड्यांची माहिती दिली असून लवकरच खड्डे बुजवले जातील, असे आश्वासन दिले आहे. तसेच प्रभाग २६ चे नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार आणि पादचारी जखमी होत असल्याच्या घटनेची दखल घेत, मनपा अधिकाऱ्यांसोबत लवकरच प्रत्यक्ष पाहणी दौरा करणार असल्याचे सांगितले आहे.

ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे यांचा पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते गौरव

मुंबई, प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नासिकेत पानसरे यांचा पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. भांडुप येथे…

महाविद्यालयांमध्ये अवयवदान फेस्टिव्हल भरविण्याची गरज

– तरुण पिढीतून उभी राहू शकते जीवनदानाची चळवळ रमेश औताडे मुंबई : देशात दरवर्षी हजारो रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत मृत्यूशी झुंज देत असतात. दुसरीकडे, अवयवदानाबाबत जागरूकतेचा अभाव असल्याने अनेकांना वेळेवर जीवनदान मिळत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये दरवर्षी “अवयवदान फेस्टिव्हल” आयोजित करण्याची गरज आहे असे आवाहन पर्यावरण रक्षक समितीचे अध्यक्ष किसन कदम यांनी केले. आजची तरुणाई ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. समाजात नवीन विचार रुजविण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असते. त्यामुळे अवयवदानाचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी महाविद्यालयांपेक्षा प्रभावी व्यासपीठ दुसरे असू शकत नाही. अवयवदान फेस्टिव्हलमध्ये अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञांची व्याख्याने, प्रत्यारोपणानंतर नवजीवन मिळालेल्या रुग्णांचे अनुभव, अवयवदान केलेल्या कुटुंबांचा सत्कार, चित्रकला, घोषवाक्य, निबंध, रील व लघुपट स्पर्धा, रॅली, पथनाट्य आणि अवयवदान प्रतिज्ञा अभियान असे विविध उपक्रम आयोजित करता येतील. इच्छुक विद्यार्थ्यांना अवयवदानाबाबत वैज्ञानिक माहिती देऊन त्यांची नोंदणीही करता येईल. अवयवदानाबाबत समाजात अजूनही भीती आणि गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी तरुणांना योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे. महाविद्यालयातून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी अवयवदानाचा जागरूक दूत बनला, तर ही चळवळ काही वर्षांत जनआंदोलन बनू शकते. राज्य शासन, आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि विद्यापीठांनी संयुक्तपणे दरवर्षी ‘राष्ट्रीय अवयवदान फेस्टिव्हल’ आयोजित करण्याचा विचार करावा. यामुळे लाखो युवक-युवती अवयवदानाचा संकल्प करतील आणि भविष्यात हजारो रुग्णांना नवजीवन मिळू शकेल. “कॉलेजचा एक उत्सव केवळ मनोरंजनासाठी नसावा; तो समाजाला नवजीवन देणारा असावा. प्रत्येक महाविद्यालयातून अवयवदानाचा संदेश घरोघरी पोहोचला, तर अनेकांच्या जीवनात आशेचा नवा सूर्योदय होईल.” 0000

– ११० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप

ठाणे – श्रीमती गुजना हिंदी/इंग्रजी हायस्कूल आझादनगर, चितळसर मानपाडा, ठाणे या शाळेच्या ११० गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. ‘महेश बंशीधर अग्रवाल फाऊंडेशन’ आणि ‘राजरानी फाऊंडेशन’ या दोन प्रसिद्ध…

 महाराष्ट्रातील बळींची संख्या पाच कामाचा अती ताण, वरिष्ठांचा दबाव

यवतमाळमध्ये ‘बीएलओ’ चा मृत्यू! यमदूताचा सरकार … ‘ पीएचडी स्कॉलर ‘ विधवेचे शोक संतप्त उदगार ∆ दिवाकर शेजवळ मुंबई ( २७ जुलै २०२६) – मतदार याद्यांच्या सखोल तपासणीच्या अती ताणामुळे शुगर प्रमाणाबाहेर वाढल्याने डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेल्या यवतमाळ येथील एका बूथ लेव्हल ऑफिसर ( बीएलओ) चा शनिवारी हृदय विकाराच्या लागोपाठ आलेल्या दोन धक्क्यांनी मृत्यू ओढवला आहे. त्या बी एल ओ चे नाव सिद्धार्थ धनपाल धम्मप्रिय ( ५० वर्षे) असे असून ते ग्रामविकास खात्यात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. मधुमेही असलेले सिद्धार्थ धम्मप्रिय यांची शुगर कामाचा अती ताण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे ४२० च्या पार गेली होती. तसेच त्यांचा रक्तदाबही कमालीचा खालावला होता. त्यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्याचवेळी सोपवलेले मतदार याद्यांच्या सखोल तपासणीचे ९० टक्के काम पूर्ण झालेच पाहिजे, असे तालका उप शिक्षण अधिकारी एस. ए . काटकर यांनी त्यांना शनिवारी बजावले होते. तसेच सोमवारी जिल्हाधिकाऱ्यासमोर हजर व्हावे, असे आदेश दिले होते. मात्र शनिवारीच संध्याकाळी ७.३० वाजेनंतर सिद्धार्थ धम्मप्रिय यांना हृदय विकाराचे दोन तीव्र धक्के लागोपाठ बसले. त्यात त्यांचा बळी गेला, असे त्यांच्या पत्नी पल्लवी धम्मप्रिय यांनी यवतमाळ येथून फोनवरून बोलताना सांगितले. प्रमाणाबाहेर वाढणारी शुगर आणि खालावणारा रक्तदाब यामुळे माझ्या पतीला मतदार याद्यांच्या सखोल तपासणीचे काम करणे मुश्किल बनले होते. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांना विश्रांती मिळण्यासाठी त्यांचे काम दोन आठवडे पायपीट करून मी स्वतः पार पाडले, अशी धक्कादायक माहिती त्यांनी यावेळी दिली. परराज्यांत स्थलांतरित मतदारांना ‘ बीएलओ ‘ नी गाठायचे कसे ? माझे पती सिद्धार्थ धम्मप्रिय यांच्याकडे  कोळशाच्या दोन खाणी असलेले वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड या कंपनीचे वणी तालुक्यातील राजूर कॉलरी हे क्षेत्र मतदारांच्या तपासणी साठी देण्यात आले होते. तिथले बहुतांश खाण कामगार हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छतिसगड या राज्यांतील आहेत. ते आपापल्या राज्यांत काही काळासाठी निघून जात असतात, असे सांगतानाच स्थलांतरित मतदारांना बी.एल. ओ . यांनी गाठायचे कसे, असा सवाल पल्लवी धम्मप्रिय यांनी विचारला आहे. माझ्यावर वैधव्य लादले ! वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड कंपनीच्या क्षेत्रातील ७२१ मतदारांपैकी ४५० पर्यंत मतदार हे परराज्यांतील आहेत, असे सांगून पल्लवी धम्मप्रिय म्हणाल्या की, त्यातील ३०० मतदारांना  शोधून काढण्यात माझे पती आणि मला यश आले. त्यातून मतदार तपासणीचे काम ५५ टक्क्यापर्यंत जावू शकले आहे. पण मतदारांची अनुपलब्धता लक्षात न घेता ९० टक्के काम पूर्ण करण्यासाठी लकडा लावून शिक्षण अधिकाऱ्याने माझ्या मधुमेही पतीवर प्रचंड दबाव आणला होता. अखेर त्यात त्यांचा बळी जावून माझ्यावर वैधव्य लादण्यात आले. राज्यातील आतापर्यंतचे मृत्यू यवतमाळ येथील बी. एल.ओ. सिद्धार्थ धनपाल धम्मप्रिय यांच्या अकाली मृत्यूमुळे  मतदार याद्यांच्या सखोल तपासणीच्या कामात अती ताणामुळे महाराष्ट्रात बळी गेलेल्यांची संख्या आता ५ झाली आहे. १) १३ एप्रिल २०२६ : पुण्यात बी. एल.ओ. प्रा. ज्ञानेश्वर रोटे ( ४० ) यांचा  मोटार सायकल वरून जाताना ऑन ड्युटी अपघाती मृत्यू २) २८ जून २०२६ : अहिल्यानगर, पाथर्डी येथे बी. एल. ओ. सुनिता पोपळघट या शिक्षिकेचा हृदय विकाराने मृत्यू ३) २३ जुलै २०२६ : पनवेल येथे बी. एल. ओ. कैलास भोयर या चेंबूरच्या महापालिका शाळेतील शिक्षकाचा हृदय विकाराने मृत्यू ४) बी.एल.ओ. शिक्षक स्वामी परभणी. ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ कोट लोकशाहीत लोकांनी, लोकांसाठी, लोकांचे निवडून दिलेले सरकार हे जनतेच्या रक्षणासाठी, कल्याणासाठी असले पाहिजे अशीच अपेक्षा असते. पण नोटबंदीत लोकांचे बळी,कोरोनाच्या लॉक डाऊन मध्ये लोकांचे बळी आणि आता मतदार याद्यांच्या तपासणीत सुद्धा बी. एल. ओ. चे बळी जात आहे. हे सरकार यमदुताचे सरकार आहे काय? ∆पल्लवी धम्मप्रिय पीएचडी स्कॉलर मयत बी.एल.ओ. सिद्धार्थ धम्मप्रिय यांची पत्नी

काशिमिरा पोलिसांची अमली पदार्थांचे व्यसन आणि सायबर गुन्हेगारीविरोधात मोठी मोहीम

मिरा – भाईंदर: पोलीस आणि सत्य फाऊंडेशनने मिरा -भाईंदर येथील काशिमिरा येथे अमली पदार्थ विरोधी आणि सायबर गुन्हेगारी जनजागृती मोहीम आयोजित केली. पोलिसांनी तरुणांना अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे, पालकांचा पाठिंबा घेण्याचे आवाहन केले आणि सायबर फसवणूक रोखण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजनांची रूपरेषा सांगितली. काशिमिरा पोलिसांनी अमली पदार्थांचे व्यसन आणि सायबर गुन्हेगारीविरोधात एक मोठी मोहीम सुरू करून जनतेमध्ये जनजागृती केली. काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, काशिमिरा पोलीस ठाणे आणि सत्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत, काशिमिरा येथील मुळशी कंपाऊंडमध्ये अमली पदार्थ विरोधी आणि सायबर गुन्हेगारी जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली. या मोहिमेत मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, तरुण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आणि पाठिंबा दिला. कार्यक्रमादरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी तरुणांना अमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांविषयी सविस्तर माहिती दिली आणि त्यांना अमली पदार्थांपासून दूर राहण्यास प्रोत्साहित केले. पालकांनाही आवाहन करण्यात आले की, जर त्यांना त्यांच्या मुलांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाचा संशय असेल किंवा काही तक्रारी असतील, तर त्यांनी कोणत्याही भीती किंवा संकोचाशिवाय पोलिसांशी संपर्क साधावा. पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की, तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल आणि संबंधित मुलांना योग्य मार्गदर्शन व आवश्यक मदत पुरवली जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, समाज आणि पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच अमली पदार्थांच्या व्यसनाच्या गंभीर समस्येवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येऊ शकते. या प्रसंगी सायबर गुन्ह्यांबद्दलही जनजागृती करण्यात आली. अधिकाऱ्यांनी ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक्स, ओटीपी फसवणूक, डिजिटल पेमेंट फसवणूक आणि सोशल मीडियाद्वारे होणारे सायबर गुन्हे रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी यावर जोर दिला की, जर कोणी सायबर फसवणुकीचा बळी ठरले, तर घाबरून जाण्याऐवजी त्यांनी तात्काळ पोलीस आणि संबंधित सायबर हेल्पलाइनशी संपर्क साधावा, जेणेकरून वेळेवर कारवाई करता येईल. या कार्यक्रमाला स्थानिक रहिवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. उपस्थितांनी काशिमिरा पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यात असे जनजागृती कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची विनंती केली. पोलिसांचे म्हणणे आहे की, अमली पदार्थांचे व्यसन आणि सायबर गुन्हेगारीविरुद्ध जनजागृती हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे आणि या उद्देशाने अशा मोहिमा सुरूच राहतील. 0000

दिव्यातील खड्ड्यांविरोधात मनसेचे ‘खड्ड्यांची शांती’ आंदोलन

 ३० जुलैला नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन दिवा: दिवा शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. “खड्ड्यांची शांती” या आंदोलनाचे आयोजन गुरुवार, ३० जुलै, सकाळी ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, दिवा (पूर्व) येथे करण्यात येणार आहे. मनसेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवा शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनसेने केली आहे. या पार्श्वभूमीवर खड्ड्यांनाच विनंती करून नागरिकांना होणारा त्रास थांबवण्याचा प्रतीकात्मक संदेश देण्यासाठी “खड्ड्यांची शांती” आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात दिवा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी अधिक तीव्र करावी, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले आहे.