मिरा -भाईंदर: पर्यावरणवादी, विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी पर्यावरणीय गुन्ह्यांच्या निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीच्या मागणीसाठी मिरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाबाहेर नुकतच शांततापूर्ण आंदोलन केले. आंदोलनानंतर, शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना एक निवेदन सादर केले, ज्यात पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ अंतर्गत नोंदवलेल्या प्रकरणांच्या तपासात कथित अनियमिततेची तक्रार करण्यात आली आहे. या निवेदनात भाईंदर पोलीस ठाणे आणि नवघर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, मुख्य आरोपीला पाठीशी घालणे, सदोष आरोपपत्र दाखल करणे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करणे असे आरोप करण्यात आले आहेत.
पर्यावरणीय मंजुरीशिवाय कामांना मंजुरी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणीही शिष्टमंडळाने केली. तपासाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी, शिष्टमंडळाने २००५ ते २०२६ दरम्यान पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत नोंदवलेल्या २०० हून अधिक प्रकरणांचे स्वतंत्र विशेष लेखापरीक्षण करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, बहुतांश प्रकरणांमध्ये शिक्षेच्या अभावामुळे पर्यावरण गुन्हेगारांच्या मनातील कायद्याची भीती नाहीशी होत आहे.
