राज्यस्तरीय पंच व तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
डिजिटल स्कोअरिंगपासून ऑडिओ-व्हिज्युअल प्रशिक्षणापर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
कराड, ता. २६ : खो-खो आता केवळ मैदानावर वेगाने धावणारा खेळ राहिलेला नाही; पंचगिरीपासून स्कोअरिंगपर्यंत संपूर्ण व्यवस्थेलाच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. कराडमध्ये झालेल्या राज्यस्तरीय पंच व तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण शिबिरातून महाराष्ट्राच्या खो-खोला अधिक अचूक पंचगिरी, डिजिटल स्कोअरिंग आणि आधुनिक तांत्रिक व्यवस्थेचा नवा अध्याय मिळाला आहे. नियमांच्या बारकाव्यांपासून निर्णयक्षमतेपर्यंत झालेल्या या प्रशिक्षणामुळे राज्यातील पंचगिरीला नवी धार मिळणार आहे.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, द ॲमॅच्युअर खो-खो असोसिएशन (सांगली) आणि सद्गुरू गाडगे महाराज (एसजीएम) कॉलेज, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने हे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. एसजीएम कॉलेजच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील सभागृहात झालेल्या समारोप सोहळ्याने शिबिराची सांगता झाली. राज्यभरातून सहभागी झालेल्या पंचांना आधुनिक नियम, तांत्रिक बाबी आणि सामन्यातील निर्णयप्रक्रियेचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे पीपीटी आणि ऑडिओ-व्हिज्युअल प्रेझेंटेशनसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर. सामन्यातील गुंतागुंतीचे प्रसंग प्रत्यक्ष दृश्यांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आल्याने पंचांना अचूक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान अधिक प्रभावीपणे मिळाले. त्यामुळे पंचगिरीत अचूकता, सातत्य आणि निर्णयक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
समारोपावेळी एसजीएम कॉलेजच्या शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विद्या पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी खो-खोच्या इतिहासाचा आढावा घेत अशा प्रशिक्षणामुळे पंचांची निर्णयक्षमता अधिक अचूक व दर्जेदार होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड. रविंद्र (भाऊ) पवार यांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला खो-खो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने पोहोचत असल्याचे सांगितले. संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी खो-खोच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी संघटनेच्या आधुनिक उपक्रमांची माहिती दिली. गुणलेखन अर्थात स्कोअरिंग डिजिटल व ऑनलाइन पद्धतीकडे नेण्याची प्रक्रिया सुरू असून, सामन्यांची नोंद, गुणपत्रिका आणि निकाल अधिक वेगवान व अचूक करण्यावर भर दिला जात आहे.
एसजीएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. जे. खिलारे यांनी सहभागी पंचांच्या उत्साहाचे कौतुक केले. विशेष म्हणजे संपूर्ण प्रशिक्षण शिबिराचे युट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षणाचा आवाका प्रत्यक्ष सहभागी पंचांपलीकडे खो-खोच्या व्यापक क्षेत्रापर्यंत पोहोचला.
यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. गोविंद शर्मा, सांगली असोसिएशनचे अध्यक्ष गौरव नायकवडी, उपाध्यक्ष अर्जुन माने आणि कार्याध्यक्ष डॉ. समीर शेख उपस्थित होते. सहभागी पंचांसाठी एसजीएम कॉलेजतर्फे उत्कृष्ट भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. सूत्रसंचालन प्रा. सचिन चव्हाण यांनी केले, तर डॉ. प्रशांत इनामदार यांनी आभार मानले.
कराडचे हे शिबिर केवळ पंचांचे प्रशिक्षण ठरले नाही, तर महाराष्ट्राच्या खो-खोला आधुनिक, अचूक आणि तंत्रस्नेही बनविणाऱ्या नव्या पर्वाची सुरुवात ठरले. खेळाडूंच्या गुणवत्तेसोबत पंचगिरी, डिजिटल स्कोअरिंग आणि तांत्रिक व्यवस्थाही सक्षम झाली, तर महाराष्ट्राचा खो-खो देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अधिक भक्कमपणे झेप घेईल.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *