५,५५,५०० रुपयांची बक्षिसे, अभिनेत्री सायली संजीव आणि महेंद्रशेठ यांच्या उपस्थितीने गोविंदा पथक सुखावले
उलवे, ता. ६ :शेलघर येथील यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे दहीहंडी उत्सव दणक्यात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, सचिव शुभांगीताई घरत यावेळी जातीने हजर होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री सायली संजीव यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. गोविंदा पथकांच्या उत्साहाला रिमझिम पावसाच्या सरींनी साथ दिली, त्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला. थरांथर रचताना गोविंदा पथकांची चिकाटी आणि एकी दृष्ट लागण्याजोगी होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उरण, पनवेल आदी ठिकाणांहून सुमारे ६० गोविंदा पथकांनी सलामी दिली. कुणी चार थर, कुणी पाच, सहा, सात, आठ थरांपर्यंत मजल मारली. भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविला, तर दहीहंडी उत्सवात महिलांच्या गोविंदा पथकांची सलामी वाखाणण्याजोगी होती. सोबत शिवमुद्रा डान्स अकॅडमी पपण पाटील यांच्या नृत्याचा आविष्कार होता. अनेक नृत्यांगणांनी गोविंदा पथकांना आणि रसिकांना खिळवून ठेवले.
पहिला क्रमांक राघोबा देव गोविंदा पथक कोटनाका, उरण; द्वितीय क्रमांक जरीमरी आई गोविंदा पथक, पिरकोन आणि आम्ही तुर्भेकर गोविंदा पथक, तुर्भे यांनी तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली. यावेळी सायली संजीव म्हणाल्या, “सर्व गोविंदा पथकांचे अभिनंदन आणि कौतुक करते, गोविंदा पथकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. महेंद्रशेठ घरत यांच्यासारखे दिलदार नेतृत्व या परिसराला लाभले आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. शुभांगीताई आणि महेंद्रशेठ घरत हे अनोखे दाम्पत्य आहे. त्यांची सामाजिक बांधिलकी वाखाणण्याजोगी आहे. आईच्या नावाने संस्था सुरू करून सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण पेरण्याची त्यांची भूमिका कौतुकास्पद आहे.”
यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “यमुना सामाजिक संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. दहिहंडी हा त्याचाच भाग आहे, आपण संस्कृती जपण्यासाठी आणि टिकविण्यासाठी प्रयत्न करतोय; परंतु उत्सव साजरा करीत असताना कुणालाही दुखापत होऊ नये, याची काळजी घ्या. मी सदैव कलेला प्रोत्साहन देणारा आणि सन्मान करणारा आहे. कायमच सर्वसामान्यांच्या पाठीशी आहे.”
यावर्षी दहीहंडीसाठी ५ लाख ५५ हजार ५०० रुपये रोख बक्षीस आणि चषक ठेवण्यात आले होते. सायंकाळी ५ वाजता ढोल-ताशांच्या गजरात उत्सवाला सुरुवात झाली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उरण येथील प्रसिद्ध गोविंदा पथकांनी अवघ्या काही मिनिटांत पाच-सहा-सात-आठ लावले. विजेत्यांना ५,५५,५०० रुपयांची बक्षिसे देण्यात आली. दहीहंडी यशस्वी करण्यासाठी यमुना सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि एम. जी. ग्रुपच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
दरम्यान, शेलघर या गावात आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी स्वतः गावातील लहान-थोरांसोबत मिसळून दहिहंडीचा आनंद घेतला. शेलघरमधील विठ्ठल मंदिरापासून गोविंदा निघाला. परंपरागत गोविंदाचा महेंद्रशेठ घरत यांनी मनमुराद आनंद घेऊन गावातील दहिहंडी फोडली. त्यामुळे शेलघरचे ग्रामस्थही भारावून गेले.
०००००००
