वर्षा पर्यटनसाठी निसर्गरम्य स्थळांवर पर्यटकांची पावले
उरण : शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे आक्कादेवी बांधार काठोकाठ भरला आहे. त्यामुळे रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक येऊन वर्षा पर्यटनाचा आनंद घेत आहेत. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील २५ सप्टेंबर १९३०च्या चिरनेर जंगलसत्याग्रहाची साक्ष देणाऱ्या आक्कादेवीच्या माळरानावर जुलै महिन्यात पर्यटक येऊ लागले आहेत. यंदा रायगड जिल्ह्यासह इतर ठिकाणी पावसाची समाधान कारक बरसात झाली. मात्र उरण तालुक्यात अवघ्या पाच – सहा दिवसात पाऊस सक्रिय झाल्याने चिरनेर येथील आक्कादेवी येथील तीन डोंगराच्या कुशीत असलेल्या धरणात पाणी साचून ओसांडून वाहू लागले आहे.
या निसर्गरम्य परिसरात पावसाळ्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. मागील आठवड्यात लोणावळा येथील धबधब्यावर आलेल्या एकाच कुटुंबातील पर्यटकांना जीव गमवावे लागले.या पार्श्वभूमीवर राज्याच्या बहुतांशी धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांना शासनाने बंदी घातली आहे.मात्र नवीमुंबई,पनवेल आणि उरण तालुक्यातील पर्यटकांना अवघ्या काही अंतरावर असलेल्या या आक्कादेवी धरणावरील धबधब्यावर आनंद लूटण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आणि येण्या – जाण्यासाठी विशेष अडचणी निर्माण होत नसल्याने या ठिकाणी पावसाळ्यात जुलै महिन्यात पर्यटक येण्याला पसंती देत आहेत.
हिरवीगार शाल पांघरलेल्या तीन दिशांच्या डोंगर रागांमध्ये रिमझिम बरसणारा पाऊस, उंचावरून फेसळत धबधब्याचे पडणारे पाणी अंगावर झेलण्याची मजा आनंददायी ठरते. त्यामुळे येथील हे लहानसे धरण अधिक खोल नसल्याने लहान बालके,मुली यांनाही येथील रोशणाईची मजा घेण्याला कोणताच धोका नाही.याशिवाय येथे कोणत्याही प्रकारचा शुल्क द्यावा लागत नसून या ठिकाणावर मोटारसायकल तसेच रिक्षा व चारचाकी वाहनेही थेट धरणाच्या ठिकाणी पोहोचत असल्याने पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरत आहे.
