नवी मुंबई : “स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत ‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ हे अभियान नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्वच्छता उपक्रमांत लोकसहभागावर भर दिला जात आहे. या अंतर्गत ‘सखोल स्वच्छता मोहीमा’ राबविण्यात येत असून दैनंदिन स्वच्छता होत असते अशा जागांवर अधिक बारकाईने प्रभावीरित्या सखोल स्वच्छता करण्यावर भर दिला जात आहे.
अशाच प्रकारची सखोल स्वच्छता मोहीम नमुंमपा क्षेत्रातील सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांमध्ये एकाचवेळी राबविण्यात आली. आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या माध्यमातून आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील 400 हून अधिक सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांमध्ये ही सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यामध्ये विभागांचे विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त डॉ.अमोल पालवे, श्री.सागर मोरे, श्री.भरत धांडे, श्री.सुनिल काठोळे, श्री.संजय तायडे, श्री.अशोक अहिरे व उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांनी आपापल्या विभागातील स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, अधिकारी – कर्मचारी, स्वच्छताकर्मींच्या सहयोगाने व स्थानिक स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी व नागरिकांच्या सहभागातून शौचालयांची अंतर्गत स्वच्छता तसेच बाह्य परिसराची सखोल स्वच्छता केली. या विशेष सखोल स्वच्छता मोहीमेमुळे सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांचे बदललेले रूप बघून नागरिकांकडून प्रशंसा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *