नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे, जे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तथापि, काही व्यावसायिक त्यांच्या व्यवसायाची जाहिरात करण्याच्या उद्देशाने रस्त्याकडील झाडांना खिळे ठोकून जाहिराती लावतात, पोस्टर्स आणि भित्तीपत्रके चिटकवितात, तसेच झाडांवर विद्युत रोषणाई करतात. यामुळे झाडांना इजा पोहोचते, आणि त्यावर अवलंबून असलेल्या सजीवांवर देखील दुष्परिणाम होतो. तसेच, शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचून पर्यावरणाची हानी होते.
या संदर्भात, सर्व संबंधितांना जाहीर आवाहन करण्यात येते की, झाडांवर लावलेल्या जाहिराती, पोस्टर्स, भित्तीपत्रके इ. साहित्य तसेच करण्यात आलेली विद्युत रोषणाई, हे जाहीर आवाहन प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत काढून टाकावी. या कालावधीनंतर जर झाडांवर अशी जाहिरात किंवा रोषणाई आढळून आल्यास संबंधितांवर महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम 1995 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच, राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश व माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल.
वरील बाबींची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी आणि कोणत्याही अनधिकृत कृतीतून परावृत्त व्हावे अन्यथा कायदेशीर प्रक्रिया अवलंबिली जाईल आणि यासाठी महानगरपालिका कोणत्याही प्रकारच्या नुकसानास जबाबदार राहणार नाही असे उद्यान विभागाच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *