ठाणे : नौपाडा-पाचपाखाडी असो की वर्तकनगर-वागळेचा परिसर… येथील गगनचुंबी इमारतींमधील घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर केव्हाच गेल्या आहेत. त्यामुळे कापूरबावडी नाक्याच्या पलिकडे, अगदी गायमुखच्या टोकापर्यंत पसरलेल्या नव्या ठाण्याने स्वस्त घरांच्या शोधात निघालेल्या बहुसंख्यांना ‘ठाणेकर’ होऊन राहण्याची संधी दिली. मात्र घोडबंदर मार्गावरील रोजच्या वाहतूक कोंडीमुळे हे ‘ठाणेकर’ मिरविणे या मंडळींना नकोसे वाटू लागले आहे.

ठाण्यात तुलनेने स्वस्त घरांच्या खरेदीचा मार्ग हा घोडबंदरच्या दिशेनेच जातो. नौपाडा, पाचपाखाडीचे जुने ठाणे कितीही दाटीवाटीचे असले तरी येथे सहाशे फुटांच्या घरासाठीही दीड-दोन कोंटीचा आकडा मोजावा लागतो. पुर्व द्रुतगती महामार्गाच्या एका बाजूस असलेल्या वागळे, वर्तकनगरचा पट्टा गगनचुंबी इमारती आणि महागड्या घरांसाठी अधिक चर्चेत आहे. वर्तकनगर, समतानगर, शिवाईनगर या भागात नव्या इमारतींमध्ये स्वस्त घरांचा पर्याय फारसा राहीलेला नाही. याठिकाणी एखाद्या जुन्या इमारतीत घर घ्यावे लागलेच तर पार्किग आणि लिफ्टसारख्या सुविधा नसतात. त्यामुळे लोकमान्यनगर, किसननगर, यशोधननगर, फुलेनगर, सावरकरनगर यासारख्या दाटीवाटीच्या वस्त्यांमधून मोकळ्या ढाकळ्या वसाहतींच्या शोधात असलेल्या ‘ठाणेकरां’ना हल्ली घोडबंदर मार्गाचा पर्याय उपबल्ध झाला. कोलशेत, कासारवडवली, विजयनगरी, ओवळा, गायमुख या भागांत ४००-५०० चौरस फुटांची घरे ५५ ते ६५ लाखांत मिळतात. त्यामुळे ‘महागड्या’ ठाण्याऐवजी घोडबंदरमध्ये घर खरेदी करायचे आणि ‘ठाणेकर’ बनून रहायचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे इस्टेट एजंट अनिरुद्ध त्रिपाठी यांनी सांगितले. मात्र गेल्या दीड-दोन वर्षांपासून घोडबंदर भागातील सततच्या कोंडीमुळे स्वस्त घरांचा पर्याय नकोसा वाटणाऱ्यांची संख्या वाढल्याचेही त्यांनी मान्य केले. घोडबंदरची कोंडी कधी फुटणार, असा प्रश्न विचारत आपल्याकडे येणाऱ्यांची संख्या अलिकडे वाढल्याचे एका बड्या विकसकाच्या पणन व्यवस्थापकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. घोडबंदरची कोंडी अशीच राहीली तर इथले भाड्याची रक्कम कमी होईल, अशी भीती या क्षेत्रात काम करणारे सुजय तेली यांनी व्यक्त केली.

त्यापेक्षा बदलापूर काय वाईट?

ठाणे स्थानकापासून घोडबंदरच्या कोलशेत, कासरवडवली येथे रिक्षा, बस किंवा खासगी वाहनाने जाण्यासाठी एका तासापेक्षा अधिक वेळ लागत आहे. शनिवार-रविवारीही परिस्थिती वेगळी नसते. सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी सहा ते आठ या वेळेत तर भयावह परिस्थिती असते. त्यामुळे येथे राहण्यापेक्षा डोंबिवली, कल्याण, बदलापूरपर्यंत रेल्वेचा प्रवास काय वाईट, अशी प्रतिक्रिया या भागात रहाणाऱ्या बहुसंख्य प्रवाशांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडण्याचा प्रयत्न

घोडबंदर मार्गावरील सततच्या वाहतूक कोंडीमुळे तेथील भागातील तीन-चार नागरिकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थान परिसरात आले होते. परंतु मुख्यमंत्री निवासस्थानी नव्हते. शिंदे यांची भेट होत नाही तोपर्यंत तेथेच थांबण्याची भूमिका या नागरीकांनी घेतली आहे. दरम्यान, पाचपेक्षा अधिक नागरिकांनी एकत्रित येऊन आंदोलन करू नये, यासाठी पोलिसांनी शिष्टमंडळाला प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीवर तोडगा निघाला नाही, तर रास्ता रोको करण्याचा इशारा या नागरिकांनी दिला आहे.

00000

चौकट

घोडबंदरमधील नागरिकांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात ठिय्या

ठाणे : घोडबंदर भागातील वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होत नाही, तोपर्यंत त्यांच्या ठाण्यातील निवासस्थान परिसरात ठिय्या मांडण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करत नागरिकांनी आंदोलन करू नये म्हणून त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. दरम्यान, घोडबंदरमधील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा निघाला नाहीतर रास्ता रोको करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

गेल्याकाही वर्षांमध्ये घोडबंदर मार्गाची झालेली दैना, मेट्रो मार्गिकेची कामे, वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी अपुऱ्या उपाययोजना, अवजड वाहनांची घुसखोरी आणि अपघात यामुळे जिल्ह्यात घोडबंदर भाग कोंडीचे केंद्रबिंदू ठरू लागला आहे. बुधवारपाठोपाठ गुरुवारी या मार्गावर कोंडी झाली. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या कोंडीमुळे नागरिकांचे हाल झाले. कोंडीमुळे अनेक विद्यार्थी शाळेमध्ये पोहचू शकले नाही. रोंजदारीवर असलेल्या नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी जाता आले नाही. तर अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिक देखील कोंडीत अडकले होते. प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे पालक कोंडीमुळे चिंतेत होते. महिला प्रवासी अक्षरश: रडकुंडीला आल्या होत्या. तर काही प्रवासी संताप व्यक्त करत होते.

घोडबंदर भागातील वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या नागरिकांनी जस्टीस फॉर घोडबंदर रोड या नावाने चळवळ सुरू केली आहे. त्या माध्यमातून तीन ते चार नागरिक गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेण्यासाठी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थान परिसरात जमले होते. परंतु मुख्यमंत्री निवासस्थानी उपस्थित नव्हते. यामुळे त्यांची भेट होत नाही, तोपर्यंत तिथेच थांबण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. यामुळे पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला. तसेच नागरिकांनी आंदोलन करू नये म्हणून पाचपेक्षा अधिक नागरिकांनी एकत्रित जमण्यास पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. घोडबंदरमधील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा निघाला नाहीतर रास्ता रोको करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *