पुणे ते कोल्हापूर वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे स्थानकात उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत दादा पाटील.
पुणे: कुठलाही गुन्हा घडला तरी आम्ही कोणाला सोडत नाही. तात्काळ शोधून काढतो, ठोकून काढतो, जेलमध्ये टाकतो. त्यामुळे पुणे सुरक्षित राहिले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न सुरू असे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
पुण्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. आता तर दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. कोणालाही कसलीच भीती राहिली नसल्याचे दिसून आले आहे. वनराज आंदेकर खून प्रकरण त्यानंतर झालेला व्यावसायिकावरील गोळीबार, कोयत्याने वार, गटांमध्ये वाद होऊन मृत्यू अशा घटनांमुळे पुणे शहर हादरले आहे. याबाबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी गुन्हेगारांना हा थेट इशारा दिला आहे.
पुणे-हुबळी आणि पुणे- कोल्हापूर आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे स्थानकावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यानंतर माध्यमांशी ते बोलत होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठीच्या तीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ही अतिशय उत्तम आणि अत्याधुनिक सुविधा असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन आहे. महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा सुखकर प्रवासासाठी फायदा होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. धनगर आरक्षण संदर्भात काल बैठक झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करून रोड मॅप बनवला आहे. मी दुसऱ्या बैठकीत असल्याने त्या बैठकीला नव्हतो. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या दिशेने पुढे चाललो आहोत.

