मुंबई: काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे की त्यांनी राज्यघटना जपली आहे. भाजप पक्ष हा जनहितविरोधी आहे. भाजप पक्ष घाबरलेला असून राहुल गांधीची लोकप्रियता कमी व्हावी त्यासाठी त्यांची बदनामी करण्यात येत आहे, असे वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
मीरा-भाईंदर शहरांमध्ये प्रथमच काँग्रेस पक्षातर्फे कोकण विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला काँग्रेसचे राज्य निरीक्षक, राज्यस्तरावरील प्रमुख नेते, कोकण विभागातील काँग्रेसच्या १८ जिल्ह्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पटोले म्हणाले, काँग्रेस पक्ष हा आपली विरोधी पक्षाची भूमिका योग्य रीतीने पार पाडत आहे. तसेच राहुल गांधी यांचा भारत दौरा हा यशस्वी झाला. लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढल्याने त्यांना बदनाम करण्यासाठी भाजप पक्ष हा डावपेच खेळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला गेला तर खूप एवढे प्रश्न आहेत की ज्याच्यापासून जनता निराश आहे, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना आपला रक्ताने लिहिलेले पत्रही देण्यात आले की आमच्या हाल अपेष्टा काय आहेत? आपला अन्नदाता त्याच्या रक्ताने भावना मांडतोय तर त्यांना सत्ताधारी विरोध करत आहेत. महागाई वाढली आहे, त्याबाबत सत्ताधारी काहीच बोलत नाही तसेच थोडेसे पैसे द्यायचे आणि बाकीच्या वेळी बहिणींना लुटायचे काम हे सत्ताधारी पक्ष करत आहेत.
…तर जेलभरो आंदोलन
सत्ताधारी भाजप पक्षाचे आमदार खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे जेलभरो आंदोलन करण्यात येईल.
०००००
