म्हाडा मुंबई मंडळ सोडत ऑक्टोबर २०२४

मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली असून मुंबई मंडळाने अर्ज विक्री – स्वीकृतीसाठी दिलेल्या विहित मुदतीत अनामत रकमेसह एक लाख १३ हजार इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. प्राप्त अर्जांची मुंबई मंडळाकडून छाननी पूर्ण करण्यात आली असून गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पात्र अर्जदारांची प्रारूप यादी मुंबई मंडळ म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करणार आहे.
मुंबईतील गोरेगाव, बोरिवली, जुहू, पवई, विक्रोळी, ताडदेव, दादर, वरळी, वडाळा आदी ठिकाणच्या २०३० घरांसाठी ९ ऑगस्टपासून सोडत पूर्व प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ९ ऑगस्ट ते १९ सप्टेंबरदरम्यान ही प्रक्रिया सुरू होती. या कालावधीत मुंबई मंडळाकडे अनामत रकमेसह एक लाख १३ हजार अर्ज सादर झाले आहेत. या अर्जांची छाननी करण्यात आली असून छाननीत पात्र – अपात्र ठरणाऱ्या अर्जदारांची यादी गुरुवारी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अपात्र ठरलेल्या अर्जदारांना सूचना – हरकती नोंदविण्यासाठी काही कालावधी देण्यात येणार आहे. या कालावधीत आपल्या अर्जातील त्रुटी दूर करणाऱ्या आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांची नव्याने पात्रता तपासत एकूण पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
सोडतीच्या वेळापत्रकानुसार अंतिमतः पात्र ठरलेल्या अर्जदारांची यादी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीत जे अर्जदार समाविष्ट असतील तेच सोडतीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे या यादीत एकूण किती अर्जदार पात्र ठरतात आणि किती अर्जदार सोडतील सहभागी होतात हे ३ ऑक्टोबर रोजी स्पष्ट होईल. पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढली जाणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे उपस्थित राहणार आहेत. सोडतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी अर्जदारांची यादी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर यशस्वी अर्जदारांना देकार पत्र वितरित करून त्यांच्याकडून घराची विक्री किंमत भरून घेतली जाईल. निश्चित कालावधीत जे यशस्वी अर्जदार घराची संपूर्ण रक्कम मुद्रांक, शुल्क नोंदणी शुल्क आणि देखभाल शुल्क अदा करतील त्यांना घरांचा ताबा दिला जाईल. दरम्यान, यंदा सोडतील निर्माणाधीन प्रकल्पातील घरांची संख्या बरीच आहे. त्यामुळे अशा घरांसाठी यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना घराचे काम पूर्ण होऊन निवासी दाखला मिळाल्यानंतर घरांचा ताबा दिला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *