मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या अडिचवर्षातील सरकारने केलेल्या भ्रष्ट्राचाराची पोलखोल करण्याकरीता महाविकास आघाडीतर्फ आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन गद्दारांचा पंचनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.

 

आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. ते ज्या प्रकारे प्रशासकीय निर्णय घेत आहेत ते पाहता यांनी घेतलेले निर्णय लागू होणार आहे का? प्रशासन सध्या यांच्या कामामुळे नाराज आहे. त्यामुळे त्यांच्या हातातून सत्ता काढून घ्यावी लागेल, असा घणाघात यावेळी शरद पवार यांनी केला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या शासन निर्णयावर हल्लाबोल केला. शरद पवार यांनी ज्या वेगाने निर्णय घेण्यात आले त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्रातील जनता परिवर्तनासाठी उत्सुक असल्याचे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, येत्या दीड महिन्यात हे सरकार घालवायला हवं. मुंबई हे असं शहर आहे तिथं २ पोलीस कमिशनर आहेत. जे जे लाडके आहेत त्यांना कमिशनर करा. पाच कमिशनर करा. माझं स्पष्ट म्हणणं आहे की, जी गद्दाराना सुरक्षा देण्यात आली आहे. ती काढा आणि लोकांसाठी वापरा. ही जबाबदारी गृहमंत्री यांची आहे.भ्रष्टाचारामुळे शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला याची आठवणही ठाकरे यांनी यावेळी करून दिली.

शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा फासण्याचं काम सरकारने केले आहे.  स्वतःच राजकारण कसं करायचं हेच यांच्या डोक्यात आहे. महाराष्ट्रातील जनता यांना सत्तेवरून उतरवणार, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. बाबा सिद्धकी यांची हत्या करण्यात आली. सत्ताधारी पक्षातील नेते देखील सुरक्षित नाहीत. स्वतःच राजकारण कसं करायचं हेच यांच्या डोक्यात आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांना असंवैधानिक पद्धतीने पदावर बसवले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अधिकाऱ्यांचा वापर करायचा आणि महत्त्वपूर्ण पदावर यांच्या विचारांचे अधिकारी बसवायचे आणि लोकशाहीचा खून करायचा ही पद्धत महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू झाली आहे. आणि त्याचे सर्वात मोठे उदाहरण रश्मी शुक्ला आहेत.

महाराष्ट्राला पुन्हा गतवैभवत आणण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित या निवडणुकीत सामोरे जात आहोत. महाराष्ट्राची जनता या निमित्ताने जशी लोकसभेमध्ये आमच्या बाजूने उभी होती. तसेच महाविकास आघाडीच्या बरोबर येणाऱ्या विधानसभेतही जनता राहील अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्र वाचवणे आमचं काम आहे, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *