मुंबई : ज्येष्ठ नाट्य लेखक आणि दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. आज सायंकाळी त्यांच्या ‘मु. पो. वडाचे म्हसवे ते यु.एस.ए’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात येणार होते. त्यांच्या पार्थिवावर डोंबिवली येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

त्यांनी ‘यू टर्न’, ‘कथा’, ‘जोडी जमली तुझी माझी’, ‘ केंव्हा तरी पहाटे’ यांसारख्या ३८ नाटकांचे लिखाण केले. तर, ‘असा मी काय गुन्हा केला’, ‘भरत आला परत’, ‘दुर्गा म्हणत्यात मला’, ‘जन्म’, ‘आम्ही बोलतो मराठी’, ‘साद’, ‘तृषार्त’, ‘झेंटलमन’ आदी चित्रपटांचेही लेखन केले. त्याचबरोबर, ‘या गोजिरवाण्या घरात’ आणि ‘चार दिवस सासूचे’ या मालिकांचे लेखनही त्यांनी काही काळ केले होते. लेखनाबरोबरच म्हसवेकर यांनी ‘असा मी काय गुन्हा केला’ आणि ‘आम्ही बोलतो मराठी’ या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते.

म्हसवेकर यांच्या यू टर्न या नाटकासाठी त्यांना ‘झी नाट्य गौरव सर्वोत्कृष्ट लेखकाचा’ २००९ साली पुरस्कार देण्यात आला होता. तसेच, ‘महाराष्ट्र राज्य शासन अभ्यासक नाट्य महोत्सवात सर्वोत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक’, ‘मुंबई मराठी साहित्य संघाचा उत्कृष्ट लेखक’, ‘चतुरंग सवाई लेखक’, ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक’ आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *