अशोक गायकवाड

कर्जत : बदलत्या हवामानाने निर्माण केलेली आव्हाने पेलण्यासाठी संशोधन केंद्र अद्यावत करणे आवश्यक असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत वाघमोडे यांनी येथे केले.अखिल भारतीय समन्वित भात सुधार प्रकल्प देखरेख पथकातील तज्ज्ञ शास्त्रज्ञांसोबत संशोधन केंद्राच्या प्रशिक्षण सभागृहात आयोजित बैठकीत अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

देखरेख पथकात हैद्राबादच्या भारतीय कृषी संशोधन परिषद आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत कार्यरत वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जी. एस. लाहा,कृषिविद्या विभागाच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.श्रीदेवी, वनस्पती पैदास विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णमूर्ती ,संकरित भात विभागाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. रेवथी, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.बंडेप्पा, जैवतंत्रज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.देवन्ना यांचा समावेश होता.

डॉ. वाघमोडे यांनी अखिल भारतीय समन्वित भात सुधार प्रकल्प -२०२४ च्या अहवालाचे सादरीकरण केले.ते पुढे म्हणाले की,पायाभूत सुविधा निर्माण झाल्यास कर्जतच्या संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करण्याची क्षमता आहे.

यावेळी देखरेख पथकातील सर्व तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी मनोगत व्यक्त करीत सुरू असलेल्या एकंदरीत संशोधन कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सर्व शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले.आभार वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. पुष्पा पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *