ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता
कल्याण : २०१९च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विजय मिळालेला एकमेव मतदारसंघ अशी कल्याण ग्रामीण मतदार संघाची ओळख आहे. आगरीबहुल असा हा मतदारसंघ असून मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांचा हा मतदार संघ असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. या मतदारसंघातून राजू पाटील हे पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणारे हे निश्चित असले तरी मनसे प्रमुख राज ठाकरे या मतदारसंघात नेमका कोणता पवित्रा घेणार, याविषयी सर्वाधिक उत्सुकता आहे. गेल्या निवडणुकीत माघार घेऊन निवडणूक न लढवणारे माजी आमदार सुभाष भोईर शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याने ही लढत चुरशीची ठरणार आहे.
कल्याण, डोंबिवली, ठाणे महापालिकेतील काही भाग, कल्याण तालुका, अंबरनाथ तालुक्यातील काही भाग, नवी मुंबईतील गावे तसेच कल्याण पूर्वेतील लोकग्राम परिसर अशा विस्तृत परिसरात कल्याण ग्रामीण मतदारसंघाचा विस्तार आहे. या मतदारसंघात आगरी मतदारांचे प्राबल्य असल्याने सर्वच राजकीय पक्षाकडून या मतदाराच्या मतांचे दान मिळविण्यासाठी आगरी चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र काहीही असले तरी यावेळी मातब्बरांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केल्याने या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या मतदारसंघाने यापूर्वी दोनवेळा मनसेच्या बाजूने कौल दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी शिवसेनेकडून मनसेला विधानसभेत सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनानंतर खासदार शिंदे यांच्या प्रचारात राजू पाटील पुढाकार घेतला होता. त्यामुळे या मदतीची परतफेड शिवसेना आणि डॉ. शिंदे यांच्याकडून होईल, अशी मनसेला अपेक्षा आहे. तर मागील विधानसभा निवडणुकीत भोईर यांना उमेदवारीपासून दूर ठेवळे होते. मात्र शिवसेनेत विभाजन झाल्यानंतर भोईर हे उमेदवारीचे प्रमुख दावेदार झाले आहेत. मतदारसंघात असलेला दांडगा जनसंपर्क आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या मताची जोड त्यांना मिळणार असल्याने महाविकास आघाडीचे आव्हान असणार आहे.
महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या भाजपकडूनही या मतदारसंघावर दावा केला जात असून भाजपाचे नंदू परब उमेदवारी मिळविण्यासाठी खटाटोप करत आहेत. तर शिवसेनेकडून डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, ठाणे महापालिकेचे उप महापौर रमाकांत मढवी आणि कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील यांच्यात चुरस वाढली आहे. मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिंदे गटाला सुटल्यास ठाकरे गटाच्या उमेदवाराला शह देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून भोईर यांच्या मतामध्ये विभाजन करण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गत निवडणुकांची पार्श्वभूमी
२००९च्या निवडणुकीत या मतदारसंघातून मनसेकडून रमेश पाटील यांची लढत शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांच्यामध्ये बरोबरी होती. मात्र त्यावेळी मनसेच्या लाटेत रमेश पाटील यांचा विजय झाला होता. तर २०१४ च्या निवडणुकीत रमेश पाटील यांच्यावर शिवसेनेच्या सुभाष भोईर यांनी मात करत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात घेतला होता. तर २०१९ च्या निवडणुकीत मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांच्यावर मात करत हा मतदारसंघ जिंकला. सुभाष भोईर यांनी यावेळी शांत राहण्याचा घेतलेला निर्णय काहीसा मनसेच्या पथ्यावर पडल्याची चर्चा होती. २०१९ च्या निवडणुकीत मनसेने हा मतदारसंघ जिंकला असला तरी आता परिस्थिती बदलली आहे.
0000
