रमेश औताडे

मुंबई :भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त  संविधान जागर समिती महाराष्ट्रच्या वतीने राज्यभरात ‘घर घर संविधान’ हे अभियान राबाविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी नितीनभाऊ मोरे, योजनाताई ठोकळे, ॲड. संदिप जाधव, स्नेहाताई भालेराव,जयवंत तांबे आदी समन्वयक उपस्थित होते. हे अभियान २६ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या संविधानिक मुल्यांचा जागर करण्यात येणार आहे. अभियानाच्या अंतर्गत राज्यभर विविध कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धा आयोजित करणार आहोत. तसेच  घरोघरी संविधान सरनामा तसेच पुस्तिका वितरित करून संविधानिक मूल्यांचा प्रसार केला जाणार आहे.

संविधानाच्या ब‌द्दल काही लोक हेतुपुरस्सर खोटी माहिती व नॅरेटीव्ह पसरवत आहेत. नागरिकांमधील गैरसमज दूर करून योग्य व वास्तव माहितीचे जागरण या अभियानाच्या ‌द्वारे होईल. संविधान जागर समितीत  राज्यातील अनेक संस्था संघटना एकत्र आलेल्या आहेत व या द्वारे हे अभियान राबविले जाणार आहे. राज्य सरकारकडून नुकतीच या अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने नागरिकांनी १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन देखील यानिमिताने करण्यात येणार आहे.

या अभियानाचा शुभारंभ माजी खासदार बृज लाल माजी पोलीस महासंचालक यांच्या शुभहस्ते व दिलीप कांबळे माजी मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या घर घर संविधान अभियानात नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभागी व्हावे व प्रत्येक घरापर्यंत व घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत संविधानाचा जागर करावा  असे आवाहन संविधान जागर समिती महाराष्ट्र यांच्या कडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *