माथेरान : केवळ नगरपरिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांची पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदावर वर्णी लागणार याची खात्री झाल्यामुळे खेडकर यांना कोणत्याही परिस्थितीत हे पद मिळू नये यासाठी मागील काही महिन्यांपासून विरोधकांनी कुटनीती आखण्यास सुरुवात केली असून शिवसेनेच्या ठाकरे गटातील त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हेतुपुरस्सर विधानसभा निवडणुकीपर्यंत शिंदे गटात पक्षप्रवेश करण्यासाठी पाठवले आहेत. यामागे एकच कारण म्हणजे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद मनोज खेडकर यांना मिळू नये.विधानसभा निवडणूक झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे सर्व पक्षप्रवेश केलेल्या मंडळींना सोबत घेऊन नगराध्यक्ष पद खेडकर यांना देण्यात येऊ नये अन्यथा आम्ही सर्व जण राजीनामा देऊ असा वेठीस धरण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाहीत.पण ज्यावेळी मनोज खेडकरांनी आपल्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आमदारांच्या निवासस्थानी जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केला होता त्यावेळी आमदार थोरवे यांनी शब्द दिला होता की, पुढील नगराध्यक्ष मनोज खेडकर हेच असणार आहेत. ही बाब शिंदे गटातील नेत्यांना आणि समस्त कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे माथेरान मधील विरोधकांना सुध्दा ठाऊक आहे. त्यामुळेच विरोधकांनी कूट नीती आखून आपलेच कार्यकर्ते जाणूनबुजून शिंदे गटात पाठवले आहेत जेणेकरून पुढील काळात राजीनाम्याची भीती दाखवून आमदारांना कोंडीत पकडण्यासाठी त्यांनी हेच धोरण आखलेले आहे. आमदार थोरवे हे आपल्या शब्दावर ठाम राहिल्यास आणि खेडकर हेच नगराध्यक्ष पदाचे दावेदार आहेत असे सांगितल्यास शिंदे गटात पाठवलेले नवखे, हौसे, गवसे आणि नवशे यांना पुन्हा आपल्या स्वगृही जाणार यात शंकाच नाही.
माथेरान विषयी अनेक व्हिजन मनोज खेडकर यांच्याकडे आहेत. कधी न होणारी महत्वाकांक्षी कामे खेडकर यांनी त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात पूर्ण केली आहेत.यामध्ये मिनीबस सेवा,मिनिट्रेनची शटल सेवा अशी कामे पूर्ण केल्यामुळे इथली मुले महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकली आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणून फिनिक्युलर रेल्वे प्रकल्प मार्गी लागणार होता तो सुध्दा विरोधकांमुळे पूर्ण होउ शकला नाही. खेडकर जर का नगराध्यक्ष झाले तर विरोधकांची दुकाने बंद होतील, अतिक्रमण आणि बाहेरील लोकांच्या टपऱ्या वाढणार नाहीत,दबावतंत्र आणून सर्वसामान्य लोकांवर राज्य करता येणार नाही.ई रिक्षाच्या संख्येत मर्यादा आणता येणार नाही. एकूणच मतांसाठी विरोधी पक्षांना नगरपरिषदेच्या तिजोरीत हात घालता येणार नाही यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत नगराध्यक्ष पदी खेडकर आणि माजी विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे ही निष्कलंक माणसे नको आहेत. त्यासाठी विरोधक असणारे ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून गावाला वेठीस धरून त्याचप्रमाणे ज्यांना या गावविषयी काहीएक घेणेदेणे नाही अशांना शिवसेनेचे शिंदे गटात पक्षप्रवेश करण्यासाठी पुढे केले जात आहे.विरोधकांचे आपले दुकान चालू राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.आणि हीच परिस्थिती राहिली तर भविष्यात स्थानिकांना हे गाव सोडून जाण्याची वेळ येईल त्यासाठी नागरिकांनी आतापासूनच सतर्क राहणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
