शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची माहिती

ठाणे : राज्यातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करता यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदार संघातून निवडणुक लढविण्यास तयार नव्हते. परंतु मी आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, अशी माहिती शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी बुधवारी ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना दिली. ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे विधानसभा निवडणुक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा बुधवारी आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात खासदार नरेश म्हस्के यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुक लढण्यास तयार नव्हते, असे सांगत त्या घटनेची माहिती पदाधिकाऱ्यांसमोर मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यातील मतदार संघामधील महायुतीचा प्रत्येक उमेदवार प्रचारासाठी येण्यास सांगत होता. परंतु कोपरी पाचपाखाडी मतदार संघातून निवडणुक लढलो तर, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जाणे शक्य होणार नाही. या उमेदवारांच्या प्रचाराला जाता यावे यासाठी कोपरी पाचपाखाडीतून निवडणुक लढणार नाही, असे शिंदे यांनी राहुल शेवाळे आणि संजय निरुपम यांना सांगितले होते.
या दोन्ही नेत्यांनी ही माहिती दिल्यानंतर मी आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवडणुक लढण्याचा आग्रह धरला. निवडणुक लढलो तर, महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार कोण करणार, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु निवडणुक लढवावी, असा आमचा आग्रह होता. निवडणुक लढण्याची नाही, असा निर्णय घेऊ नका. तुम्ही फक्त अर्ज भरा. आम्ही स्वत:ला एकनाथ शिंदे समजू आणि तुमचा प्रचार करु, अशी विनंती त्यांना केली. यानंतरही ते निवडणुक लढण्याबाबत विचार करत होते. अखेर, आम्ही धरलेल्या आग्रहानंतर अखेर त्यांनी उमेदवारी अर्ज केल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी मेळाव्यात बोलताना दिली. मुख्यमंत्री शिंदे हे स्वत: पेक्षा इतरांचा जास्त विचार करतात आणि त्यांचे सर्वच ठिकाणी लक्ष आहे. माझ्यावरही काही मतदार संघांची जबाबदारी आहे. त्या मतदार संघांबाबत विचारपूस करून आढावा घेतात, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *