मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभवानंतर हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही असं म्हणत खासदार संजय राऊतांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, मत पत्रिकेवर पुन्हा निवडणुका घ्या. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही.नाही! नाही! त्रिवार नाही! असा निकाल लागूच शकत नाही असा दावा राऊतांनी करत संपूर्ण निकालावर संशय व्यक्त केला आहे. निकालामागे खूप मोठे कारस्थान दिसतंय, हा निकाल लावून घेतलेला दिसतोय. हा लोकांनी दिलेला कौल नाही. मोदी शाहांनी यंत्रणा ताब्यात घेतली आहे असा आरोप त्यांनी केला.
शरद पवार यांनी महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं. तुम्ही त्यांना दहा जागाही द्यायला तयार नाहीत. हे महाराष्ट्रामध्ये शक्य आहे का? ही काय गडबड आहे हे सगळ्यांना कळेल. पण जरी हा निकाल आला असला तरी हा जनतेचा कौल आहे, असं आम्ही मानायला तयार नाही. जनतेचा कल हा नव्हता. मी १०० टक्के सांगतो, जय पराजय होत असतात. निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये हारजीत होत असते. त्याच्याविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही. पण हे निकाल लावून घेतलेले आहेत, या निकालांवर लोकशाही मानणाऱ्या माझ्यासारख्या माणसाचा विश्वास असू शकत नाही अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
