अनिल ठाणेकर
ठाणे : शेतीत अपार कष्ट करणाऱ्या शेतकरी महिलांची राज्यव्यापी परिषद नाशिक येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाली. अखिल भारतीय किसान सभेने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या परिषदेसाठी राज्यभरातून २३ जिल्ह्यांमधील मोठा प्रतिसाद लाभला.परिषदेचे उद्घाटन जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे यांनी केले. महिलांना मालमत्तेमध्ये समान वाटा मिळाला पाहिजे, शिवाय महिलांच्या घरातील व बाहेरील सुद्धा सर्व प्रकारच्या श्रमाची नोंद ‘ श्रम ‘म्हणून झाली पाहिजे यासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
‘मकाम ‘ या महिला संघटनेच्या नेत्या सीमा कुलकर्णी यांनी परिषदेला संबोधित केले. शेतीतील महिलांचे श्रम एकूण शेती श्रमापैकी 80 टक्के असताना शेतीची मालकी मात्र महिला शेतकऱ्यांच्या नावे केवळ १४ टक्के आहे हे विषण्ण करणारे वास्तव त्यांनी परिषदेसमोर ठेवले. महिला शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून खरीखुरी मान्यता मिळविण्यासाठी शासकीय पातळीवर ठोस धोरण घेण्याची मागणी त्यांनी केली.किसान सभेच्या राज्य कौन्सिलच्या सदस्या कविता वरे यांनी परिषदेचा 17 कलमी ठराव मांडला. या १७ कलमांवर या परिषदेत सविस्तर चर्चा करून महिला शेतकऱ्यांच्या हक्क व मागण्यांची सनद या परिषदेत संमत करण्यात आली.राज्यभरातून आलेल्या शुभा शमीम, आनंदी अवघडे, नसीमा शेख, मनीषा बल्याळ, निशाद शेख, लहानी दौडा, संगीता साळवे, निर्मला मांगे, सुवर्णा गांगुर्डे, प्रियांका भापकर, प्रणिता उदमले, रोहिणी नवले, हिराबाई घोंगे, हेमलता पाटील आदी महिला नेत्यांनी या ठरावातील चर्चेत सहभाग घेतला.किसान सभेच्या वतीने आयोजित या परिषदेत, जनवादी महिला संघटना, सीटू कामगार संघटना, शेतमजूर युनियन, एस.एफ.आय. व डी.वाय.एफ.आय. या संघटनांनी सहभाग घेत महिला शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्रस्थानी आणण्याचा संकल्प केला. किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सीटू कामगार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, आ. विनोद निकोले, दत्ता चव्हाण, सोमनाथ निर्मळ यांनी परिषदेला शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.अखिल भारतीय किसान सभा महिला शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्रस्थानी आणण्यासाठी व महिलांचे नेतृत्व नेटाने पुढे यावे यासाठी प्राधान्याने प्रयत्न करेल असे प्रतिपादन डॉ. अशोक ढवळे यांनी केले. खरीखुरी स्त्री मुक्ती व्हायची असेल तर व्यवस्था परिवर्तनाची लढाई करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख यांनी परिषदेला आलेल्या सर्वांचे स्वागत केले. राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी प्रास्ताविक केले. महिला शेतकरी नेत्या माधुरी देशमुख, अनिता खुनकर, सुनीता शिंगडा, सुमन विरणक यांचा समावेश असलेल्या अध्यक्षीय मंडळाने परिषदेचे कामकाज पाहिले. किसान सभेचे नेते सुनील मालुसरे यांनी आभार व्यक्त केले. परिषदेत पारित करण्यात आलेल्या शेतकरी महिला हक्क व मागण्यांच्या सनदेचे वाचन करण्यासाठी व महिला शेतकऱ्यांचे हक्क केंद्रस्थानी आणण्यासाठी राज्यभर जिल्हावार महिला शेतकऱ्यांच्या परिषदा आयोजित करून त्यांच्या प्रश्नांवर लढे उभारण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *