कल्याणमधील ब्राह्मण सभेच्या कार्यात ब्राह्मण आमदारांचे मत

कल्याण : ब्राह्मण घटकांकडून केवळ ज्ञाती विकासापुरते काम न करता विविध स्तरातील समाजाच्या विकासासाठी काम केले जात आहे. ज्ञाती प्रश्न, नागरी, विकासाची कामे करताना जात, पात, धर्म न पाळला जात नाही. या दूरगामी विचारातून समाज विकासाबरोबर राष्ट्र विकास साधला जाणार आहे. त्या दिशेने देशाची पावले पडत आहेत, अशी मते रविवारी येथील ब्राह्मण सभा कल्याण शाखेतर्फे आयोजित ब्राह्मण समाजातील नवनिर्वाचित आमदारांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.
ब्राह्मण सभा कल्याण शाखेतर्फे विधानसभा निवडणुकीत राज्यातून विविध मतदारसंघातून निवडून आलेल्या ब्राह्मण ज्ञातीमधील आमदारांच्या सत्काराचा कार्यक्रम अत्रे रंंगमंदिरात आयोजित केला होता. यावेळी सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थानचे भूषण महारुद्रस्वामी महाराज, भाजपचे आमदार संजय केळकर, बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, राजापूरचे आमदार किरण सामंत, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशीष दामले, आमदार कुमार आयलानी, भाजप नेते माधव भांडारी, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मुकुंद बापट, उपाध्यक्ष पंकज दांडेकर, सचिव प्रसाद काणे, ॲड. सुरेश पटवर्धन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्व समाज, राष्ट्र विचार समोर ठेऊन ब्राह्मण लोकप्रतिनिधी, ब्राह्मण संस्था काम करत आहेत. या सर्व कामांमध्ये राष्ट्र विचाराला प्रथम प्राधान्य आहे. परशुराम आर्थिक विकास मंडळाला शासनाने २०० कोटीचा निधी देऊन या माध्यमातून ज्ञाती विकासासाठी विविध कार्यक्रम राबविणे शक्य होणार आहे. स्वबुध्दी सामर्थ्यावर ब्राह्मण समाज वाटचाल करत आहे. दुर्बल घटक, इतर समाज घटकांच्या विकासासाठीही तितकाच तत्पर आहे, असे आमदार केळकर यांनी सांगितले.
आरक्षणाच्या मागे न धावता ब्राह्मण ज्ञाती समाज बुध्दी सामर्थ्याने प्रगती करत आहे. ही प्रगती करत असताना तो राष्ट्र, समाज विकासाला प्राधान्य देत आहे, असे आमदार उपाध्यये यांनी सांगितले. श्री भूषण स्वामी महाराज यांनी समर्थ रामदास स्वामी यांनी बलोपसनेबरोबर मनोपसनेची रुजवण समाजात केली. यामधून एकसंध समाज उभा राहिला. मग स्वराज्य आणि सुराज्याची उभारणी झाली, असे सांगितले. समाज घटक कोणताही असो. त्याला हिणवण्याची वृत्ती काही वर्षापासून वाढली. त्यावेळेपासून आपल्याही ज्ञातीचे समाज संघटन असावे असे वाटू लागले. त्यामधून कल्याणचा कार्यक्रम आकाराला आला, असे भांडारी यांनी सांगितले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ऑनलाईन माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. मुख्यमंत्री अनुपस्थित नागपूर येथे भाजप सदस्य नोंदणी अभियानात व्यस्त असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *