महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
नवी मुंबई : शहरात बेकायदा फेरीवाल्यांची संख्या सातत्याने वाढताना पाहायला मिळते. नवी मुंबईतील रेल्वेस्थानकाबाहेरील पदपथ फेरीवाल्यांनी व्यापून टाकल्याने नागरिकांनी चालायचे कोठून असा प्रश्न निर्माण झाला असून आता फक्त पदपथ नव्हे तर या फेरीवाल्यांचा रस्त्यावर ठाण मांडून व्यवसाय केला जात असल्याने शहरातील बेकायदा फेरीवाल्यांनी व्यापलेले पदपथ रिकामे करावेत तर आता फक्त पदपथ नाही तर रस्त्यावरच ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
करोनाच्या काळात आर्थिक संकटामुळे व्यवसाय बदल तसेच दुकानाबाहेरील बेकायदा फेरीवाल्यांची संख्या वाढली ती सातत्याने वाढतच असून आता या फेरीवाल्यांचे बस्तान चक्क रस्त्यावर येत असल्याचे चित्र आहे. फेरीवाल्यांकडून पालिका कर्मचारी तसेच सुरक्षारक्षक पथकातील व्यक्तींना मारहाणीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. शहराच्या आठही विभागांत मोठ्या प्रमाणात बेकायदा फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याचे पाहायला मिळते. पालिकेचे फेरीवाला धोरण अद्याप पूर्णत्वास आले नसून शहरात परवानाधारक फेरीवाले कमी तर बेकायदा फेरीवाले अधिक असल्याचे दिसत आहे. बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा या विभागांत विशेषत: रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाल्यांचा वावर अधिक आहे.
बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने विभाग कार्यालयाअंतर्गत कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. तसेच या पथकाबरोबर सुरक्षा रक्षकही नेमलेले असतात. त्यांच्या संरक्षणात बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. पण कारवाई करण्यासाठी पालिकेची गाडी येणार याची माहिती फेरीवाल्यांना अगोदरच मिळते. सामान्य नागरिकांनी विचारणा केली तर फेरीवाले दमदाटी करत असल्याचे दिसून येत आहे. नेरुळ, वाशी, कोपरखैरणे विभागांत तर अनेक ठिकाणी अशी फेरीवाल्यांची ठिकाणे बनलेली आहेत.
बेलापूर विभागात सातत्याने बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत. पदपथा?बरोबरच रस्त्यावरही बेकायदा व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येईल.
शशिकांत तांडेल, सहाय्यक आयुक्त, बेलापूर विभाग
