मुंबई : भाजपाचा वाईट अनुभव आला आहे. त्यामुळे काही करून आता भाजपाला हरवायचे आहे. माझ्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरीही चालेल; पण, तुम्ही तुमची निष्ठा विकू नका. भाजपाने फक्त युती तोडली नाही तर ते आपल्याला संपवायला निघाले आहेत. दोन गुजराती आपल्याला गिळायला निघालेले असताना आपण जर तुझे माझे करत बसलो तर माझे म्हणणे आहे की, लढाई न लढलेले बरे. मुंबई आमच्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असा निर्धार उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या जनसेवेबाबत सविस्तर माहिती देणारी पुस्तिका शिवसेना भवन येथे प्रकाशित केली. मुंबईतील सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख , आमदार, खासदार यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली.
मुंबईसाठी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाजपा किंवा तत्कालीन जनसंघाचा काडीमात्र संबंध नव्हता. मुंबई गुजरातला हवी होती, म्हणून त्यांनी संघर्ष केला. आजपर्यंत भाजपाने आपला दुरुपयोग करून घेतला. काँग्रेसचाही अनुभव तुम्हाला आलेला आहे. आपण मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी मनसेशी युती केली आहे. युती असते, आघाडी होते, तेव्हा १०० टक्के आपल्या मनासारखे होत नाही. काही जागा आपल्या हक्काच्या असतात. परंतु, नाईलाजाने त्या सोडाव्या लागतात, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
फोटो ओळ
गुजरात मॉडेलच्या धर्तीवर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे मुंबईत केलेल्या विकासकामांवर आधारीत मुंबई मॉडेल या पुस्तकाचे आज प्रकाशन उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
