भाजपासोबत कधीही समझोता करणार नाही
अकोला : राष्ट्रीय स्वयंसेवक विरुध्दची रस्त्यावरील लढाई आम्ही जिंकू शकतो पण सभागृहातील लढाई जिंकायची असेल, तर सभागृहात जाणे गरजेचं आहे. तुमच्या मतांनी मी सभागृहात जाऊ शकतो आणि तुमची लढाई मी लढू शकतो, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘प्रेशर कुकर’ या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन अकोल्यातील जनतेला केलं आहे. अकोल्यातील फतेह चौक येथील प्रचार सभेत ते बोलत होते. सभेला हजारोंच्या संखेने नागरिक उपस्थित होते.
औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवून दंगलीचा माहोल आम्ही दोन ते तीन तासात संपवून टाकला, ही वस्तुस्थिती असल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. एक वेळ होती की, महाराष्ट्र या देशाला राजकारण आणि समाजाचा व्यवहार कसा असावा हे शिकवत होता. 1960 मध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हा शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी बाजार समितींचे गठण हे कायदेशीररीत्या केले. आणि त्यामध्ये म्हटले की, शेतकऱ्यांचा माल हा बाजार समितींमध्ये विकला गेला पाहिजे, असा इतिहासाचा दाखलाही आंबेडकर यांनी दिला.
आंबेडकर म्हणाले की, नागरिकत्वाच्या मुद्द्याला धरून जो NRC आणि CAA आला आहे. हा असंविधानिक आहे. संविधान म्हणते की, जो या देशात जन्माला आला तो भारतीय नागरिक आहे, त्याला कोणता पुरावा देण्याची गरज नाही. आता हे सरकार कागद मागत आहे. याचा अर्थ हा आहे की, तुमच्याकडे कागद आहेत, तर तुम्ही नागरिक आहात. तुमच्याकडे कागद नसेल, तर तुम्ही तुरुंगात जाल. ही लढाई बाहेरून लढली जाऊ शकत नाही, काही लोक म्हणतात की, आम्ही न्यायालयात जाणार. न्यायालय फक्त एवढच सांगू शकते की, हा कायदा संविधानिक आहे किंवा नाही, पण हा कायदा रद्द करायचा असेल, तर संसदच ते करू शकते, त्यासाठी कोणीतरी संसदेत जाऊन आवाज उठवणे गरजेचे आहे.
सरकारने जनतेची निराशा केली
लोक आशा लावून होते की, हे सरकार बदल घडवेल, पण त्यांची निराशा झाली आहे. ते मतदानाला जात नाहीत. याचा अर्थ असा आहे की, जे धर्मनिरपेक्ष नागरिक आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहे की, त्यांनी 100 टक्के मतदान करावे, तेव्हा बदलाला सुरुवात होईल. आपण जर भाजपला मतदान दिलं, तर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली असं होईल, असेही त्यांनी म्हटलं आहे.
