‘माझे कल्याण शहर’ प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न
कल्याण: छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर म्हणजे कल्याण शहर. कल्याण शहराला विशिष्ट असे व्यक्तिमत्व आहे याच कल्याण शहराविषयी आपल्याला बहुविध माहिती असणं ही एक फार मोठी प्रेरणा ठरते, याच अनुषंगाने मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त सार्वजनिक वाचनालय कल्याणच्यावतीने “माझे कल्याण शहर प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२६” चे आयोजन करण्यात आले होते. कल्याण शहरातील तब्बल ४३ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
कल्याण सांस्कृतिक इतिहास,सुभे कल्याण, १०० वर्षाचा नगरपालिका अहवाल अशा विविध संदर्भग्रंथातील प्रश्न छत्रपतीशिवाजी महाराज कल्याणमध्ये कधी आले? कल्याणमध्ये इलेक्ट्रिक सप्लाय केव्हा आली? प्रभाकर ओक टॉवर बांधणीचा खर्च किती आला? भारताचार्य चिंतामण वैद्य यांना भारताचार्य पदवी कोणी दिली? स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काव्यमय चरित्र लिहिण्याचा मान कोणाला मिळाला? कल्याणचे पहिले दैनिक कोणते? पोखरण तलाव कोठे आहे? असे विविध प्रश्न स्पर्धकांना विचारण्यात आले होते.
वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या संकल्पनेतून ही माहितीपर स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली “कल्याण” या संदर्भग्रंथाचे लेखक श्रीकांत पेटकर, विवेकानंद विचारमंचचे ज्येष्ठ साहित्यिक प्रविण देशमुख, वाचक दिप्ती जोशी, धनंजय गोरे यांनी या स्तुत्य उपक्रमासाठी आभार मानुन शुभेच्छा दिल्या. प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, उपाध्यक्षा आशा जोशी, कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, वाचक वर्ग, श्रोता वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता
