ठाण्याची जागा शिवसेनाच लढवणार?

ठाणे : आली लग्न घटीका समीप… तरीही नवऱ्या मुलाचा पत्ता नाही, अशी काहीशी अवस्था ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीची झाली आहे. आधी जागा वाटपासाठी चर्चांचे गुर्‍हाळ व त्यानंतर पसंत- नापसंतीचा रंगलेला खेळ यामुळे गेल्या महिन्याभरापासून मतदारसंघात बिनचेहऱ्याचा नुसताच प्रचार सुरू आहे.

आता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होण्यास अवघे चार दिवस उरले आहेत, तरी नावाची घोषणा झाली नाही. शिंदे गटाकडे ही जागा येणार हे निश्चित झाले आहे; पण भाजपप्रणित नावावर फुली मारत शतप्रतिशत शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक रिंगणात पाठवण्यावर शिंदे गट ठाम आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

ठाणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असला तरी खरी लढत ही शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातच होणार आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे विभागलेले दोन मावळे एकमेकांसमोर उभे राहणार असल्याने निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे.

त्यात मुख्यमंत्र्यांसाठी हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. त्यामुळे कोणत्याही बाबतीत या मतदारसंघासाठी तडजोड न करण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ठाम आहेत. त्यामुळेच सुरुवातीपासून दावा करणाऱ्या भाजपला जागावाटपात एक पाऊल मागे टाकण्यास भाग पडले. चिन्ह तुमचे उमेदवार आमचा हा फॉर्म्युला देत सुरुवातीला संजीव नाईक यांचे नाव भाजपने पुढे केले.

त्यांना तयारीला लागा, असे संकेत देताच नाईक थेट प्रचारालाही लागले; मात्र या नावाला शिंदे गटातून नापसंती मिळाल्याने नवीन उमेदवार देण्यात आला; पण या नवीन चेहऱ्याला जनाधार नसल्याचे सांगत मोठी फुली मारण्यात आल्याचे समजते.

शिंदे गटात सुरुवातीपासूनच माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांची नावे आघाडीवर आहेत. असे असताना भाजपकडून उमेदवार आयात केला असता मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता होती. महविकास आघाडीकडून विद्यमान खासदार राजन विचारे तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ते ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले, ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यात त्यांच्या मेळावे आणि सामाजिक, धार्मिक उपक्रमांमध्ये होणारी गर्दी शिंदे गटाला आव्हान आहे. अशा घट्ट पाय रोवलेल्या मूळ ठाणेकर चेहऱ्याला टक्कर द्यायची असेल, तर महायुतीतील उमेदवारही तितकाच ताकदीचा पाहिजे.

नुसता लोकप्रिय किंवा विचारवंत उमेदवार देऊन भागणार नाही. यावर शिंदे गटाचे एकमत झाले आहे. तसा संदेशही भाजपपर्यंत पोहोचल्याचे समजते. त्यामुळे नवीन ‘चेहऱ्या’पेक्षा चर्चेतल्याच नावाचा विचार होऊन तशी घोषणा होण्याची शक्यता आहे.

प्रचारासाठी मिळणार कमी वेळ

२६ एप्रिल ते ३ मेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यानंतर १८ मेपर्यंत प्रचार करता येणार आहे. विद्यमान खासदारांनी जोरदार प्रचार सुरू केला असताना महायुतीच्या उमेदवाराचे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. उद्या नाव जरी जाहीर केले तरी महायुतीच्या उमेदवाराला प्रचारासाठी अवघे २० ते २५ दिवस मिळणार आहे.

नवी मुंबई ते मिरा- भाईंदरपर्यंत विस्तारलेल्या या मतदारसंघात प्रचाराचे आव्हान उमेदवाराला पूर्ण करावे लागणार आहे. दरम्यान, उमेदवार कोणताही असला तरी आमचा प्रचार सुरू आहे. यावेळी महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून आणणे हे ध्येय असल्याने तशी अडचण भासणार नसल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *