टिटवाळ्यात नियंत्रण सुटलेल्या ट्रकचा थरार
अनेक वाहनांना दिली जोरदार धडक
कल्याण: टिटवाळा पूर्वेकडील असलेल्या मुख्य गणेश मंदिर रोडवर बुधवारी सकाळी ११च्या दरम्यान भीषण अपघाताची घटना घडली. एका मोठ्या मालवाहू ट्रकने नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या आणि जाणाऱ्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. बेदरकार वेगात आलेल्या या ट्रकने काही दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांना उडवत थेट गणेश मंदिर रोडवरील पटेल मार्ट परिसरात येऊन थांबला. या ट्रकचा क्रमांक RJ-१9 GG 4६७० असा असून अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बनेलीकडुन टिटवाळा पुर्वेकडुन स्टेशनच्या दिशेने येत असलेला एक ट्रेलर ट्रक हा अचानक वेगाने येत गणेश मंदिर या मुख्य रस्त्यावरील बिकानेर मिठाई शॉपसमोर आल्यानंतर वाहनावरील नियंत्रण सुटलेल्या या चालकाने काही सेकंदांतच समोर येणाऱ्या तसेच पार्क केलेल्या अनेक वाहनांना धडक देत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तर हा ट्रक इथेच न थांबता पुढे गणेश मंदिराच्या दिशेने पुन्हा वेगाने जात पटेल मार्टच्या जवळ एका डीवायडरला येऊन आदळला आणि थांबला. या अपघातात अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही वाहनचालक देखील यात जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी हा अपघात अत्यंत गंभीर स्वरूपाचा ठरला आहे.
या घटनेमागे ट्रकचा ब्रेक फेल झाला होता की चालक दारूच्या नशेत होता, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलीस यंत्रणा या दोन्ही शक्यतांची चौकशी करत असून चालकाची वैद्यकीय तपासणी करून मद्यप्राशनाची खातरजमा केली जाणार आहे. तसेच ट्रकची तांत्रिक तपासणी करून ब्रेक प्रणालीमध्ये बिघाड होता का, याचाही सखोल तपास केला जाणार आहे.
घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलिस स्टेशन टिटवाळा येथील पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी आपल्या कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहनचालकाला ताब्यात घेत परिसरातील गर्दी नियंत्रित करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या. नुकसानग्रस्त वाहनांची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधित वाहनमालकांकडून तक्रारी स्वीकारल्या जात आहेत.
या अपघातामुळे गणेश मंदिर रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी ट्रक चालकाविरोधात कडक कारवाईची मागणी केली असून, जड वाहनांच्या वेगावर आणि चालकांच्या तपासणीवर कठोर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त केली आहे. वारंवार अशा अपघातांच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
