उल्हासनगर महापालिकेवर दिव्यांगांचा भव्य मोर्चा
आपल्या विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी
दिव्यांग बांधवांना पालिकेत प्रवेश नकारल्याने तणावाचे वातावरण
उल्हासनगर : महापालिकेला अनेक वेळा आपल्या विविध मागण्याचे निवेदन देऊनही पालिका या मागण्या पूर्ण करत नसल्याने शुक्रवारी मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधवांनी महापालिकेत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दिव्यांग बांधवांना मुख्यालयामध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आल्याने दिव्यांग बांधवांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. याशिवाय पालिकेच्या समोर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. त्यावेळी आपल्या विविध मागण्या अद्याप पर्यंत पूर्ण न केल्याने संतापलेल्या दिव्यांग बांधवांनी पालिका आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काहींनी पालिकेच्या गेटवर चढून जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.
महापालिकेवर आंदोलन करण्यासाठी आलेल्या दिव्यांग बांधवांशी महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी संपर्क साधत पालिका आयुक्त हे कामानिमित्त मुंबईला गेले असल्याचे सांगितले. त्यावेळी आंदोलनासाठी आलेल्या दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध अनेक मुद्द्यांवर विषय काढत भ्रष्टाचाराचाही आरोप केला. त्यावेळी दिव्यांग बांधवांनी काही आपल्या प्रमुख मागण्या त्यावेळी उपस्थित केल्या. त्यात दिव्यांगांना ४५०० मानधन देण्यात यावे. दिव्यांगांना कंत्राटी कर्मचारी म्हणून रोजगार उपलब्ध करून द्यावा. दिव्यांगांना व्यवसायासाठी स्टॉल उपलब्ध करून द्यावेत. गंभीर आजारांसाठी दिव्यांगांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे. अशा मागण्या होत्या.
आपल्या विविध मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांनी केलेल्या आंदोलनामुळे महापालिका परिसरात एकच खळबळ झाली होती. दिव्यांग बांधवांच्या मागण्या महापालिका का पूर्ण करत नाही. वेगवेगळ्या प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीही का करत नाही, याशिवाय दोषींवर कारवाई का करत नाही. असे अनेक प्रश्न दिव्यांग बांधवांना पडले आहेत. निदान पालिकेने आता तरी या दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे
ठाणे जिल्ह्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष स्वप्निल पाटील गेल्या चार वर्ष दिव्यागांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी लढत आहेत. गेल्या चार वर्षापासून पालिकेकडे मागण्या करत आहेत. दिव्यांगाना स्वयंरोजगारांसाठी स्टॉल द्या, पण प्रत्येक वेळा वेगवेगळी कारणे दिली जातात. दिव्यांगांचा जो मूलभूत प्रश्न आहे त्यापासून त्यांना डावळला जातो. असे दिव्यांग बांधवांनी सांगितले. बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधवांनी उल्हासनगर महापालिकेवर हा भव्य मोर्चा काढला होता. आमच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा आक्रमक मोर्चा उल्हासनगर महापालिकेवर काढण्यातील असा इशारा स्वप्निल पाटील यांनी दिला आहे
