मुंबई : मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुढील दोन दिवस महाराष्ट्रातल्या अंतर्गत भागात कमाल तापमानात प्रचंड वाढ होणार असल्याचे सांगितलं जात आहे. उद्याही पालघर, ठाणे आणि मुंबईत उष्ण व आर्द्र हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. पुढील पाच दिवस हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिला आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात शुष्क वाऱ्यांमुळे तापमानाची धग अधिक जाणवत आहे.
मुंबईत आज तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मुंबई उपनगरात काही भागात ४३ अंश सेल्सिअसपर्यंत देखील तापमान जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल राम मंदिर परिसरात ४२.५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती.घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे मुंबई हवामान केंद्राकडून आवाहन करण्यात आले आहे.मुंबईत सरासरी तापमानापेक्षा ६.४ अंश सेल्सिअस अधिक तापमान नोंदवले जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
