कल्याण ते सीएसएमटी सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करा

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत मागणी

कल्याण :  मध्य रेल्वेवरील कल्याण ते सीएसएमटी सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करणे, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण, दिवा सीएसएमटी जलद लोकल, कोपर-वसई रेल्वेच्या फेऱ्या वाढवणे, कळवा-ऐरोली एलिव्हेटेड प्रकल्पाला गती आणि प्रत्येक स्टेशन्सवर मराठी साहित्य विक्रीचे स्टॉल्स सुरु करावेत, अशा रेल्वेसंबधींच्या अनेक मागण्यांचे निवेदन आज शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत सादर केले.

कल्याण मतदार संघातील ८० टक्के प्रवासी लोकलचा वापर करतात. त्यामुळे कल्याण मार्गावर सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करणे आवश्यक आहे. कोकण मार्गावरील मेल एक्सप्रेस फेऱ्यांची संख्या वाढवणे आणि ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांची सुविधा पुन्हा सुरु करावी, अशी मागणी खासदार डॉ. शिंदे यांनी केली. कल्याण लोकसभा मतदार संघात आजच्या घडीला ५ ते ६ हजार कोटींची रेल्वेची कामे सुरु आहेत. पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेसाठी येथील प्रवाशी १५ ते २० वर्षांपासून वाट पाहत होते. २०१४ मध्ये केंद्रात भाजपप्रणित एनडीए सरकार सत्तेत आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कल्याण मतदार संघातील रेल्वेच्या कामांना गती मिळाली. आज ठाणे ते कल्याण पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले. तसेच कल्याण ते अंबरनाथपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम सुरु आहे. मात्र ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंतच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी  खासदार डॉ. शिंदे यांनी केली. यासाठी आवश्यक भूसंपादन, रेल्वे मार्गावरील झोपड्यांचा प्रश्न आणि नागरिकांचे पुनर्वसन याबाबत रेल्वे मंत्र्यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा. याबाबत राज्य सरकार, एसआरए यांच्यासोबत चर्चा करुन धोरण बनवावे, असे खासदार डॉ. शिंदे सुचवले.

महाराष्ट्रात रेल्वेचे १ लाख ७० हजार कोटींची कामे सुरु आहेत. २०२६-२७ साठी महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्पांसाठी २३ हजार कोटींची तरतूद केली आहे. त्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. कल्याण यार्ड रिमॉडलिंगसाठी ८०० कोटींची तरतूद केली आहे. बुलेट ट्रेन आणि दिल्ली मुंबई रेल्वे कॉरिडोर लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली. मुंबई पुणे हायस्पीड कॉरिडोर, पुणे हैद्राबाद हायस्पीड कॉरीडोरमुळे प्रवाशांना फायदा होईल आणि वेळेची मोठी बचत होईल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

१९१६ मध्ये महात्मा गांधी यांनी रेल्वेतील असुविधांबाबत लेख लिहला होता. दुर्देवाने २०१४ पर्यंत ११४ ही परिस्थिती तशीच होती, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी काँग्रेसवर केली. आज रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्याचे काम एनडीए सरकारने केले. संपूर्ण देशात वंदे भारत ट्रेन सुरु आहेत. रेल्वेने विस्तार करतानाच विश्वविक्रम देखील केला आहे. चिनाब नदीवरील रेल्वेचा ब्रिज हा आयफेल टॉवरपेक्षाही उंच आहे. मागील १२ वर्षांत मध्य रेल्वेवरील प्रश्नांना प्राधान्य दिल्याबद्दल माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, पियूष गोयल आणि विद्यमान मंत्री अश्विन वैष्णव यांचे खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी खास आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *