वाशी रुग्णालयातील आक्षेपार्ह पत्रक नष्ट करून सर्व दोषींवर गुन्हे दाखल करा
हिंदु जनजागृती समितीची मागणी
कल्याण : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयात ‘भारतीय बालरोग अकादमी’ द्वारे लहान मुलांच्या पूरक आहार पत्रकात ‘गोमांस’ खाण्याचा सल्ला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना आणि शासनाने गोमातेला ‘राज्य माता’ घोषित केले असतांना सरकारी रुग्णालयात असा बेकायदेशीर प्रचार करणे हा कायद्याचा भंग व शासनाचा थेट अवमान आहे. याप्रकरणी दोषी संस्था व अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याविषयीचे निवेदन नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनाही दिले आहे. हे निवेदन रवींद्र नलावडे, अशोक सावंत, गोविंद प्रसाद दुबे यांनी सुपूर्त केले. या निवेदनाची प्रत नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकड़ेही पाठवली आहे.
हिंदु धर्मीय जनमानसात गाईला अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व असून गोहत्येला महापातक मानले गेले आहे; तसेच आईचे दूध न मिळणाऱ्या बालकांसाठी गोमाता हीच दुसरी माता असते. अशा अत्यंत संवेदनशील पार्श्वभूमीवर कोवळ्या बालकांना गोमांस खाण्यास प्रवृत्त करणारी ही विकृत धारणा कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना तीव्रतेने दुखावणारी आणि समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी आहे. आज एकीकडे पाश्चात्य देश भारतीय वंशाच्या देशी गाईंचे महत्त्व ओळखून मानसिक शांतीसाठी ‘काऊ थेरपी’चा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत, तर दुसरीकडे आपल्याच देशातील गीर, साहिवाल आणि देवणी यांसारख्या दुर्मिळ प्रजातींची संख्या घटत आहे. अशा स्थितीत भारतातील एका जबाबदार आरोग्य संस्थेकडून गोमांस भक्षणाला छुपे प्रोत्साहन दिले जाणे हे एका मोठ्या षडयंत्राचा भाग असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
या गंभीर गैरप्रकाराचा जाहीर निषेध करत हिंदु जनजागृती समिती प्रशासनाकडे ही आग्रही मागणी करत आहे की, भारतीय बालरोग अकादमी या संस्थेवर आणि वाशी महानगरपालिका रुग्णालयातील ज्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी या विघातक पत्रकाला परवानगी दिली, त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, तसेच नवी मुंबई क्षेत्रातील व राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतून ही विवादास्पद व आक्षेपार्ह पत्रके तात्काळ जप्त करून ती नष्ट करण्याचे कडक आदेश प्रशासनाला देण्यात यावेत. प्रशासनाकडून यावर वेळेत आणि ठोस कायदेशीर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही घनवट यांनी दिला आहे.
