रमेश औताडे
मुंबई : मैत्रीबोध परिवाराने शांतिक्षेत्र प्रेमगिरी आश्रम, कर्जत येथे एका अनोख्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून भारताच्या सभ्यतागत आणि सांस्कृतिक वारशाचा अमूल्य भाग आहे. या विचाराला अधिक बळ देण्यासाठी केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे कार्यक्रमाला उपस्थित होते. या प्रसंगी गोपाल कृष्ण अग्रवाल, आमदार महेंद्र सदाशिव थोरवे हेही कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे योगाचा अनुभव केवळ आसने आणि शारीरिक व्यायाम यापुरता मर्यादित न राहता, शरीर, मन आणि चेतना यांच्या एकात्मतेच्या रूपात घेता आला.
कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत आणण्यासाठी गणेश वंदना तसेच भारताची प्राचीन योगिक कला असलेल्या मल्लखांबाचे मनोहारी सादरीकरण करण्यात आले. मल्लखांब ही शक्ती, लवचिकता, संतुलन आणि शिस्त विकसित करणारी भारतीय परंपरेतील एक अद्वितीय कला आहे.
