राजेंद्र साळसकर
मुंबई- गेल्या ४८ तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये २८० मिमीपेक्षा जास्त अतिवृष्टी होऊनही, मध्य रेल्वेच्या मेन, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर लाईनवरील उपनगरीय सेवा सुरळीतपणे सुरू राहिल्या. मेन लाईनवर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सुमारे १५० मिमी, दादर – घाटकोपर पट्ट्यात १२० ते १५० मिमी आणि मुलुंड येथे १६० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. उपनगरीय भागात मुसळधार पाऊस झाला; यामध्ये ठाणे येथे २८४ मिमी आणि कळवा येथे २७० मिमी पावसाची नोंद झाली.हार्बर लाईनवरील वाशी ते पनवेल या पट्ट्यात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला.
मेन लाईनवरील आग्नेय विभागात (कल्याण ते कर्जत/खोपोली दरम्यान) सुमारे १५० मिमी पाऊस पडला तर मेन लाईनवरील ईशान्य विभागात (कल्याण ते कसारा दरम्यान) २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. मुसळधार पावसानंतरही मध्य रेल्वेची सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहिली, ज्यामुळे दररोज प्रवास करणारे लाखो प्रवासी सुरक्षितपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकले. हे मध्य रेल्वेच्या पावसाळ्यासाठीच्या सक्रिय नियोजनाचे यश दर्शवते. ही अखंड सेवा अभियांत्रिकी, परिचालन, विद्युत आणि सिग्नल व दूरसंचार विभागांमधील उत्तम आंतर-विभागीय समन्वय व सांघिक कार्य, तसेच महानगरपालिकांसोबतचा जवळचा समन्वय आणि पूर्वतयारीचे फलित आहे.
पावसाळ्यात रेल्वे चालवण्याचे आव्हानात्मक काम हाताळण्यासाठी मध्य रेल्वेने पाणी साचण्यापासून प्रतिबंध करणे, जलनिस्सारण यंत्रणेचे बळकटीकरण आणि संवेदनशील ठिकाणांचे संरक्षण यांवर लक्ष केंद्रित करून व्यापक तयारी केली आहे. विभागातील पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ११७ ठिकाणांवर १२.५ एचपी ते १०० एचपी क्षमतेचे एकूण २१० ‘हेवी-ड्युटी’ पाण्याचा उपसा करणारे पंप तैनात करण्यात आले होते.शीव – कुर्ला, चुनाभट्टी – कुर्ला, विक्रोळी – कांजुरमार्ग रोड आणि कुर्ला – लोकमान्य टिळक टर्मिनस यांसारख्या पूरप्रवण प्रमुख ठिकाणांची निवड करून, तिथे तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी अभियांत्रिकी उपाययोजनांद्वारे विशेष कार्यवाही करण्यात आली.
ठाणे मायक्रोटनेलिंग प्रकल्पामुळे ठाणे स्थानकावरील पाणी साचण्याची दीर्घकालीन समस्या प्रभावीपणे सोडवण्यात आली आहे; यापूर्वी मुसळधार पावसात येथे रेल्वे रुळांच्या पातळीपेक्षा वर पाणी साचत असे. तसेच, जलनिस्सारण यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी संपूर्ण नेटवर्कवर पुलांची दुरुस्ती आणि जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याची कामे हाती घेण्यात आली. पावसाळ्याच्या पूर्वतयारीच्या मोठ्या प्रमाणावरील कामांमध्ये अनेक मोऱ्यांची साफसफाई, बाजूच्या गटारांमधील आणि ‘कॅच-वॉटर ड्रेन्स’मधील गाळ काढणे, रुळांची देखभाल आणि संवेदनशील ठिकाणी रुळांची उंची वाढवणे, बोगद्यांची तपासणी, स्थानकांवरील प्लॅटफॉर्म व रेल्वे इमारतींची गळती रोखण्यासाठी उपाययोजना, तसेच संवेदनशील भागात पावसाळी गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती यांचा समावेश होता.
याव्यतिरिक्त, सोशल मीडियावर पावसाळ्याबाबत मिळणाऱ्या सततच्या अद्ययावत माहितीमुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत झाली. एकत्रित प्रयत्नांमुळे, या हंगामातील अत्यंत मुसळधार पावसाच्या कालावधीत ही मध्य रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे सेवा सुरक्षितपणे आणि विश्वासार्हतेने सुरू राहिली. शहराची जीवनवाहिनी अविरत सुरू ठेवण्यासाठी मुसळधार पावसात रात्रंदिवस काम करणाऱ्या आघाडीवरील कर्मचारी – जसे की रुळांची देखभाल करणारे कर्मचारी, गँगमेन, ‘परमनंट वे’ कर्मचारी, मोटरमन, ट्रेन मॅनेजर्स, अभियंते आणि सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांच्या अथक समर्पणाची दखल घेण्यात आली आहे. पावसाळ्यात उपनगरीय सेवा विनाखंडितपणे पुरवण्यासाठी त्यांचे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणचे प्रयत्न अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात.
000000000
